Tuesday, February 3, 2026

९. भवताल (दिवाळी अंक २०२५) (किंमत रुपये ३५०)

भवतालचा अंक दरवर्षी महाराष्ट्राच्या बाबतीतल्या अनेक विषयांचं दस्तऐवजीकरण करतो. २०२५ च्या दिवाळी अंकाचा विषय 'वाटा-रस्ते-मार्ग' असा असला तरी तो केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. कदाचित राहू शकलाही नसता. गुगल नव्हतं तेव्हाच्या काळात समग्र माहिती देणारे लेख होते. पण आताच्या काळात जी माहिती वाचकांना स्वतः शोधता येते ती लेखातून मांडण्याचं प्रयोजन नाही. वाचक कशाला स्वतःहून अशी माहिती शोधतील हा प्रश्न संयुक्तिक आहे. पण ज्यांना इंटरेस्ट आहे ते शोधतीलही. ज्यांना तो नाही ते लेखसुद्धा वाचणार नाहीतच. माहिती द्यायचीच असेल तर ती मनोरंजक पद्धतीने मांडता यायला हवी. आणि माहितीचा ओव्हरडोस नसावा ही किमान अपेक्षा. अंकातले काही लेख ती पूर्ण करत नाहीत.

सह्याद्री हा महाराष्ट्रात जन्माला आलेल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. साईप्रकाश बेलसरे ह्यांचा घाटवाटांवरचा लेख छोटेखानी असला तरी चांगली माहिती देतो. लेखकाने ह्यावर अधिक लिहायला हवं होतं. वाटांवर बदलणाऱ्या भाषांवरचा डॉ. मानसी केळकर ह्यांचा लेख वाचून सुद्धा ह्यावर लेखिकेने अजून लिहायला हवं होतं असंच वाटलं. पुणे ते मुंबई ह्या कोविडकाळात केलेल्या प्रवासावरचा संग्राम गायकवाड ह्यांचा लेख वाचून ओसाड पडलेले रस्ते पुन्हा एकदा आठवले. गर्दी नकोशी वाटत असली तरी एवढी शांतता अंगावर यायची.

लेणी हा आणखी एक जिव्हाळ्याचा विषय. त्यातली शिल्पं, लेख वगैरेवर एकापेक्षा अधिक लेख असते तरी दस्तऐवजीकरण अधिक चांगलं झालं असतं. रस्त्यांवरच्या व्यवस्थेवर डॉ. देवकुमार अहिरे ह्यांचा लेख आवडला. किल्ल्यांवरच्या वाटांवर डॉ. सचिन जोशी ह्यांनी लिहिलेला लेख किल्ल्यावर प्रेम असलेल्या आणि त्यांच्याबद्दल उत्सुकता असलेल्या कोणालाही आवडेल. 

'एका जिल्ह्याच्या आडवळणी नोंदी' मध्ये धाराशिवचे कलेक्टर म्हणून काम केलेल्या कौस्तुभ दिवेगावकर ह्यांनी आपले अनुभव लिहिलेत. एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा लेख प्रथम वाचायला मिळाला. आणखी अधिकाऱ्यांनी असं लिहायला हवं म्हणजे ते करत असलेल्या कामांची ओळख लोकांना होईल. 

वाट म्हटल्या की संरक्षक देवता आल्या. डॉ. गोपाळ जोगे ह्यांनी त्यावर विस्ताराने लिहिलंय. काशी यात्रा आणि त्यात लागणारे परवाने म्हणजे दस्तक ह्यावरच डॉ. गिरीश मांडके ह्यांचा लेख माहितीपूर्ण. डॉ. मोहसीना मुकादम हे नाव आणि 'वाटेवरची खाद्यसंस्कृती' हे लेखाचं नाव वाचून भरपूर माहिती मिळेल असं वाटलं पण लेख त्रोटक वाटला.

