Sunday, March 16, 2025

८. उत्तम अनुवाद (दिवाळी अंक २०२४) (किंमत रुपये ३५०)

दरवर्षी हा अंक घ्यावा का घेऊ नये असा मला प्रश्न पडतो. मागच्या एका वर्षीच्या अंकातली बरीच भाषांतरं मला कृत्रिम वाटली होती. मूळची कथा त्यामुळे दुर्बोध झाली असावी असंही वाटून गेलं होतं. पण ह्या वर्षी एकदा पुन्हा वाचून पाहावा म्हणून घेऊन आले. पण ह्या वर्षीही तसाच काहीसा अनुभव आला. त्यामुळे फक्त आवडलेल्या कथांबद्दल इथे लिहीते.

त्यातली पहिली गोष्ट ऑस्कर वाईल्डची 'मतलबी राक्षस'. लहान मुलांसाठीच्या गोष्टी वाचूनही अनेक वर्ष झाली आहेत. आता वाचल्या तर बऱ्याच गोष्टी अर्थातच बालिश वाटतात. पण ही गोष्ट आवडली. कदाचित खऱ्या परिकथेची, बालकथेची ओळख हीच असावी का? कुठल्याही वयात वाचली तरी आवडू शकेल अशी?

मला आवडलेली दुसरी गोष्ट डबल्यू सॉमरसेट मॉमची 'आजीवन ऐषोआरामाची कहाणी'. असं वाटलं की वयाच्या ४० किंवा ५० व्या वर्षी रिटायर्ड व्हायचं आहे तर किती सेव्हिंग्ज असावं हा प्रश्न विचारणाऱ्या सगळ्या लोकांनी ती वाचायला हवी.

तिसरी गोष्ट अर्थात एगथा ख्रिस्तीचं 'द माउसट्रॅप' हे नाटक. मुळात इंग्रजीतून वाचायला आवडलं असतं. पण आता समोर आलंच तर वाचून टाकलं. मजा म्हणजे खुनी कोण ह्याचा संशय आधीच आला होता. कदाचित काही वर्षं आधी वाचलं असतं तर आला नसता. आता इतक्या रहस्यकथा वाचनात येतात की 'व्यासोच्छिष्टम जगद सर्वम' का काय म्हणतात त्यातला प्रकार झाला आहे. 

तामिकी हारा ह्यांची 'भग्न अवशेषांमधून' ही हिरोशिमा-नागासाकी वरच्या हल्ल्यानंतरची भयाण परिस्थिती वर्णन करणारी गोष्ट वाचून हादरायला झालं. एकटी अमेरिका अण्वस्त्रसज्ज असताना ही गत तर आता जवळपास प्रत्येक राष्ट्र असली अस्त्रं बाळगून असताना एक ठिणगी पडली तर जगाचं काय होईल हा विचारसुद्धा करवत नाही. एलिस मन्रोची 'मुलगे आणि मुली' ही गोष्ट वाचून 'मुलीची जात' ही कल्पना जगात सगळीकडे थोड्याफार फरकाने तशीच आहे हे जाणवलं. पण शेवटचं वाक्य विचार करायला लावणारं आहे हे निश्चित.

'इकाल आणि त्याची शाळा' (जेव्हीअर पेनालोसा) ही मला आवडलेली आणखी एक गोष्ट. ती सुखांतिका आहे हे आणखी एक विशेष. मला ट्रॅजेडीज आवडत नाहीत.

मला आवडलेली ह्या अंकातली शेवटची कथा म्हणजे सर आर्थर क्किलर काऊचची 'फ्योडोर हिमकॉफने पाठविलेल्या भेटवस्तू'. 

'कविता' विभागातली एक कविता मात्र प्रचंड अस्वस्थ करून गेली. इतकी की 'कोण बाबा हा रमिन मजहर' म्हणून गुगलून पाहिलं. तर मूळचा अफगाणिस्थानचा असलेला आणि आता पेरीसमध्ये राहात असलेला हा कवी आणि पत्रकार. फारसीमधून लिहितो. त्याची 'मी माझ्या मातृभूमीला परत जाऊ शकलो तर' ही कविता अशी:

मी माझ्या मातृभूमीला परत जाऊ शकलो तर

मी माझी पुस्तके गोळा करेन

माझे आवडते कपडे

माझी रोजनिशी, फोटोंचा आल्बम

खिडकीच्या चौकटीत सुकून गेलेली फुले

आणि बरोबर घेईन माझा जन्मदाखला

पण माझ्या मित्रांची थडगी?

