Showing posts with label Play. Show all posts
Showing posts with label Play. Show all posts

Friday, March 22, 2019

संगीत चि. सौ. कां. रंगभूमी

बघायच्या असलेल्या नाटकांची लिस्ट मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढतच चालल्याचं अलीकडेच लक्षात आलं. तेव्हा एप्रिल-मेंच्या उन्हात नाटक पाहायला बाहेर पडायचं टाळायचं असेल तर दुपारच्या झोपेचं खोबरं करून विकांताला नाटक पहावं लागेल हेही जाणवलं. सुदैवाने चि. सौ. कां. रंगभूमीचा प्रयोग पुढल्याच विकांताला होता तेव्हा निर्णय बदलायच्या आधी तिकीट काढून आले.

तरी नाटक सुरु व्हायच्या आधी थोडी धाकधूक होतीच. ह्यात संगीत नाटकातली पदं येतील तेव्हा झोप तर लागणार नाही ना. J ही भीती अनाठायी होती हे पहिल्याच पदात पक्कं झालं. मग मात्र मी सगळी पदं आणि अख्खं नाटक मस्त एन्जॉय केलं. संगीत मानापमान, संगीत शारदा, संगीत संशयकल्लोळ ह्यासारख्या माहित असलेल्या आणि संगीत बावनखणी ह्या कधी नावही न ऐकलेल्या नाटकातल्या, ज्यांचे आजवर फक्त शब्द वाचले होते अशा कशी ह्या त्यजू पदाला, नरवर कृष्णासमान सारख्या पदांवर माझी मान डोलताना पाहून ही माझीच मान आहे ह्यावर माझाच विश्वास बसेना. ‘अवघे पाउणशे वयमान’ तर मला फार आवडलं. फक्त प्रेक्षकात बहुतकरून सिनियर सिटीझन्सचा भरणा असल्याने त्यातल्या ‘अवघे पाउणशे वयमान’ असणाऱ्या काकांना ते ऐकून काय वाटलं असेल ह्याची मात्र उत्सुकता राहिली J

बरं, नाटकात नुसती संगीत नाटकातली पदं नव्हती तर काही जुन्या प्रसिध्द नाटकातले प्रसंगही होते. त्यात ‘तो मी नव्हेच’ मधला ‘तो मी नव्हेच’ म्हणणारा लखोबा लोखंडे पाहिला. ‘नटसम्राट’ मधले आप्पासाहेव बेलवलकर आपल्या भूमिकांबद्दल बोलताना पाहिले. ‘ती फुलराणी’ तल्या फुलराणीचा ‘तुला शिकवीन चांगला धडा’ ऐकलं. मोरूच्या मावशीचं ‘टांग टिंग टिंगाक’ ऐकलं. काही वर्षांपूर्वी पाहिलेल्या ‘हमिदाबाईची कोठी’ तला सत्तार ग्रामोफोन कोठीवर आणतो तो प्रसंग पाहिला. मस्त वाटलं.

मला शास्त्रीय संगीतातलं काहीच कळत नाही. पण सगळे गायक-गायिका छान गायले असं मला वाटलं. सर्वांनीच जीव ओतून अभिनय करून मराठी नाट्यभूमीचा इतिहास समोर उभा केला. फक्त संपदा-जोगळेकरची फुलराणी थोडी वयस्कर वाटली. अर्थात आता मला कुठे भक्ती-बर्वे पाहायला मिळणार. तेव्हा दुधाची तहान ताकावर हे आलंच.

अजून लिस्टमध्ये एपिक गडबड, व्हेक्युम क्लीनर, चल तुझी सीट पक्की, मोरूची मावशी, सोयरे सकळ, गुमनाम है कोई आणि द परफेक्ट मर्डर ही सारी नाटकं आहेत.

नाटक अभी बाकी है मेरे दोस्त J 

Thursday, May 24, 2018

नाटक नाटक

नाटक बघण्याची आवड मला कशी, का आणि कधीपासून लागली हे आता मलाच आठवत नाही. पण लागली एव्हढं मात्र नक्की. वर्षातून किमान - तरी नाटकं बघितल्याशिवाय राहवत नाही. अर्थात आधी परीक्षण वाचल्याशिवाय कुठलंही नाटक बघायला धजावत नाही. अपवाद नुकतं पाहिलेलं हेम्लेट. अर्थात त्याचं कथानक माहित होतं आणि कलाकार चांगले आहेत म्हणून हे धाडस केलं म्हणा.