समोर दिसेल त्या बसमध्ये बसायचं आणि शेवटल्या ठिकाणी उतरायचं हे मला अजून बेस्ट बसने सुद्धा जमलं नाहीये. एसटी मध्ये बसून ते जमवणाऱ्या सुहास जोशींचं कौतुक वाटलं. अंबेजोगाईच्या हत्ती लेणींबद्दल प्रथमच वाचायला मिळालं. उदगीरच्या बस स्टॅन्डवर जो फलक होता त्यातलं एकही गाव लेखकाला ओळखता आलं नाही. त्यावर तो म्हणतो या गावांच्या वाटेवर कधी जाईन ते माहित नाही'. हे वाक्य कायम लक्षात राहील. शिखर मोहिमांवर लेख वाचलेले असल्याने उमेश झिरपे हे नाव परिचयाचं आहे. त्यांनी सह्याद्री आणि हिमालयातल्या वाटांवर छान लेख लिहिलाय. महाराष्ट्राचा आणखी एक जिव्हाळ्याचा विषय म्हणजे दरवर्षीची वारी. त्यावर पावलस मुगुटमल ह्यांनी लिहिलेला लेख वाचून खूप माहीत मिळाली. त्यातला वारकर्यांना घरी जेवायला बोलावणाऱ्या छोट्या पोरांचा किस्सा वाचून भरून आलं. शेवटी एक वारकरी त्यांच्या घरी जेवायला गेला हे वाचून मी हुश्श केलं. जातपात पाहू नये हा वारीचा संदेश आजच्या काळात मोलाचा आहे. वारीसोबत काही अंतर तरी चालून जायचा बेत कधी तडीस जाणार ते तो विठोबाच जाणे. 

'भटक्यांच्या वाटा' भटक्या जमातींच्या वाटांवरून आपल्याला फिरवून आणतो. 'सागरी मार्ग' ह्या विषयावर अजून वाचायला आवडलं असतं. केप्टन सनत भाटे ह्यांचा लेख ह्या विषयाबद्दल उत्सुकता वाढवणारा.

'वाटा' ह्या विषयाच्या अनुषंगाने आणखी काही लेख अंकात समाविष्ट करता आले असते - उदा. नकाशावाचन, वाळवंटातील रस्तावाचन, अंतराळ मोहीमा, स्कुबा डायव्हिंग, ट्रेकिंगचे अनुभव, एव्हरेस्टच्या बेस केम्पपर्यंत नेणारी वाट, जुन्या प्रवासाच्या नोंदी - असं वाटून गेलं.

Saturday, January 24, 2026

८. कालनिर्णय (दिवाळी अंक २०२५) (किंमत रुपये ३००)

अंकाच्या संपादकीयात ग्रेसांची 'पाऊस आला पाऊस आला' कविता वाचली आणि मन एकदम खूप वर्षं शाळेच्या दिवसांत गेलं. संध्याकाळी घरी आल्यावर 'सांजधारा' मध्ये लागणारी गाणी आठवली. शैलेंद्रची 'दो बिघा जमीन' मधली 'मौसम बीता जाये' वाचून गाव सोडून जाणारा बलराज सहानी डोळ्यांसमोर आला. एक दिवस मुंबईच्या बाहेर जावं लागलं तर जीव कासावीस होतो मग आपली पाळंमुळं उपसून दुसरीकडे जाताना कसं वाटत असेल ह्याची कल्पनासुद्धा करावीशी वाटत नाही. त्याही पुढे जाऊन ज्यांची घरं, गावं, शहरं उध्वस्त झाली असतील आणि मागे परत फिरण्यासाठी सुद्धा काही उरलं नसेल त्यांचं काय? आपल्यासाठी त्या बातम्या  पण त्यांच्यासाठी वास्तव. असो. आपण काय करू शकतो ह्याबाबत :-(  त्या मानाने बॉब डिलनचं And it's a hard rain's a-gonna fall अनोळखी आणि कळायला दुर्बोध - निदान माझ्यासाठी तरी. Sad, dead, crooked, graveyard असे शब्द असलेलं हे गाणं अमेरिकन लोकांना जगण्याची उमेद घेऊन गेलं म्हणे. असेल. माझी गाण्याची समज फार नाही. कधीतरी वेळ काढून ह्या गाण्याविषयी गुगलबाबाला विचारेन.

तर आता अंक आणि त्यातल्या लेखांविषयी.

