'महा अनुभव' च्या ह्या वर्षीच्या दिवाळी अंकाच्या सुरुवातीला सुहास पळशीकर ह्यांचा लेख आहे. त्यांचं वृत्तपत्रातलं लिखाण मी वाचलंय. पण खरं सांगायचं तर लेखाच्या 'ज्ञानव्यवहारांवरील आक्रमण' ह्या शीर्षकाने मला बुचकळ्यात टाकलं. मराठी असूनही एव्हढं मराठी मला झेपण्यापलीकडलं. क्लिष्ट का होईना पण मराठी शब्दच वापरायचे हा आग्रह (का दुराग्रह!) संपादकांचा का लेखकाचा ते कळायला मार्ग नाही. पण मला भाषेचा सार्थ अभिमान असूनही असं म्हणावंसं वाटतं की अर्थ समजण्यास अडचण येणार असेल तर मराठीऐवजी मूळ इंग्रजी शब्द वापरायला हरकत नसावी. शेवटी भाव समजणं महत्त्वाचं. असो. एकंदरीत आजच्या काळातल्या ज्ञान, अभ्यास, व्यासंग, संशोधन इत्यादी गोष्टींवर जे आक्रमण होऊ लागलं आहे, मेंदू बाजूला ठेवून फॉरवर्ड होईल त्यावर विश्वास ठेवायची जी वृत्ती बोकाळली आहे त्यावर हा लेख विस्ताराने भाष्य करतो. तरीही क्लिष्ट मराठी शब्द टाळता आले असते आणि लेख थोडा अधिक आटोपशीर करता आला असता असं वाटलं.
मीडियामध्ये आफ्रिकन देशांबद्दल फारसं लिहून येत नाही. आणि त्याबद्दल मुद्दाम काही जाणून घ्यावं इतका वेळ आणि उत्साह नसतोच आपल्याकडे. ह्या देशांचा इतिहास आणि सध्या तिथे काय चाललंय ह्याबद्दलचा मोहन द्रविड ह्यांचा लेख वाचनीय आहे.
पुरातत्त्वशास्त्र हा माझ्या उत्सुकतेचा विषय राहिलेला आहे. 'अर्ली इंडियन्स' ह्या टोनी जोसेफ ह्यांच्या पुस्तकाचा उल्लेख वाचून वाचायच्या पुस्तकांच्या यादीत हे नाव टाकतेय. तूर्तास भारतीय म्हणजे कोण, कुठून आले आणि कसे अश्या प्रश्नांचा उहापोह करणारी त्यांची ह्या अंकातली मुलाखत डोळे उघडणारी आणि खूप रंजक माहिती देणारी.
काय खावं आणि काय खाऊ नये ह्याबद्दल आजकाल सगळीकडे लिहून येत असतं. त्यात बऱ्याचदा विसंगत माहिती असते. आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस गोंधळून जातो. ह्यात एक sane voice म्हणता येईल अश्या ऋजुता दिवेकर. त्यांच्या ह्या विषयांवरच्या मतांवर लिहिलेला राजेश्वरी देशपांडे ह्यांचा लेख आपल्या आहाराविषयी जागरूक असणाऱ्या सर्वानी वाचण्यासारखा. अभिजित बेनर्जी ह्यांनी खाद्यसंस्कृतीवर दोन पुस्तकं लिहिली आहेत हे मला ह्या लेखातून समजलं.
मारुती चितमपल्ली ज्यांना माहीत आहेत त्यांना माधवराव पाटील हे नावसुद्धा परिचयाचं असणार. माझ्याही होतं. त्यांच्या आयुष्यावर विस्ताराने लिहिणारा रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ ह्यांचा लेख वाचून ह्या कुटुंबाला भेटून यायला हवं असंच वाटतं.
भारतीय रागसंगीत आपुलकीने शिकणाऱ्या परदेशी मंडळींबद्दल वाचून आपल्याला ह्याबाबत काहीच माहिती नाही ह्याचं पुन्हा एकदा वैषम्य वाटलं. 'मी पाहिलेला संघ' हा मुकुंद कुलकर्णी ह्यांचा लेख वाचून कुठल्याही शाखेत पाय न ठेवताही आपलं संघाविषयी मत योग्य आहे ह्याची खात्री पटली. अर्थात सध्याचा संघ पाहता एकनाथ रानडे ह्यांच्यासारखी विचारसरणी असणारे लोक कधीकाळी संघात होते ह्याचंच आश्चर्य वाटलं. सायबर फ्रॉड ह्याबद्दल, बिहार, झारखंड इथल्या sophisticated cells वर बरंच काही लिहून आलंय. तरी रवी आमले ह्यांचा ह्यावरचा लेख चक्रावून टाकतोच.
'परबची अजब कहाणी' ही मुकुंद प्रभुदेसाई ह्यांची कथा आवडली पण श्याम मनोहर ह्यांची 'एका गुंडाची आत्महत्या आणि जीवनाची गोष्ट' ही कथा पूर्णपणे डोक्यावरून गेली. मेघश्री दळवी ह्यांच्या ३ भविष्यवेधी कथा आवडल्या. रॉय किणीकरांचं अप्रकाशित साहित्य मला तरी झेपलं नाही.
एकूणात मनोरंजन आणि बौद्धिक खाद्य दोन्हीचा खुराक अंकातून भरपूर मिळाला :-)