ह्या वर्षीचं पाहिलेलं पाहिलं नाटक म्हणजे 'संगीत सौभद्र'. काही वर्षांपूर्वी कोणी मला तू 'संगीत' नाटक पाहणार असं सांगितलं असतं तर मी त्याला किंवा तिला वेड्यात काढलं असतं. पण ह्या वर्षाच्या सुरुवातीला केलेल्या अनेक निश्चयांपैकी एक म्हणजे निदान एक तरी संगीत नाटक पाहायचंच. सौभद्र म्हणजे महाभारतातल्या अर्जुन-सुभद्रा प्रेमविवाहावरआधारित. म्हणजे कथानक तसं परिचयाचं. शास्त्रीय संगीतातलं मला फारसं काही कळत नसल्याने आनंद भाटे आणि राहुल देशपांडे ही नावं फक्त ऐकून माहित. तरी धीर करून तिकीट बुक केलं. सोबत आलेल्या मैत्रिणीला 'माझा डोळा लागला तर उठव' हेही बजावून झालं. पण मजा अशी की नाटक पाहताना डोळा अजिबात लागला नाही. हे खरं की शास्त्रीय संगीतातलं कळतं अश्या एखाद्या व्यक्तीइतकं मी नाटक नसेल एन्जोय केलं. पण तरी माझ्या परीने मी नाटकात गुंतले. आश्चर्य म्हणजे त्यातली - अपवाद वगळता बहुतेक सगळी पदं - राधाधर मधुमिलिंद, प्रिये पहा, नभ मेघांनी आक्रमिले, नच सुन्दरी करू कोप, वद जाऊ कुणाला शरण - मी लहानपणी ऐकलेली होती. रेडिओवर ऐकली असणार हे नक्की कारण घरात कोणाला शास्त्रीय संगीताची आवड वा जाण नव्हती. मला सगळ्यात काम आवडलं ते कृष्ण झालेल्या आनंद भाटे ह्यांचं. अभिनय पेशा असलेल्या नटासारखा सराईत अभिनय नसला तरी कृष्णाचा खटयाळपण, कावेबाजपण आणि धूर्तता त्यांनी व्यवस्थित साकार केली. त्यामानाने अर्जुन झालेल्या अंगद म्हसकरला वाव थोडा कमीच मिळाला. सुभद्रा आणि रुक्मिणी बनलेल्या अभिनेत्री भूमिकेच्या वयाचा विचार करता बर्याच थोराड वाटत होत्या. बलराम झालेल्या अभिनेत्याचं काम मात्र मला खूप आवडलं. कदाचित तो एकही पद गायला नाही म्हणून असेल :-) एकुणात आयुष्यातलं पहिलंवहिलं संगीत नाटक मी पचवलं.

आणि मग दुसरं संगीत नाटक बघायचं ठरवलं. टेक्निकली 'देवबाभळी' हे संगीत नाटक नव्हे. त्यात संत तुकारामांचे अभंग संगीतबध्द करून वापरले आहेत. तुकारामांची बायको आवडी/आवली आणि विठ्ठलाची बायको रखुमाई ह्या दोन स्त्रियांनी पेलून धरलेलं हे नाटक. आवली तुकारामांच्या विठ्ठलभक्तीमुळे आणि त्यांच्या संसारात होणार्या दुर्लक्षामुळे त्रासलेली, आयुष्यातल्या अडचणी एकटीने सोडवताना गान्जलेली तर रुक्मिणी सदोदित भक्तांचा विचार करणाऱ्या नवर्यावर चिडून दिंडीरवनात निघून गेलेली. नवर्याला दुपारी जेवण द्यायला निघालेल्या गर्भार आवलीच्या पायात बाभळीचा काटा मोडतो आणि तो काढण्याच्या यत्नात ती ठेचकाळून पडून बेशुध्द होते. तिला सावरायला ती ज्याची 'काळतोंड्या' म्हणून निर्भत्सना करत असते तो विठ्ठलच धावून येतो. आणि मग तिची काळजी घ्यायला तो रखुमाईला सांगतो. आवलीच्या घरी येऊन तिच्या घरातलं स्वयंपाकपाणी, झाडलोट करत तिची शुश्रुषाही करणाऱ्या रखुमाईचं आणि तिचं एक वेगळं नातं जुळतं. दोन बायका एकत्र आल्या की त्यांच्यात खटके उडणारच. तसे ते उडतात पण तरी एका परीने त्यांच्या दु:खाची जात एकच असते. तो धागा कुठेतरी जुळतो. कधी शब्दांनी संवाद होतो तर कधी शब्दांशिवाय. दोघींना आपल्या वागण्यातल्या चुका कळतात, कसं जगावं ते कळतं, गैरसमजुतींचं मळभ विरतं. आवलीचा पाय बरा होतो आणि रखुमाईच्या मनातली जखमसुध्दा.

मला हे नाटक 'संगीत सौभद्र' पेक्षाही जास्त आवडलं. एकतर दोन बायकांनी सगळं नाटक पेलून धरलं त्याचं मला खूप कौतुक वाटलं. दोघींचा अभिनय सुरेख आणि गळाही. नाटकाचं नेपथ्य हा माझ्या दृष्टीने फार नवलाईचा भाग राहिलंय. ह्या नाटकाचं नेपथ्य खूपच सुरेख होतं. प्रकाशाच्या माध्यमातून इंद्रायणीच्या पात्राचा जो देखावा उभा केलाय त्याला तोड नाही. आवलीच्या घरातलं छोटं स्वयंपाकघर, दोघी नदीकाठी असताना पाउस येणं, रखुमाईनं इंद्रायणीच्या पात्रात लुगडी धुणं, स्वयंपाकघरात भाकर्या भाजणं हे सगळे प्रसंग जिवंत करण्यात नेपथ्य, प्रकाशयोजना आणि अभिनय तिन्हीचा सुरेख संगम झालाय. एक वेगळ्या धर्तीचं नाटक पाहिल्याचं समाधान पुरेपूर मिळालं.