पहिलं पण इतिहासाचं - १९४६ साली भारतीय नौदलात झालेल्या उठावाचं  ज्यामुळे ब्रिटिशांना आपल्याला इथून गाशा गुंडाळावा लागणार ह्याची जाणीव झाली. शाळेत ह्याबद्दल वाचल्याचं आठवत नाही. सोबतची साहिरची कविता सुन्न करून गेली. ह्या बंडात सहभागी झालेल्या लोकांना नंतर ना नोकऱ्या मिळाल्या ना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा आणि त्याचे लाभ मिळाले हे वाचून तर अस्वस्थ व्हायला झालं. अश्या किती लोकांनी बलिदान करून मिळवलेल्या स्वातंत्र्याची आज आपण अक्षरश: माती करतोय :-( 

रोज दारात येऊन पडणारा पेपर असो किंवा हातात असलेला दिवाळी अंक असो. त्याची छपाई कुठे आणि कशी होते त्याची उठाठेव करायची गरज किंवा तेव्हढा वेळ कोणाकडेच नाही. त्यामुळे 'औंध संस्थानचा प्रिटिंग प्रेस' हा आणि त्यापुढला 'जावजी दादाजींचा निर्णयसागर प्रेस' हा असे दोन्ही लेख खूप आवडले. त्यामानाने Times Roman किंवा Sans Serif पासून सुरु झालेले फॉन्ट्स परिचयाचे असूनही युनिव्हर्स हा पहिला फॉन्ट डिझाईन करणाऱ्या एड्रीयन फ्रुटीगर ह्यांच्यावरचा लेख थोडा किचकट आणि रटाळ वाटला. 

थरारपट पाहायची आवड असल्याने डेव्हिड फिन्चर वरचा लेख आवडला. त्याचे चित्रपट कितपत झेपतील हा भाग अलाहिदा. वीणा वर्ल्डच्या वीणा पाटील ह्यांचा लेख वाचून पर्यटन व्यवसायात किती अडचणी येतात ह्याची कल्पना आली. 'युरोपची होरपळ', 'पत्रकार ते अर्थतज्ज्ञ जेम्स विल्सन', 'इराणी गणगोत', 'मधुमीलनात ह्या' हे लेख माहितीपूर्ण वाटले.

पाकनिर्णय मधल्या बऱ्याचशा पाककृती 'काहीही' ह्या सदरात मोडणाऱ्या वाटल्या :-) उदा. कच्च्या केळ्याची व्हेज अंडाकरी, केळफुलाचे कुरकुरे आणि बनाना lasagna. करणारे धन्य आणि खाणारे त्याहून महान.

अंकातली सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे शैलेश मदियानी ह्यांच्या 'अर्धांगिनी' ह्या कथेचा अनुवाद. मी ती दोन वेळा वाचली. सुदैवाने हिंदी कळत असल्याने ह्या लेखकाच्या कथा मुळातून वाचता येतील ह्याचा आनंद वाटला. आता भाकरीचा चन्द्र शोधण्याच्या व्यापातून कधी वेळ मिळेल ते उपरवाला जाने किंवा ना जाने :-)

Saturday, January 3, 2026

७. दुर्ग (दिवाळी अंक २०२५) (किंमत रुपये ३५०)

दुर्गाच्या ह्या अंकातले सगळ्यात आवडलेले लेख म्हणजे अमित मराठे ह्यांचा 'काळ खोऱ्यातील भटकंती आणि तेथील माणुसकी' आणि अलंग-मदन-कुलंग वरच्या ट्रेकबद्दचा डॉ. हेमंत बोरसे ह्यांचा लेख. आपल्या मित्राने किंवा ऑफिसमधल्या सहकार्याने सहज गप्पा मारता मारता त्याच्या विकेंड ट्रेकबद्दल सांगावं अश्या भाषेत हे लेख लिहिलेत. लेखात बोलण्याच्या ओघात माहितीही बरीच दिली आहे. हे लेख मी खूप एन्जॉय केले. ट्रेकिंग किंवा किल्ला ह्यावरचे लेख कसे असावेत ह्याचा मला हे लेख खूप चांगले नमुना वाटले. सगळयांनाच लिहिता येतं असं नाही हे खरं आहे. पण लेखकाकडून मिळालेले लेख संपादन करणे किंवा त्यावर संस्करण करणे ही कामं झाली तर ह्या विषयाला वाहिलेल्याअंकातल्या लेखांचं माहिती आणि मनोरंजन मूल्य वाढेल.

