भवतालचा अंक दरवर्षी महाराष्ट्राच्या बाबतीतल्या अनेक विषयांचं दस्तऐवजीकरण करतो. २०२५ च्या दिवाळी अंकाचा विषय 'वाटा-रस्ते-मार्ग' असा असला तरी तो केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. कदाचित राहू शकलाही नसता. गुगल नव्हतं तेव्हाच्या काळात समग्र माहिती देणारे लेख होते. पण आताच्या काळात जी माहिती वाचकांना स्वतः शोधता येते ती लेखातून मांडण्याचं प्रयोजन नाही. वाचक कशाला स्वतःहून अशी माहिती शोधतील हा प्रश्न संयुक्तिक आहे. पण ज्यांना इंटरेस्ट आहे ते शोधतीलही. ज्यांना तो नाही ते लेखसुद्धा वाचणार नाहीतच. माहिती द्यायचीच असेल तर ती मनोरंजक पद्धतीने मांडता यायला हवी. आणि माहितीचा ओव्हरडोस नसावा ही किमान अपेक्षा. अंकातले काही लेख ती पूर्ण करत नाहीत.
सह्याद्री हा महाराष्ट्रात जन्माला आलेल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. साईप्रकाश बेलसरे ह्यांचा घाटवाटांवरचा लेख छोटेखानी असला तरी चांगली माहिती देतो. लेखकाने ह्यावर अधिक लिहायला हवं होतं. वाटांवर बदलणाऱ्या भाषांवरचा डॉ. मानसी केळकर ह्यांचा लेख वाचून सुद्धा ह्यावर लेखिकेने अजून लिहायला हवं होतं असंच वाटलं. पुणे ते मुंबई ह्या कोविडकाळात केलेल्या प्रवासावरचा संग्राम गायकवाड ह्यांचा लेख वाचून ओसाड पडलेले रस्ते पुन्हा एकदा आठवले. गर्दी नकोशी वाटत असली तरी एवढी शांतता अंगावर यायची.
लेणी हा आणखी एक जिव्हाळ्याचा विषय. त्यातली शिल्पं, लेख वगैरेवर एकापेक्षा अधिक लेख असते तरी दस्तऐवजीकरण अधिक चांगलं झालं असतं. रस्त्यांवरच्या व्यवस्थेवर डॉ. देवकुमार अहिरे ह्यांचा लेख आवडला. किल्ल्यांवरच्या वाटांवर डॉ. सचिन जोशी ह्यांनी लिहिलेला लेख किल्ल्यावर प्रेम असलेल्या आणि त्यांच्याबद्दल उत्सुकता असलेल्या कोणालाही आवडेल.
'एका जिल्ह्याच्या आडवळणी नोंदी' मध्ये धाराशिवचे कलेक्टर म्हणून काम केलेल्या कौस्तुभ दिवेगावकर ह्यांनी आपले अनुभव लिहिलेत. एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा लेख प्रथम वाचायला मिळाला. आणखी अधिकाऱ्यांनी असं लिहायला हवं म्हणजे ते करत असलेल्या कामांची ओळख लोकांना होईल.
वाट म्हटल्या की संरक्षक देवता आल्या. डॉ. गोपाळ जोगे ह्यांनी त्यावर विस्ताराने लिहिलंय. काशी यात्रा आणि त्यात लागणारे परवाने म्हणजे दस्तक ह्यावरच डॉ. गिरीश मांडके ह्यांचा लेख माहितीपूर्ण. डॉ. मोहसीना मुकादम हे नाव आणि 'वाटेवरची खाद्यसंस्कृती' हे लेखाचं नाव वाचून भरपूर माहिती मिळेल असं वाटलं पण लेख त्रोटक वाटला.
समोर दिसेल त्या बसमध्ये बसायचं आणि शेवटल्या ठिकाणी उतरायचं हे मला अजून बेस्ट बसने सुद्धा जमलं नाहीये. एसटी मध्ये बसून ते जमवणाऱ्या सुहास जोशींचं कौतुक वाटलं. अंबेजोगाईच्या हत्ती लेणींबद्दल प्रथमच वाचायला मिळालं. उदगीरच्या बस स्टॅन्डवर जो फलक होता त्यातलं एकही गाव लेखकाला ओळखता आलं नाही. त्यावर तो म्हणतो या गावांच्या वाटेवर कधी जाईन ते माहित नाही'. हे वाक्य कायम लक्षात राहील. शिखर मोहिमांवर लेख वाचलेले असल्याने उमेश झिरपे हे नाव परिचयाचं आहे. त्यांनी सह्याद्री आणि हिमालयातल्या वाटांवर छान लेख लिहिलाय. महाराष्ट्राचा आणखी एक जिव्हाळ्याचा विषय म्हणजे दरवर्षीची वारी. त्यावर पावलस मुगुटमल ह्यांनी लिहिलेला लेख वाचून खूप माहीत मिळाली. त्यातला वारकर्यांना घरी जेवायला बोलावणाऱ्या छोट्या पोरांचा किस्सा वाचून भरून आलं. शेवटी एक वारकरी त्यांच्या घरी जेवायला गेला हे वाचून मी हुश्श केलं. जातपात पाहू नये हा वारीचा संदेश आजच्या काळात मोलाचा आहे. वारीसोबत काही अंतर तरी चालून जायचा बेत कधी तडीस जाणार ते तो विठोबाच जाणे.
'भटक्यांच्या वाटा' भटक्या जमातींच्या वाटांवरून आपल्याला फिरवून आणतो. 'सागरी मार्ग' ह्या विषयावर अजून वाचायला आवडलं असतं. केप्टन सनत भाटे ह्यांचा लेख ह्या विषयाबद्दल उत्सुकता वाढवणारा.
'वाटा' ह्या विषयाच्या अनुषंगाने आणखी काही लेख अंकात समाविष्ट करता आले असते - उदा. नकाशावाचन, वाळवंटातील रस्तावाचन, अंतराळ मोहीमा, स्कुबा डायव्हिंग, ट्रेकिंगचे अनुभव, एव्हरेस्टच्या बेस केम्पपर्यंत नेणारी वाट, जुन्या प्रवासाच्या नोंदी - असं वाटून गेलं.