आता हेम्लेटबद्दल. “टू बी ऑर नॉट टू बी' ह्या वाक्याने अजरामर झालेला हा डेन्मार्कचा राजपुत्र. कथा तशी ढोबळमानाने माहित असली तरी हेम्लेट, त्याचा बाप, आई आणि काका ह्या पात्रांखेरीज अन्य पात्रं मला माहित नव्हती. ह्या नाटकाशी झी मराठीचा काहीतरी संबंध आहे एव्हढं वाचलं होतं. त्यामुळे "टू परचेस ऑर नॉट टू परचेस' असा प्रश्न तिकीटाबद्दल पडणं साहजिक होतं. कारण टुकार सिरियल्स काढणे आणि चांगल्या सिरियल्सचीसुध्दा वाट लावणे ह्या उद्योगात झी मराठीवाल्यांचा हात कोणी धरू शकत नाही. बरं, कथानक विदेशी, त्यातली पात्रं, संस्कृती, संवाद, पोशाख सगळं विदेशी. हे सगळं ह्यांना कितपत झेपेल अशी शंका होतीच. पण धीर करून तिकीट काढलंच.

नाटक सुरु होतं तेच मुळी हेम्लेटच्या मित्राला, होरेशिओला, रात्रीचे गस्त घालणारे पहारेकरी राजाच्या वेषातली एक विचित्र आकृती आपल्याला दिसली असं सांगतात त्या प्रवेशाने. रात्रीची गूढता, महालाच्या प्रवेशद्वाराजवळची सुरक्षा आणि अचानक प्रकट होणारी पांढर्या वेषातली ती आकृती सगळं इतकं सुरेख जमलं होतं की आपण तिकीट काढून योग्य तेच केलं ह्याची मला खात्री पटली :-) नाटक उत्तरोत्तर रंगत गेलं. काही अपवादात्मक शब्दबंबाळ संवाद वगळता नाटकाचं विदेशीपण फारसं जाणवलं नाही हे नाटकाच्या टीमचं यशच म्हणावं लागेल. हेम्लेटच्या कामासाठी सुमित राघवनला खूप टाळ्या पडल्या पण मला खरं सांगायचं तर त्याच्यापेक्षा क्लॉडीयस झालेल्या तुषार दळवीचा अभिनय जास्त आवडला. क्लॉडीयसचा धूर्तपणा, कावेबाजपणा, त्याला वाटणारी हेम्लेटची भीती सगळं सगळं त्याने डोळे, आवाज आणि अंगबोलीतून सही वठवलंय. आता हा आणखी काय कारस्थानं करणार आहे अशी रास्त भीती आपल्याला नाटकभर वाटत राहते. त्याखालोखाल मला होरेशिओ झालेल्या आशिष कुलकर्णीचं काम आवडलं. हेम्लेटविषयीची काळजी, त्याला मदत करायची इच्छा, त्यातून आलेलं हताशपण त्याने सुरेख दाखवलाय. भूषण प्रधानचा लेआर्टिस रुबाबदार वाटला. त्याची आणि हेम्लेट शेवटची लढाई लुटुपुटूची वाटली नाही हे विशेष. पोलोनियस मात्र थोडा विनोदी वाटला. मुग्धा गोडबोलेची पतीशी प्रतारणा करणारी, मुलाच्या वेड्या आचरणाने भांबावलेली, त्याला सत्य कळल्यावर त्याला घाबरणारी आणि शेवटी पश्चात्तापदग्ध होणारी राणी गरत्रुड (काय पण विचित्र नाव!) भावली. पण मनवा नाईकची ओफेलीया काही मला कळली नाही. कदाचित कधीकाळी मूळ नाटक वाचलंच तर समजेल अशी आशा आहे.

सुरुवात तर चांगली झालेय. बघू या ह्या वर्षी अजून कुठली नाटकं पाहायला मिळतात ते. :-)

Sunday, January 1, 2017

अमर फोटो स्टुडीओ

२०१६ मधलं पाहिलेलं हे शेवटचं नाटक. म्हणजे तशी वर्षाची अखेर चांगलीच झाली म्हणायची.