पुढल्या लेखात राजगडाच्या संजीवनी माचीवर विवेक काळे ह्यांनी विस्तारपूर्वक लिहिलंय. हा किल्ला बघायला जाणाऱ्या प्रत्येकाने तो बरोबर ठेवायलाच हवा म्हणजे किल्ल्यावर जाणं ही एक सहल न होता किल्ला डोळसपणे पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळेल. असे लेख ह्या अंकांतून अधिक संख्येने यायला हवेत.

संभाजीराजांच्या गोवा स्वारीबद्दल मला ऐकूनही माहीत नव्हतं. संदीप मुळीक ह्यांचा लेख वाचून हा इतिहास व्यवस्थित समजला. मोडी लिपी शिकूनही कृष्णाजी कंकाना संभाजीराजांनी दिलेली बक्षिसाची मोईन अजिबात वाचता आली नाही ह्याचं फार वाईट वाटलं. सराव न राहिल्यामुळे पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी वाया चालली आहे हेच खरं :-( संभाजीराजांच्या जंजिरा मोहिमेवर संतोष जाधव ह्यांनी लिहिलेला लेखही बराच इतिहास सांगतो.

अरविंद देशपांडे ह्यांचा कोरीगडावरचा लेख गडावर भेट देणाऱ्यांसाठी माहितीपूर्ण ठरेल असाच. वागीनगोरा ह्या औरंगजेबाच्या दक्षिणेतल्या शेवटच्या लढाईबद्दल प्रांजल वाघ ह्यांनी लिहिलं आहे. ह्याबद्दलही इतिहासाच्या पुस्तकात वाचल्याचं आठवत नाही. 'डोंगरधारेवरून सिंहगड ते भुलेश्वर' हा साईप्रकाश बेलसरे ह्यांचा लेख वाचून आपणही त्या ट्रेकवर असल्यासारखं वाटतं. मधु मकरंदगड परिक्रमेवरचा जितेंद्र बंकापुरे ह्यांचा छोटेखानी लेख आवडला.  

जुनागढचे वैभव उपरकोट (अमोल सांडे), किल्ले सुधागड (डॉ. संग्राम इंदूरे),  किल्ले गंभीरगड (श्रीकांत कासट), वऱ्हाडातला भुईकोट गोधनापूर (प्रा. डॉ. किशोर वानखेडे), शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा साक्षीदार कांचन (प्रा. नितीन जाधव),  टिपागड (ओंकार केळकर), माणदेशाची दुर्गजोडी संतोषगड वारुगड (अमित निंबाळकर), सुतोंडा (अंकुर काळे) आणि महिमतगड (डॉ. मुकुंद पाटील) हे लेख ह्या किल्ल्यांची छान ओळख करून देतात. हे सगळे लेख वाचून हे अंक जपून ठेवायचा माझा निर्णय अगदी योग्य होता ह्याची खात्री पटली. आता फक्त किल्ले बघायचा योग कधी येतो त्याची वाट पाहायची. एखाद्या देवाचं दर्शन घडायला देवाने बोलवावं लागतं असं म्हणतात. कदाचित किल्ल्यांबद्दलसुद्धा असंच असेल.

अंकातील शेवटचा लेख इतिहास संशोधक द. ब. पारसनीस ह्यांची ओळख करून देतो. हा लेख मला वैशिष्ट्यपूर्ण वाटलं. दर वर्षीच्या अंकात वेगवेगळ्या इतिहास संशोधकांबद्दल आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल वाचायला आवडेल.

अंकाचा समारोप जागतिक वारसास्थळांत समावेश झालेल्या १२ गडांच्या सुंदर पोस्टरने केलाय हे खूप संयुक्तिक वाटलं. पुढच्या अंकात एक वर्षात ह्या गडांवर काय नव्या सोयी झाल्या आहेत (किंवा नाहीत!) ह्याबद्दल वाचायला आवडेल. 

