अंकाची सुरुवात 'त्यांना काही सांगायचंय' ह्या विभागातल्या गुलजार, विनोदकुमार शुक्ल, खुशवंत सिंग, भीष्म सहानी, शरद जोशी, मंटो , इस्मत चुगताई ह्यांनी लिहिलेल्या कथांनी झालेय. पुन्हा एकदा आपण हिंदी साहित्यातलं काही म्हणजे काही वाचलेलं नाहीये हे प्रकर्षाने जाणवलं. दरवर्षी हे नव्याने लक्षात येतं आणि मग कामाच्या धबडग्यात राहून जातं :-(
'अनुभवांची पटकथा' विभागात नवाजुद्दीन सिद्दीकी, शबाना आझमी, बोमन इराणी ह्यांच्यासारख्या चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्तींनी आपले अनुभव लिहिलेत. मारुती चितमपल्ली, नारायण सुर्वे ह्यासारख्या साहित्यिकांनी, हरिहरन, उषा उत्थुप ह्यांच्यासारख्या गायकांनी लिहिलंय. अशोक हांडे, गिरीश कुलकर्णी, मल्लिका अमर शेख ह्यांच्या आठवणी आहेत. त्याचसोबत संदीप वासलेकर, मिलिंद जोशी, ईश्वरचन्द्र हलगे ह्या निदान मला तरी माहीत नसलेल्या व्यक्तींचे अनुभवसुद्धा आहेत. आपली ओळख हरवून बसलेल्या निराधार व्यक्तींसोबत काम करताना डॉ. राजेंद्र धामणे ह्यांना आलेले अनुभव मन विषण्ण करून जातात.
'मला उमजलेला माणूस' ह्या विभागात पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, राज कपूर, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, झाकीर हुसेन अश्या अनेक प्रसिध्द्व व्यक्तींवरचे लेख आहेत. 'विशेष लेख' विभागातले जीवनानंद दास ह्यांच्या 'वनलता सेन' ह्या कवितेवरचा लेख आणि 'नेहरू गेले त्यावेळची गोष्ट' हा नारायण सुर्वे ह्यांचा लेख विशेष आवडले.
'सांगण्यासारखे' ह्या विभागातल्या लेखांत सुशीलकुमार शिंदे, अच्युत पालव, धरिकांत बोजेवार, शुभदा चौकर ह्यांच्यासोबत आणखी अनेक व्यक्तींच्या आठवणींचा कोलाज आहे.
ह्या व्यक्तींच्या आठवणी म्हणजे त्या त्या काळातल्या घटनांचं आणि पर्यायाने त्या काळाचंसुद्धा एक डॉक्युमेंटेशन आहे. फक्त आपल्याच अनुभवातून शिकायचं म्हटलं तर हे आयुष्य थोडं आहे. म्हणून हे अनुभव वाचणं एक वाचक म्हणून आणि एक माणूस म्हणून समृद्ध करून जाणारंच.

No comments:
Post a Comment