'गरज असते तेव्हाच दिसतो' ही ह्या स्टुडीओची ओळख. अपूर्व आणि त्याची गर्लफ्रेंड तनू ह्या दोघांना त्याची गरज भासायचं काय कारण? अपूर्व उर्फ अपू ह्याची कहाणी थोडी अजब आहे. त्याच्या घराण्यात २७वं वर्षं लागलं की पुरुष गायब होतात. त्याचे खापरपणजोबा, पणजोबा, आजोबा, वडील सगळ्यांची तीच गत. आणि अपू २७ वर्षांचा झालाय. त्यामुळे आता आपणही असेच गायब होणार हा विचार त्याला छळतोय. तनूची वेगळीच गोष्ट. तिच्या लहानपणी लव्ह मेरेज केलेल्या आईवडिलांचा डिव्होर्स होऊन वडील घर सोडून निघून गेल्यापासून तिचा प्रेमावरचा विश्वास उडालाय. त्यात अपू पीएचडीसाठी अमेरिकेला जाणार तेव्हा Long Distance Relationship ला काही भविष्य नाही हेही तिला ठाऊक आहे. त्यातून ह्या दोघांचे खटके उडताहेत. व्हिसासाठी फोटो काढायला ती अपुला बळेबळेच घराबाहेर काढते आणि एका रस्त्यावर त्यांना दिसतो अमर फोटो स्टुडीओ. तिथला विक्षिप्त वागणारा फोटोग्राफर-कम-मालक त्यांचे फोटो काढतो आणि हे दोघे भूतकाळात जाऊन पोचतात. अपु पोचतो १९४२ मध्ये आणि तनू १९७६ मध्ये. का पोचवतो त्यांना स्टुडिओ नेमक्या त्याच काळात? त्यांचं असं काय काम तिथे असतं की जे पूर्ण झाल्याखेरीज त्यांना तिथून वर्तमानकाळात येता येणार नसतं? त्यांच्या नात्यातला तिढा सोडवतो का हा अमर फोटो स्टुडीओ?

ह्या नाटकातली आवर्जून लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे ह्यात काम केलेल्या तरुण कलाकारांचा अतिशय सुरेख अभिनय आणि त्यांच्यातली प्रचंड उर्जा. नवंकोरं नाटक असल्याने संवादसुध्दा आजच्या काळाला अनुरूप आणि आजच्या काळातले रेफरन्सेस असलेले. त्यामुळे हे नाटक पाहताना वेगळीच मजा येते. ह्यातल्या बऱ्याचश्या गोष्टी आपल्याला पटतात. उदा. भूतकाळ आणि भविष्यकाळ हे relative असतात. म्हणजे १९४२ सालच्या एखाद्या माणसासाठी देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हा भविष्यकाळ आहे तर २०१६ मध्ये असलेल्या आपल्यासाठी तो भूतकाळ. तसंच केवळ एखादा काळ जुना आहे म्हणून त्यातलं सगळंच सेपिया टेन्टेड, छान, सुरेख असं असू नाही शकत. आणि आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे एखाद्या अंधाऱ्या खोलीत चाचपडतोय असं वाटून चिडचिड होते कधीकधी. पण तरीही भूतकाळात गेलो म्हणून पुढे काय घडणार आहे हे माहीत असलं तरी त्याही जगण्यात मजा नाही. फक्त एकच आहे - पूर्ण नाटक पाहूनही अपुच्या घरातल्या पुरुषांच्या २७ व्या वर्षी गायब होण्यामागे हा अमर फोटो स्टुडीओच होता की नाही हे स्पष्ट झालं नाही. :-)

मग कधी जाताय स्टुडीओत फोटो काढायला?

Tuesday, August 16, 2016

वाडा चिरेबंदी (Spoiler Alert!)

ह्या नाटकाबद्दल, खरं तर ह्या संपूर्ण Trilogy बद्दल खूप वाचलं होतं. जेव्हा मुंबईत त्याच्या दोन भागांच्या (वाडा चिरेबंदी आणि मग्न तळ्याकाठी) एकत्रित सादरीकरणाच्या जाहिराती यायला लागल्या तेव्हा आधी दोन्ही नाटकं एकदम बघावीत असा विचार केला होता. पण मग लक्षात आलं की कदाचित ते आपल्याला पेलवणार नाही. कारण ह्या नाटकाचा विषय तसा गंभीर आणि माझा पिंड हलकीफुलकी किंवा रहस्यप्रधान नाटकं पहाण्याचा. फारसं विचार करायला लावणारं झेपत नाही म्हणा ना. मग फक्त वाडा चिरेबंदीचं तिकीट काढायचं आणि मग्न तळ्याकाठी पुढेमागे कधीतरी पहायचं असं ठरवलं. नाटकं आत्ताच आली आहेत त्यामुळे प्रयोग लगेच बंद होण्याची भीती नाही.