Friday, January 2, 2026

६. किल्ला (दिवाळी अंक २०२५) (किंमत रुपये ५००)

ह्या वर्षीच्या 'किल्ला'ची सुरुवात चंद्रशेखर बुराडे ह्यांच्या 'द्रष्टा दुर्गस्थापत्यकार' ह्या लेखाने झाली आहे. लेखाचे शीर्षक आणि लेखकाचा आर्किटेक्ट हा पेशा वाचून लेखात त्या अनुषंगाने सविस्तर विश्लेषण वाचायला मिळेल असं वाटलं होतं. पण लेखात यंदा जागतिक वारसास्थळ म्हणून मान्यता मिळालेल्या १२ किल्ल्यांचा जुजबी उल्लेख आहे आणि बाकीची माहितीसुद्धा विस्कळीत वाटली. खरं तर ह्यातल्या प्रत्येक किल्ल्याच्या बांधणीवर आर्किटेक्चरच्या बाबतीत एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. नाळ, नेढे, पदर असले शब्द ट्रेकर्सच्या परिचयाचे असले तरी सामान्य लोकांना त्याबद्दल कमीच माहिती असते. किल्ल्यावरच्या विहिरी, मंदिरं, भुयारे, देवड्या, वास्तू, बुरुज ह्यांच्या बांधकामावर बरंच काही लिहिता येऊ शकतं. आशा आहे की दुर्ग, किल्ला किंवा दुर्गांच्या देशातूनचे संपादक ह्यावर विचार करतील.

मराठी साम्राज्याच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून मान्यता दिली आहे ह्याचं प्रतिबिंब 'किल्ला' ह्या विषयाला वाहिलेल्या सगळ्या अंकांत ह्या वर्षी पडणार हे सांगायला कुठल्या ज्योतिष्याची गरज नाही. पण 'दुर्गांच्या देशातून' मध्ये ह्यावरची सविस्तर मुलाखत आधीच वाचली असल्याने आणि 'मराठा लष्करी स्थापत्य - महाराष्ट्र धर्माच्या प्रतीकांचा आंतरराष्ट्रीय गौरव' हे शीर्षक वाचून एड. आशिष शेलार ह्यांचा लेख संपूर्णपणे वाचायची अजिबात इच्छा झाली नाही. शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य उभं केलं ते हिंदुस्थानात राहणाऱ्या सर्वांसाठी होतं. त्यांच्या स्वतः:च्या सैन्यात, शासनात अनेक धर्मांचे लोक होते. हिंदू धर्म असलेल्या लोकांनी गैरवर्तणूक केली तर त्यांना कठोर शिक्षा झाली. त्यात 'आपला तो बाब्या' असला प्रकार कधीच नव्हता. पण इतिहासातलं सोयीस्कर तेव्हढंच उचलायचं आणि जे सोयीस्कर नाही त्याचा वेगळा नेरेटिव्ह सेट करायचा हाच पायंडा पडलाय. लेख चाळला तेव्हा किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत शासन बरंच काही करणार आहे असं कळलं. ही बोलाची कढी ठरू नये म्हणजे मिळवलं. नाहीतर राज्याची सध्याची स्थिती म्हणजे तिजोरीत खडखडाटाचीच आहे. बाकी ह्या वारसायादीत नसलेल्या अनेक किल्ल्यांची अवस्था काय आहे हे सुद्धा ह्या सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी अंकातले बाकीचे लेख वाचून जाणून घेतलं असेल अशी आशा करू यात. त्यांनासुद्धा चांगले दिवस आणा म्हणावं आता. असो.

पुढल्या अनेक लेखांतून कधी न ऐकलेल्या अनवट किल्ल्यांविषयी खूप छान माहिती मिळाली - कालिंजर (यशोधन जोशी), पुराना किला (डॉ. प्रसाद बर्वे), रिअल फेलीफ (अमित सामंत), साजरा गोजरा (अनिकेत वाघ) आणि बेतूल / खोलगड (संदीप मुळीक). जुनागड (संदीप तापकीर) आणि जिंजी (अमर श्रीरंग साळुंखे) हे लेख वाचून ह्या किल्ल्यांबद्दलसुद्धा बरंच काही नव्याने कळलं. 

