ह्या वर्षीच्या 'किल्ला'ची सुरुवात चंद्रशेखर बुराडे ह्यांच्या 'द्रष्टा दुर्गस्थापत्यकार' ह्या लेखाने झाली आहे. लेखाचे शीर्षक आणि लेखकाचा आर्किटेक्ट हा पेशा वाचून लेखात त्या अनुषंगाने सविस्तर विश्लेषण वाचायला मिळेल असं वाटलं होतं. पण लेखात यंदा जागतिक वारसास्थळ म्हणून मान्यता मिळालेल्या १२ किल्ल्यांचा जुजबी उल्लेख आहे आणि बाकीची माहितीसुद्धा विस्कळीत वाटली. खरं तर ह्यातल्या प्रत्येक किल्ल्याच्या बांधणीवर आर्किटेक्चरच्या बाबतीत एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. नाळ, नेढे, पदर असले शब्द ट्रेकर्सच्या परिचयाचे असले तरी सामान्य लोकांना त्याबद्दल कमीच माहिती असते. किल्ल्यावरच्या विहिरी, मंदिरं, भुयारे, देवड्या, वास्तू, बुरुज ह्यांच्या बांधकामावर बरंच काही लिहिता येऊ शकतं. आशा आहे की दुर्ग, किल्ला किंवा दुर्गांच्या देशातूनचे संपादक ह्यावर विचार करतील.
मराठी साम्राज्याच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून मान्यता दिली आहे ह्याचं प्रतिबिंब 'किल्ला' ह्या विषयाला वाहिलेल्या सगळ्या अंकांत ह्या वर्षी पडणार हे सांगायला कुठल्या ज्योतिष्याची गरज नाही. पण 'दुर्गांच्या देशातून' मध्ये ह्यावरची सविस्तर मुलाखत आधीच वाचली असल्याने आणि 'मराठा लष्करी स्थापत्य - महाराष्ट्र धर्माच्या प्रतीकांचा आंतरराष्ट्रीय गौरव' हे शीर्षक वाचून एड. आशिष शेलार ह्यांचा लेख संपूर्णपणे वाचायची अजिबात इच्छा झाली नाही. शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य उभं केलं ते हिंदुस्थानात राहणाऱ्या सर्वांसाठी होतं. त्यांच्या स्वतः:च्या सैन्यात, शासनात अनेक धर्मांचे लोक होते. हिंदू धर्म असलेल्या लोकांनी गैरवर्तणूक केली तर त्यांना कठोर शिक्षा झाली. त्यात 'आपला तो बाब्या' असला प्रकार कधीच नव्हता. पण इतिहासातलं सोयीस्कर तेव्हढंच उचलायचं आणि जे सोयीस्कर नाही त्याचा वेगळा नेरेटिव्ह सेट करायचा हाच पायंडा पडलाय. लेख चाळला तेव्हा किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत शासन बरंच काही करणार आहे असं कळलं. ही बोलाची कढी ठरू नये म्हणजे मिळवलं. नाहीतर राज्याची सध्याची स्थिती म्हणजे तिजोरीत खडखडाटाचीच आहे. बाकी ह्या वारसायादीत नसलेल्या अनेक किल्ल्यांची अवस्था काय आहे हे सुद्धा ह्या सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी अंकातले बाकीचे लेख वाचून जाणून घेतलं असेल अशी आशा करू यात. त्यांनासुद्धा चांगले दिवस आणा म्हणावं आता. असो.
पुढल्या अनेक लेखांतून कधी न ऐकलेल्या अनवट किल्ल्यांविषयी खूप छान माहिती मिळाली - कालिंजर (यशोधन जोशी), पुराना किला (डॉ. प्रसाद बर्वे), रिअल फेलीफ (अमित सामंत), साजरा गोजरा (अनिकेत वाघ) आणि बेतूल / खोलगड (संदीप मुळीक). जुनागड (संदीप तापकीर) आणि जिंजी (अमर श्रीरंग साळुंखे) हे लेख वाचून ह्या किल्ल्यांबद्दलसुद्धा बरंच काही नव्याने कळलं.
किती किल्ले पाहायचे राहिलेत हे लक्षात येऊन छाती दडपून गेली. त्याहूनही अधिक महत्त्वाचं म्हणजे किल्ले डोळसपणे पाहता यावेत म्हणून किती वाचावं आणि समजून घ्यावं लागणार आहे त्याचीही कल्पना आली. ह्या विषयात नवख्या असणाऱ्याने कशी तयारी करावी ह्यावर एखाद्या अंकात वाचायला आवडेल.
'पोळेदुर्ग' हा एड. सीमंतिनी नूलकर ह्यांचा मधमाश्यांची पोळी आणि किल्ले ह्यातलं साम्य उलगडून दाखवणारा, 'हो ची मिन्ह सिटी'तल्या सैन्याने अमेरिकन सैन्याशी दिलेल्या कडव्या झुंजींबद्दल सांगणारा राजीव खांडेकर ह्यांचा, आसाममधील तोफांच्या वापराबद्द्लच्या इतिहासावरचा डॉ. तेजस गर्गे ह्यांचा आणि शिवराई नाण्यांवरचा पुरुषोत्तम भार्गवे ह्यांचा हे लेख सुरेख आहेत.

No comments:
Post a Comment