नाटकाचा विषय फारसा नवा नाही....निदान सध्याच्या काळात तरी. कोकणावरच्या अनेक कादंबर्यातून ह्याआधीही हाताळला गेलाय. एव्हढंच काय तर झी मराठी वरून रोज रात्री १०:३० वाजता प्रसारित होणाऱ्या 'रात्रीस खेळ चाले' मध्ये सुध्दा ह्या व्यक्तिरेखांचं प्रतिबिंब आहे. कोकणातला शंभर-सव्वाशे वर्षं जुना ऐसपैस वाडा, काप गेले आणि भोकं राहिली अशी गत झालेला. सध्याच्या पिढीत त्याची डागडुजी करण्याची आर्थिक क्षमता नाही आणि कदाचित तेव्हढा उत्साहही नाही. घरात वाडवडिलार्जीत सोन्याचे दागिने भरपूर. पण कुळकायद्यात बहुतेक साऱ्या जमिनी गेलेल्या. तरीही जुनीच शान कायम ठेवायची अजिबात परवडत नसलेली केविलवाणी धडपड. वाड्यात राहणाऱ्या मोठ्या भावाचा मुलगा पराग, गावात दहावीच्या पलीकडे शिक्षणाची सोय नाही आणि शहरातल्या मार्कांच्या लढाईत निभाव लागणार नाही म्हणून गावातच राहून वाया गेलेला. त्याची धाकटी बहिण रंजू पिक्चरचं वेड डोक्यात घेऊन बसलेली, दहावी पास झाली की उजवायची एव्हढाच आईवडिलांचा तिच्या भविष्याचा विचार. देशपांडेंचा मोठा मुलगा भास्कर पूर्वीची शान कायम ठेवायचा यथाशक्ती प्रयत्न करतोय पण त्यात आपण कमी पडतोय ही जाणीव आहेच. त्याची बायको, मुलांची काळजी करणारी, तापट नवरा, वाया गेलेली मुलं, विधवा सासू आणि ऐकू येत नसलेली परिस्थितीचं भान नसलेली आजेसासू अशी कसरत सांभाळणारी. भास्करची बहिण प्रभा, इच्छा असूनही वडिलांच्या नसत्या कुळाभिमानापायी शिकण्याची संधी न मिळालेली. सांगून आलेली 'बडा घर पोकळ वासा' अश्या घरातल्या कमी शिकलेल्या, व्यसनी मुलांची स्थळं नाकारल्याने बिनलग्नाची राहिलेली. तिचा भाऊ चंदू, वेगळं दुकान टाकून आपला चरितार्थ चालवायची इच्छा असूनही भावाने नकार दिला म्हणून घरात फुकट राबणारा. आणि भास्कर, प्रभा, चंदू ह्यांची आई - नवरा गेल्यावर आता आपलं ह्या घरातलं कर्त्या स्त्रीचं स्थान संपुष्टात आलंय हे वास्तव सहज स्वीकारणारी, चंदू आणि प्रभा दोघांच्या दु:खाची जाणीव असूनही आपल्याला काही करता आलं नाही ह्याची खंत करणारी. वडील गेल्याचं निमित्त होऊन घरातला मुंबईकर झालेला मुलगा सुधीर पत्नीसह घरी येतो तिथे नाटक सुरु होतं. आणि मग सुरु होतो तो मानवी नात्यांच्या गुंतागुंतीचा खेळ.

सुधीरला राग आहे भास्करने इतकी वर्षं शेतीचं उत्पन्न त्याला वाटा न देता स्वत: खाल्ल्याचा. भास्कर म्हणतो की कुळकायद्यात जमिनी गेल्या आणि उरलेले पैसे वडिलांच्या आजारात गेले. पण त्याने सुधीरच्या शिक्षणाचा खर्च तर केला ना. सुधीर म्हणतो ते पैसे त्याच्या वाटणीच्या जमिनीतून आलेल्या उत्पन्नाचे. प्रभा भावांनी आपल्याला शिकायला मदत केली नाही म्हणून कावलेली तर पराग मुंबईला जायचा हट्ट धरून बसलेला. रंजूला पिक्चर्स सोडून दुसरं काही दिसत नाही. सुधीरची बायको ह्या सगळ्यातून नामानिराळी राहू पहातेय. वडिलांच्या कार्याला गावजेवण घालायचं हा भास्कर आणि त्याच्या बायकोचा परवडत नसतानाही असलेला हेका. त्यात सुधीरने पैशाची मदत करावी ही अपेक्षा. आईचं मत 'त्यांच्यासाठी शेवटचा खर्च करायला हवा' हे तर आटोपशीर करायला काय हरकत आहे हा सुधीरचा सवाल. आपल्याला आपला वाटा मिळायला हवा हेही त्याच्या मनात आहे. एके दिवशी धुमसत असलेल्या ह्या कोंडीचा स्फोट होतो आणि भास्कर आणि सुधीर ह्यांचं वाजतं. चिरेबंदी वाड्याचे चिरे निखळायला सुरुवात होते.