किती किल्ले पाहायचे राहिलेत हे लक्षात येऊन छाती दडपून गेली. त्याहूनही अधिक महत्त्वाचं म्हणजे किल्ले डोळसपणे पाहता यावेत म्हणून किती वाचावं आणि समजून घ्यावं लागणार आहे त्याचीही कल्पना आली. ह्या विषयात नवख्या असणाऱ्याने कशी तयारी करावी ह्यावर एखाद्या अंकात वाचायला आवडेल. 

'पोळेदुर्ग' हा एड. सीमंतिनी नूलकर ह्यांचा मधमाश्यांची पोळी आणि किल्ले ह्यातलं साम्य उलगडून दाखवणारा, 'हो ची मिन्ह सिटी'तल्या सैन्याने अमेरिकन सैन्याशी दिलेल्या कडव्या झुंजींबद्दल सांगणारा राजीव खांडेकर ह्यांचा, आसाममधील तोफांच्या वापराबद्द्लच्या इतिहासावरचा डॉ. तेजस गर्गे ह्यांचा आणि शिवराई नाण्यांवरचा पुरुषोत्तम भार्गवे ह्यांचा हे लेख सुरेख आहेत.

Wednesday, December 31, 2025

५. दुर्गांच्या देशातून (दिवाळी अंक २०२५) (किंमत रुपये ४००)

'दुर्गांच्या देशातून' चा ह्या वर्षीचा दिवाळी अंक 'एव्हरेस्ट विशेषांक' आहे हे पाहून मस्त वाटलं. 

संपादकांनी प्रस्तावनेत लिहिलंय की जरी त्यांनी एव्हरेस्ट सर केलेल्या अनेक लोकांना लेख लिहिण्याबद्दल संपर्क केला होता तरी त्यांना फार थोडे लेख मिळाले. सगळयांना लिहायचा उत्साह असतोच असं नाही आणि असला तरी ते जमेलच असंही नाही. अंकातले काही लेख वाचून ते कोणीतरी संपादित करायला हवे होते असं वाटलं. लेख म्हणजे नुसता माहितीचा पुरवठा नव्हे. अश्या लेखांना काही वर्षांपूर्वी महत्त्व होतं पण हवी ती माहिती एका बटणाच्या क्लिकवर मिळायच्या हल्लीच्या जमान्यात ती वाचणं रटाळ वाटू शकतं. एव्हरेस्ट सर करताना आलेल्या अनुभवांविषयी वाचताना उत्सुकता असते ती तयारी कशी केली, काय अडचणी आल्या, त्यावर मात कशी केली, प्रत्यक्ष चढाईच्या वेळी काय अनुभव आले, मन:स्थिती कशी होती ह्याविषयी.

त्या दृष्टीने गणेश मोरे, द्वारका डोखे, मिलिंद रासकर, कुंतल जोईशेर, चंद्रकला गावित आणि उमेश घेवरीकर ह्यांचे लेख विशेष आवडले. शिवकाळातल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळं म्हणून घोषित केलं त्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती देणारी विकास खरगे ह्यांची डॉ. लता पाडेकर ह्यांनी घेतलेली मुलाखत माहितीपूर्ण आहे.

संपादकांनी सर्व लेखकांची ओळख प्रस्तावनेत न करता प्रत्येक लेखाच्या आधी द्यायला हवी हे दर वर्षीप्रमाणेच ह्याही वर्षी जाणवलं. 

