Saturday, September 6, 2025

१०. दुर्गांच्या देशातून (दिवाळी अंक २०२४) (किंमत रुपये ४००)

अंक उघडला आणि दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा वाटून गेलं की अंकात लेख लिहिलेल्या सगळ्या लेखकांची माहिती एकदम संपादकीय सदरात देण्याऐवजी प्रत्येक लेखाच्या आधी दिली असती तर अधिक सयुक्तिक झालं असतं. एव्हढी सगळी माहिती एकादमात कोणी वाचत असेल का हा प्रश्नच आहे. वाचली तरी प्रत्येक लेख वाचताना त्या लेखकाबद्दल आठवणं कठिण. न आठवलं तरी पुन्हा मागे जाऊन संपादकीय वाचायचा उत्साह आणि वेळ किती जणांकडे असणार? म्हणजे ही माहिती देऊन उपयोग काहीच नाही. 

असो. अंकातील पहिला लेख आग्रा ते राजगड हा १६०० किलोमीटरचा पायी प्रवास २००६ मध्ये ३३ दिवसात पूर्ण केलेल्या कुलदीप देसाई ह्यांचा. तो वाचून मनोमन त्यांना अक्षरश: लोटांगण घातलं. एव्हढी गैरसोय सोसून मी काही ह्या फंदात पडले नसते. वाटेत लागलेल्या गावातल्या एखाद्या छोट्या पण छान मंदिरविषयी त्यांनी लिहिलेलं वाचून वाटतं आता ते मंदिर असेल काय? देसाई आणि त्यांच्या चमूने गावात थांबावं म्हणून आग्रह करणाऱ्या लोकांविषयी वाचून वाटतं असे लोक आता गावातूनही राहिले नसतील. कालाय तस्मै नम:. दुसरं काय म्हणणार?

दरवर्षीप्रमाणे हिमालयातल्या ट्रेकिंगवरचा एखाद लेख वाचला की बेस केम्प पर्यंत ट्रेक करायची इच्छा पुन्हा उचल खाते. संभाजी गुरव आणि लहू उघडे ह्यांचे  लेख वाचून पुन्हा तेच वाटलं. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी वाया चालली असताना हे स्वप्न हिमालयापेक्षाही दुर्गम वाटतंय. असो. पिंडारी ग्लेशिअर ट्रेक वरचा डॉ. लिली जोशी ह्यांचा लेख फार आवडला. विजयदुर्ग, रतनगड, हरिश्चंद्रगड, कंधारचा  किल्ला, पन्हाळगड ते विशाळगड ट्रेक, कोथळीगड आणि तुंगी ह्या किल्ल्यांवरचे लेख खास. उष:प्रभा पागे हे नाव ऐकून होते. पण त्यांच्यावरचा लेख वाचून अधिक माहिती मिळाली. 'पाचशेच्या नोटेची भुताटकी' हा वेगळा लेखसुध्द्दा आवडला. 

'किल्ला' हा माझ्या आवडत्या दिवाळी अंकांपैकी एक. त्याची सुरुवात आणि आजवरची वाटचाल ह्यावरसुद्धा एक छोटेखानी लेख आहे. मराठी माणसं एकमेकांचे पाय ओढण्यासाठी प्रसिध्द्व असताना एका संपादकाने त्याच विषयावरच्या दुसऱ्या अंकावरील लेख आपल्या अंकात समाविष्ट करणं आवडून गेलं.

दुसऱ्या राज्यातल्या किल्ल्यांबद्दलची माहिती हा ह्या अंकाचा विशेष. ह्या वर्षी राजस्थानमधले मेहरानगड, भानगड, हैदराबादचा गोवळकोंडा (हा मी पाहिलाय) आणि उदगीरचा भुईकोट ह्या गडांवर लेख आहेत. 

अन्य सदरांत व्यावसायिक गिर्यारोहण, किल्ल्यांवरील पक्षी आणि प्राणी, संभाजी राजांनी लिहिलेला बुद्धभूषणम, गडकिल्ल्यांचे संवर्धन, गडावर रस्ता चुकलेले ट्रेकर्स  किंवा अपघातात जखमी झालेले किंवा प्राण गमावलेले पर्यटक/गिर्यारोहक ह्यांच्यासाठी राबवलेल्या मोहिमा अश्या अनेक विषयांवरचे लेख आहेत. 

लेखांच्या ह्या विविधतेमुळेच हा अंक संग्राह्य आहे. आता २०२५ च्या अंकाची वाट पाहतेय.