पडदा वर गेल्यावर पहिल्यांदा नजरेत भरतो तो नाटकाचा सेट. अनेक वर्षांपूर्वीच्या कोकणातल्या एकेकाळी वैभवशाली पण आता कळा आलेल्या वाड्याचा अप्रतिम सेट आपल्याला थेट कोकणात घेऊन जातो. कंदिलाची वात हळू केल्यावर किंवा विझवल्यावर झालेला काळोख तर मस्तच. खरं तर सगळ्याच कलाकारांनी जीव ओतून काम केलं आहे. पण मला लक्षात राहिल्या त्या ३ व्यक्तिरेखा - तिन्ही स्त्रियांच्या. मी स्वत: एक स्त्री असल्याने असेल कदाचित. पहिली व्यक्तिरेखा भास्करच्या बायकोची. निवेदिता जोशी सराफना मी आधी कधी नाटकात पाहिलं नव्हतं. त्यातून 'रात्रीस खेळ चाले' तल्या निलीमा आणि सरिता व्यक्तिरेखा पाहून ही वहिनी सुध्दा अशीच स्वार्थी असेल असं वाटलं होतं. पण सुखद धक्का मिळाला. भास्कर आणि सुधीरची आई म्हणते तसं स्वार्थ कोणाला सुटलाय? वहिनी आहे थोडी स्वार्थी, सुधीरने वडिलांच्या कार्यात पैश्याची मदत करावी असं तिलाही वाटतं. परागला मुंबईला शिकायला नेलं नाही म्हणून ती सुधीरवर नाराजही आहे. पण स्वत:च्या नवर्याला दागिने उशाशी ठेवायच्या ऐवजी तिजोरीत ठेवा आणि ज्याचे त्याला देऊन टाका म्हणून स्वच्छ सांगण्याची दानत आणि हिंमत आहे तिच्याकडे. सासरे गेल्यावर घराच्या चाव्या कनवटीला लावल्या तिने, घरातला कारभार हातात घेतला पण त्याबरोबर आलेल्या कर्तव्याची जाण पुरेपूर ठेवली. 'मागे वळून घराकडे पाहू नका. तुमचे पाय अडखळतील' असं सुधीरला सांगताना 'पत्र पाठवा' असंही सांगायला ती विसरत नाही. पेटीतले सगळे दागिने अंगावर घालून तिने म्हटलेला संवाद खास. प्रेक्षकातल्या प्रत्येक सुनेला आणि सासूला त्यात आपला भास झाला असेल हे नक्की. नऊवारी नेसून त्या दिसल्यात सुध्दा गोड. ही वहिनी मला नेहमी लक्षात राहील. ही भूमिका जुन्या नट संचात कोणी केली होती पहायला हवं. अरे हो, नऊवारीवरून आठवलं, आता थोडं पुलं. च्या नानभावजींच्या नाटकातली चटणी कलरची साडी लक्षात राहिलेल्या वहिनीसारखी गत आहे माझी, पण ह्या नाटकातल्या नऊवारी खूप छान होत्या.

दुसरी लक्षात राहणारी व्यक्तिरेखा म्हणजे ह्या सगळ्या भावंडांच्या आईची. आता आपली सद्दी संपली हे तिने शांतपणे कोणताही त्रागा न करता मान्य केलंय. कदाचित सासूचं तसं झालेलं पाहिलं असेल म्हणून असेल कदाचित. 'नंतर हे दागिने माझ्या परागची बायको घालेल' असं म्हणणारया वहिनीच्या तेव्हढ अजून लक्षात आलेलं दिसत नाही हा मानवी स्वभावाचा आणखी एक कंगोरा. प्रभा आणि चंदू दोघांच्या दु:खाची जाणीव त्यांच्या आईला पुरेपूर आहे. त्याबद्दल आपण आतापर्यंत काहीही करू शकलो नाही ह्याची खंत आहे. पण आता मात्र आपण त्यांना त्यांचा हक्क मिळवून द्यायचा, मग त्यासाठी भांडावं लागलं तरी बेहत्तर हा निर्धार आहे. 'सोनं गेलं ते बरंच झालं, भांडणाचं मूळ गेलं' असं म्हणण्याइतपत शहाणपण आहे आणि 'ओरडू नकोस, अजून तुला बरंच काही पहायचं आहे' हे सुधीरला ऐकवण्याइतकं द्रष्टेपणसुध्दा आहे. 'तू आणि मी एकत्र राहू' असं ह्या आईला तिची दोनच मुलं म्हणतात - प्रभा आणि चंदू. लग्न झाल्यावर लोकांच्या प्रायोरिटीज कश्या बदलतात हे ह्यावरून कळून यावं. नेहमी घालूनपाडून बोलणाऱ्या नवऱ्याचं 'दिवसपाणी नीट झालं नाही तर मनाला रुखरुख लागून राहील' असं ती जेव्हा म्हणते तेव्हा ही बाई पटत नाही मला, कळत तर नाहीच नाही, तिचा राग येतो पण तरीही तिच्या वाकलेल्या कंबरेपेक्षा तिचा ताठ कणाच दिसतो.

तिसरी व्यक्तिरेखा ह्या सगळ्या भावंडांच्या आजीची. काहीही ऐकू न येणारी, आजूबाजूला काय चाललंय ह्याची जाणीव नसलेली अशी ही आजी. नाटकाचा बहूतेक भाग ही एकतर झोपून असते नाहीतर 'व्यंकटेशा, किती वाजले' एव्हढंच विचारत असते. पण तिच्या स्वत:च्या जगात म्हटलेलं तिचं एक स्वगत मनाला आतून हलवून जातं. कोणाची एव्हढी परवड होऊ नये असं वाटतं. 'सुखी जीव' असं तिचं वहिनीने केलेलं वर्णन पटतं आणि खूप खूप दुखावून जातं.