बेस केम्पपर्यंत ट्रेक करायचा म्हटलं तरी किती तयारी करायला लागेल ह्याची अंधुकशी जाणीव हा अंक वाचून झाली. आणि पुढल्या १-२ वर्षात काही करून हे जमावायलाच हवं हे भान आलं :-(

4. ऋतुरंग (दिवाळी अंक २०२५) (किंमत रुपये ३००)

अंकाची सुरुवात 'त्यांना काही सांगायचंय' ह्या विभागातल्या गुलजार, विनोदकुमार शुक्ल, खुशवंत सिंग, भीष्म सहानी, शरद जोशी, मंटो , इस्मत चुगताई ह्यांनी लिहिलेल्या कथांनी झालेय. पुन्हा एकदा आपण हिंदी साहित्यातलं काही म्हणजे काही वाचलेलं नाहीये हे प्रकर्षाने जाणवलं. दरवर्षी हे नव्याने लक्षात येतं आणि मग कामाच्या धबडग्यात राहून जातं :-(

'अनुभवांची पटकथा' विभागात नवाजुद्दीन सिद्दीकी, शबाना आझमी, बोमन इराणी ह्यांच्यासारख्या चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्तींनी आपले अनुभव लिहिलेत. मारुती चितमपल्ली, नारायण सुर्वे ह्यासारख्या साहित्यिकांनी, हरिहरन, उषा उत्थुप ह्यांच्यासारख्या गायकांनी लिहिलंय. अशोक हांडे, गिरीश कुलकर्णी, मल्लिका अमर शेख ह्यांच्या आठवणी आहेत. त्याचसोबत संदीप वासलेकर, मिलिंद जोशी, ईश्वरचन्द्र हलगे ह्या निदान मला तरी माहीत नसलेल्या व्यक्तींचे अनुभवसुद्धा आहेत. आपली ओळख हरवून बसलेल्या निराधार व्यक्तींसोबत काम करताना डॉ. राजेंद्र धामणे ह्यांना आलेले अनुभव मन विषण्ण करून जातात. 

'मला उमजलेला माणूस' ह्या विभागात पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, राज कपूर, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, झाकीर हुसेन अश्या अनेक प्रसिध्द्व व्यक्तींवरचे लेख आहेत. 'विशेष लेख' विभागातले जीवनानंद दास ह्यांच्या 'वनलता सेन' ह्या कवितेवरचा लेख आणि 'नेहरू गेले त्यावेळची गोष्ट' हा नारायण सुर्वे ह्यांचा लेख विशेष आवडले. 

'सांगण्यासारखे' ह्या विभागातल्या लेखांत सुशीलकुमार शिंदे, अच्युत पालव, धरिकांत बोजेवार, शुभदा चौकर ह्यांच्यासोबत आणखी अनेक व्यक्तींच्या आठवणींचा कोलाज आहे. 

ह्या व्यक्तींच्या आठवणी म्हणजे त्या त्या काळातल्या घटनांचं आणि पर्यायाने त्या काळाचंसुद्धा एक डॉक्युमेंटेशन आहे. फक्त आपल्याच अनुभवातून शिकायचं म्हटलं तर हे आयुष्य थोडं आहे. म्हणून हे अनुभव वाचणं एक वाचक म्हणून आणि एक माणूस म्हणून समृद्ध करून जाणारंच. 

Sunday, November 16, 2025

३. महा अनुभव (दिवाळी अंक २०२५) (किंमत रुपये २५०)

'महा अनुभव' च्या ह्या वर्षीच्या दिवाळी अंकाच्या सुरुवातीला सुहास पळशीकर ह्यांचा लेख आहे. त्यांचं वृत्तपत्रातलं लिखाण मी वाचलंय. पण खरं सांगायचं तर लेखाच्या 'ज्ञानव्यवहारांवरील आक्रमण' ह्या शीर्षकाने मला बुचकळ्यात टाकलं. मराठी असूनही एव्हढं मराठी मला झेपण्यापलीकडलं. क्लिष्ट का होईना पण मराठी शब्दच वापरायचे हा आग्रह (का दुराग्रह!) संपादकांचा का लेखकाचा ते कळायला मार्ग नाही. पण मला भाषेचा सार्थ अभिमान असूनही असं म्हणावंसं वाटतं की अर्थ समजण्यास अडचण येणार असेल तर मराठीऐवजी मूळ इंग्रजी शब्द वापरायला हरकत नसावी. शेवटी भाव समजणं महत्त्वाचं. असो. एकंदरीत आजच्या काळातल्या  ज्ञान, अभ्यास, व्यासंग, संशोधन इत्यादी गोष्टींवर जे आक्रमण होऊ लागलं आहे, मेंदू बाजूला ठेवून फॉरवर्ड होईल त्यावर विश्वास ठेवायची जी वृत्ती बोकाळली आहे त्यावर हा लेख विस्ताराने भाष्य करतो. तरीही क्लिष्ट मराठी शब्द टाळता आले असते आणि लेख थोडा अधिक आटोपशीर करता आला असता असं वाटलं.

