'दुर्गांच्या देशातून' चा ह्या वर्षीचा दिवाळी अंक 'एव्हरेस्ट विशेषांक' आहे हे पाहून मस्त वाटलं.
संपादकांनी प्रस्तावनेत लिहिलंय की जरी त्यांनी एव्हरेस्ट सर केलेल्या अनेक लोकांना लेख लिहिण्याबद्दल संपर्क केला होता तरी त्यांना फार थोडे लेख मिळाले. सगळयांना लिहायचा उत्साह असतोच असं नाही आणि असला तरी ते जमेलच असंही नाही. अंकातले काही लेख वाचून ते कोणीतरी संपादित करायला हवे होते असं वाटलं. लेख म्हणजे नुसता माहितीचा पुरवठा नव्हे. अश्या लेखांना काही वर्षांपूर्वी महत्त्व होतं पण हवी ती माहिती एका बटणाच्या क्लिकवर मिळायच्या हल्लीच्या जमान्यात ती वाचणं रटाळ वाटू शकतं. एव्हरेस्ट सर करताना आलेल्या अनुभवांविषयी वाचताना उत्सुकता असते ती तयारी कशी केली, काय अडचणी आल्या, त्यावर मात कशी केली, प्रत्यक्ष चढाईच्या वेळी काय अनुभव आले, मन:स्थिती कशी होती ह्याविषयी.
त्या दृष्टीने गणेश मोरे, द्वारका डोखे, मिलिंद रासकर, कुंतल जोईशेर, चंद्रकला गावित आणि उमेश घेवरीकर ह्यांचे लेख विशेष आवडले. शिवकाळातल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळं म्हणून घोषित केलं त्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती देणारी विकास खरगे ह्यांची डॉ. लता पाडेकर ह्यांनी घेतलेली मुलाखत माहितीपूर्ण आहे.
संपादकांनी सर्व लेखकांची ओळख प्रस्तावनेत न करता प्रत्येक लेखाच्या आधी द्यायला हवी हे दर वर्षीप्रमाणेच ह्याही वर्षी जाणवलं.
बेस केम्पपर्यंत ट्रेक करायचा म्हटलं तरी किती तयारी करायला लागेल ह्याची अंधुकशी जाणीव हा अंक वाचून झाली. आणि पुढल्या १-२ वर्षात काही करून हे जमावायलाच हवं हे भान आलं :-(

No comments:
Post a Comment