वैभव मांगले आणि प्रसाद ओक ह्यांनी म्हटलेले काही संवाद ऐकू आले नाहीत एव्हढा एकच दोष काढता येईल. बाकी प्रयोग 'दृष्ट लागण्यासारखा' म्हणतात तसा. नाटकाचा शेवट तर खूपच सुरेख.

'मग्न तळ्याकाठी' बघायची खूप इच्छा आहे पण तो किती अस्वस्थ करेल ह्याची भीती वाटते. पाहू. ठरवू.

Saturday, July 30, 2016

कोडमंत्र

मी ह्या ब्लॉगवर अनेकदा म्हटल्याप्रमाणे लोकसत्तात परिक्षण वाचल्याशिवाय मी सहसा कुठलंही नाटक बघायला जात नाही. पण कोडमंत्र बद्दल बरंच वाचलं होतं. A Few Good Men  हे एरॉन सोर्कीन ह्या लेखकाचं गाजलेलं नाटक. ह्याचे ब्रॉडवेवर तर प्रयोग झालेच पण ह्यावर एक इंग्रजी सिनेमाही निघाला. इतरही अनेक भाषांत त्याचे प्रयोग झाले. आपल्या देशात निदान गुजराती रंगभूमीवर तरी 'कोडमंत्र' ह्याच नावाने ह्याचे प्रयोग झाल्याचं माझ्या वाचनात आहे. त्यामुळे नाटक चांगलंच असणार ह्याची खात्री होती. तसंही A Few Good Men हा सिनेमा मी कधी पूर्णपणे पाहिलेला नाहीच.

नाटकाच्या कथेला पार्श्वभूमी आहे ती अर्थातच भारतीय सेनेची. सुरुवात होते ती रवी शेलार नावाच्या मराठा रेजिमेंटमधल्या एका सैनिकाने आपल्या आईला लिहिलेल्या पत्राने. त्याने लिहिलेलं असतं की तिथलं ट्रेनिंग खूप खडतर आहे आणि त्याच्या प्रकृतीला ते झेपत नसल्याने त्याने बदलीचा अर्ज केलाय. मग तिला पुढली बातमी मिळते ती त्याच्या मृत्यूची. तो मृत्यूही नैसर्गिक नाही तर खून. आणि तो खून केलेला असतो तो प्रत्यक्ष त्याच्या मोठ्या भावाने विक्रम शेलारने. ती हबकून जाते. आपल्या मोठ्या मुलाला वाचवण्यासाठी प्रख्यात मिलिटरी लॉयर अहिल्या देशमुखकडे जाते. घडलेल्या घटनेला साक्षीदार असल्याने तुमच्या मुलाला वाचवायला मी फारसं काही करू शकेन असं वाटत नाही हे अहिल्या तिला प्रांजळपणे सांगते. पण रवीच्या आईचं म्हणणं एकच - माझा मुलगा असं करू शकत नाही. तो निर्दोष आहे. त्यात सरकारतर्फे प्रसिध्द वकिल विश्वास राजेशिर्के काम पहाणार आहेत अस कळतं. त्यामुळे अहिल्याला कुठेतरी पाणी मुरतंय असा संशय यायला लागतो. ती ही केस घ्यायचं ठरवते. आणि इथेच आपली ओळख होते ती 'कोडमंत्र' ची. काय असतो हा 'कोडमंत्र'? त्याचा आणि कुठल्याही प्रकारच्या सेनेचा काय संबंध? तो आवश्यक की जुलुमी? रवी शेलारच्या मृत्यूशी त्याचा काय संबंध?

कर्तव्यदक्षता आणि कर्तव्याचा अतिरेक ह्यातली सीमारेषा फार धुसर असते हे नक्की. सैन्यात शिस्त ही असलीच पाहिजे हेही नक्की. पण म्हणून माणुसकी विसरली जाता कामा नये हे नाटक पाहिल्यावर अत्यंत प्रकर्षाने जाणवतं. आपल्याकडे सैन्य, सीमा, शत्रूदेश ह्या विषयावर अनेक चित्रपट निघालेत पण रंगभूमीवर फारशी नाटकं आली नाहीत. ४०-५० माणसांचा संच घेऊन प्रयोग करणं तितकं सोपंही नाही म्हणा. पण हे आव्हान ह्या टीमने लीलया पेललं आहे. अगदी सीमेवरच्या तळाच्या सेटपासून ते मधूनमधून कवायत करत जाणाऱ्या सैनिकांपर्यंत सगळं काही आपल्याला आपण नाटक पाहतोय ह्याचा विसर पाडतं. मुक्ता बर्वे आणि अजय पुरकर दोघांचाही अभिनय लाजवाब पण बाकीच्या सगळ्यांची सुध्दा त्यांना उत्तम साथ मिळालेय.