मीडियामध्ये आफ्रिकन देशांबद्दल फारसं लिहून येत नाही. आणि त्याबद्दल मुद्दाम काही जाणून घ्यावं इतका वेळ आणि उत्साह नसतोच आपल्याकडे. ह्या देशांचा इतिहास आणि सध्या तिथे काय चाललंय ह्याबद्दलचा मोहन द्रविड ह्यांचा लेख वाचनीय आहे. 

पुरातत्त्वशास्त्र हा माझ्या उत्सुकतेचा विषय राहिलेला आहे. 'अर्ली इंडियन्स' ह्या टोनी जोसेफ ह्यांच्या पुस्तकाचा उल्लेख वाचून वाचायच्या पुस्तकांच्या यादीत हे नाव टाकतेय. तूर्तास भारतीय म्हणजे कोण, कुठून आले आणि कसे अश्या प्रश्नांचा उहापोह करणारी त्यांची ह्या अंकातली मुलाखत डोळे उघडणारी आणि खूप रंजक माहिती देणारी. 

काय खावं आणि काय खाऊ नये ह्याबद्दल आजकाल सगळीकडे लिहून येत असतं. त्यात बऱ्याचदा विसंगत माहिती असते. आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस गोंधळून जातो. ह्यात एक sane voice म्हणता येईल अश्या ऋजुता दिवेकर. त्यांच्या ह्या विषयांवरच्या मतांवर लिहिलेला राजेश्वरी देशपांडे ह्यांचा लेख आपल्या आहाराविषयी जागरूक असणाऱ्या सर्वानी वाचण्यासारखा. अभिजित बेनर्जी ह्यांनी खाद्यसंस्कृतीवर दोन पुस्तकं लिहिली आहेत हे मला ह्या लेखातून समजलं.

मारुती चितमपल्ली ज्यांना माहीत आहेत त्यांना माधवराव पाटील हे नावसुद्धा परिचयाचं असणार. माझ्याही होतं. त्यांच्या आयुष्यावर विस्ताराने लिहिणारा रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ ह्यांचा लेख वाचून ह्या कुटुंबाला भेटून यायला हवं असंच वाटतं. 

भारतीय रागसंगीत आपुलकीने शिकणाऱ्या परदेशी मंडळींबद्दल वाचून आपल्याला ह्याबाबत काहीच माहिती नाही ह्याचं पुन्हा एकदा वैषम्य वाटलं. 'मी पाहिलेला संघ' हा मुकुंद कुलकर्णी ह्यांचा लेख वाचून कुठल्याही शाखेत पाय न ठेवताही आपलं संघाविषयी मत योग्य आहे ह्याची खात्री पटली. अर्थात सध्याचा संघ पाहता एकनाथ रानडे ह्यांच्यासारखी विचारसरणी असणारे लोक कधीकाळी संघात होते ह्याचंच आश्चर्य वाटलं. सायबर फ्रॉड ह्याबद्दल, बिहार, झारखंड इथल्या sophisticated cells वर बरंच काही लिहून आलंय. तरी रवी आमले ह्यांचा ह्यावरचा लेख चक्रावून टाकतोच. 

'परबची अजब कहाणी' ही  मुकुंद प्रभुदेसाई ह्यांची कथा आवडली पण श्याम मनोहर ह्यांची 'एका गुंडाची आत्महत्या आणि जीवनाची गोष्ट' ही कथा पूर्णपणे डोक्यावरून गेली. मेघश्री दळवी ह्यांच्या ३ भविष्यवेधी कथा आवडल्या. रॉय किणीकरांचं अप्रकाशित साहित्य मला तरी झेपलं नाही.

एकूणात मनोरंजन आणि बौद्धिक खाद्य दोन्हीचा खुराक अंकातून भरपूर मिळाला :-)