कर्नल निंबाळकरांचं एक मत मात्र मला अगदी पटलं - इस्त्रायलमध्ये जसं तरुणांना वयात आल्यावर लष्करी शिक्षण दिलं जातं तसं आपल्या देशातही करायला हवं. मी तर असंही म्हणेन स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता हा नियम सर्व तरुणांना लागू करण्यात यावा. त्यामुळे एक तर आपल्या सैनिकांना किती खडतर परिस्थितीत काम करावं लागतं ह्याची जाणीव राहील आणि दुसरं हे की देशात एकूणच जो 'चलता है' चा भोंगळ गलथान कारभार आहे तो दूर व्हायला मदत होईल.

देशभक्तीपर मेसेजेस फॉरवर्ड करण्याइतपतच देशभक्ती उरलेल्या आपल्या देशात प्रत्येकाने आवर्जून बघावं असंच हे नाटक आहे.

Tuesday, July 5, 2016

A Walk In The Woods

I have become a fan of Jamaluddin Lutfullah. Never thought I would say this of a Pakistani diplomat. But then this diplomat is from a make-belief world of a play. The funny thing, though, is that I suspect that the play mirrors the reality of the situation very well. Who knows, there might be real-world Ramchandra Chinnappas and Jamaluddin Lutfullahs trying their very best to arrive at an agreement somewhere in a room in Geneva.

My beef with the British is not so much about their having ruled this country. We were stupid enough to let them rule us. Period. What I will never forgive them for is dividing this country into two before they left and creating a lifelong headache for us and instability for the whole region. Of course, there is no saying that Hindus and Muslims would have lived happily together forever in a united India, especially in this age of ISIS and other extremist organizations. But then that would have been an internal matter. They had no business dividing us. And again, we were stupid enough to fall for the 'Divide and Rule' strategy. But this whole partition has created a sort of a rainbow of emotions as far as the next-door neighbors are concerned. We hate them, they hate us, we mistrust them, they mistrust us. We gape at the cricketers who slap each other on the backs during the match breaks, count their counterparts in the 'enemy' country among their friends and yet, play as if their whole life depends on it, against each other, year after year. Sometimes in our life we meet ordinary Pakistanis, like I did in France, and wonder how can they be so much like us. They are not supposed to be nice people, isn't it? We read about efforts being made to bring together ordinary people from both sides of the border to clear up the misunderstanding and applaud the efforts, even hope that they will succeed. There is a news about some Pakistani or another being treated in India, his surprised reaction at being treated so nicely and their heartfelt thanks. Then there is a blast somewhere, or border infiltration in which 'our' Jawans are killed or there is an idiot who blows himself up to smithereens taking innocent lives with him. And we are back to zero. We hate them, they hate us, we mistrust them, they mistrust us. We wish an earthquake would swallow Pakistan whole. Maybe they wish the same for us. The clock has never stopped resetting itself since 1947. Will it ever?

That's the question that this play attempts to answer. So we have the two diplomats, Jamaluddin from the Pakistani side and Ramchandra from the Indian, slogging it out to reach an agreement in Geneva. There is a world of a difference in their approaches. Ramchandra is new on the scene though he is a skilled negotiator. He is very earnest, takes his work seriously and not interested in anything that could jeopardize the assignment that he is tasked with. In short, a very very tightly wound clock. Jamaluddin, on the other hand, has been at it since a few years. He has learnt to take things a bit casually, doesn't mind idle chitchat, even comes across as a bit cynical at times but its equally dedicated. So the two of them don't get along initially. In fact, Ramchandra hates the very thought of coming to the woods for walks when they have so much of work to do. Yet, they keep coming there. He hates to chat about anything that is not related to the proposal that he has helped shape up. Yet, they talk of this and that. They both know what they are up against. Ramchandra knows that Jamaluddin is known to change subjects and delay discussion on vital points. Jamaluddin knows that Ramchandra can say No where it matters. They both also know that the other side is bound to reject any proposal that can possibly be looked upon as the peace effort of its neighbor. When it comes to negotiation, neither side is willing to concede even an iota of an inch. And they both are aware of the huge trust deficit that we have run up since the partition. Yet they keep talking, doing their very best to reach an accord - till at one point it all seems pointless. And then we notice the elephant in the room - are the neighbors really interested in reaching an agreement? Can we ever become friends? Will this ever end any other way than the mushroom cloud? Does peace have a chance?

It's amazing to watch what a pair of seasoned actors can do with a set that consists of a few props with images of cut-down trees painted on them, an elevated platform serving as a walkway in a park, a bench and 2-3 stools shaped like tree stumps. The judicious use of sounds of people talking or laughing, a plane passing overhead and machines cutting down trees transports us to the Geneva park. Naseeruddin Shah comes across as a wily, shrewd and yet affable sort of a guy, who has seen-it-all. You suspect that in his heart he knows that nothing will come of this and yet he gives it his best shot. Rajit Kapur has portrayed the sincere, no-nonsense Ramchandra very well. The dialogues are crisp, witty at times and yet force you to think, to ponder, to wonder. And you cannot help but wish that they succeed.

The play ended on a very subtle note. So subtle in fact that even after the curtain call some of the spectators were wondering if the play was over :-)