Saturday, March 15, 2025

1. Hermann Simon - Hidden Champions of the 21st Century

2. Ralph Wanger - A Zebra in Lion Country

3. Seth Klarman - Margin of Safety: Risk-Averse Value Investing Strategies for the Thoughtful Investor

4. Joel Greenblatt - ‘The Little Book That Still Beats the Market’ and ‘You Can Be a Stock Market Genius'


Saturday, March 1, 2025

७. महाअनुभव (दिवाळी अंक २०२४) (किंमत रुपये २५०)

कधीकधी अंकाच्या सुरुवातीचा लेख पूर्ण अंक वाचण्याचा मूड ठरवतो. असं होऊ नये पण माझ्याबाबतीत होतं खरं. सुदैवाने ह्या अंकाची सुरुवात सुहास पळशीकर ह्यांच्या 'मिथ्याकथनाच्या विळख्यात' ह्या लेखाने झाली आहे. टीव्ही, इंटरनेट, वर्तमानपत्रं ह्यातून आजकाल जो असत्य, दुही माजविणाऱ्या माहितीचा भडीमार चालू आहे त्यावर ह्या लेखात सखोल चिंतन आहे. ते वाचून डोकं शाबूत असलेला कोणताही माणूस काळजीत पडेल.

टेलर स्विफ्टबद्दल बरंच काही ऐकून असले तरी मी तिची गाणी काही ऐकलेली नाहीत. राजेश्वरी देशपांडेंचा 'टेलर स्विफ्ट नावाचं जांभळं धुकं' हा लेख वाचून ती गाणी एकदा ऐकून पाहावी असं वाटलं. 'जनुकं जेव्हा कात्रीत सापडतात' हा लेख वैद्यकीय पार्श्वभूमी नसलेल्या वाचकांना क्लिष्ट वाटू शकेल. मी खूप वाचायला घेतला पण अर्धवट सोडून दिला. क्लिष्ट वैद्यकीय माहिती सोपी करून सांगणाऱ्या डॉ. शंतनू अभ्यंकर ह्यांची आठवण झाली. काही वर्षांपूर्वी त्यांचा गर्भाच्या वाढीच्या प्रवासाचा लेख वाचून अवाक व्हायला झालं होतं. असो.

उत्तराखंडमधल्या वनगुज्जरांबद्दल कधी काही वाचनात आलं नव्हतं. ह्या भटक्या लोकांच्या आयुष्याचं त्यांच्या सोबत प्रवास करून, राहून दस्तावेजीकरण करणाऱ्या मायकल बेननाव्हचं खूप कौतुक वाटलं. विटा ह्या सांगलीतल्या दुष्काळी भागातल्या लोकांनी सोनं गाळायच्या व्यवसायात शिरून आपली आणि गावाची भरभराट कशी केली ते 'विटा दुष्काळी झळा ते सुवर्णझळाळी' ह्या लेखात वाचायला मिळतं. मराठी माणूस धंद्याला कसा नालायक हे वाचून वाचून वैताग येतो. त्यामुळे हा लेख वाचून नाही म्हटलं तरी बरं वाटलं :-)

नवऱ्याचं कौतुक करणारे 'आमचे हे' छाप लेख वाचायची सवय झाल्याने 'विमल आणि मी' हा नरेंद चपळगावकर ह्यांनी त्यांच्या 'ही' वर लिहिलेला लेख वाचून सुखद धक्का बसला.

अस्मिता पोतदार ह्यांची भरतकाम करून काढलेली चित्रं पाहून अक्षरश: अवाक व्हायला होतं. देव काय कला ठेवतो एकेकाच्या हातात. पण ह्या कलाकृतींना किंमत नाही हे वाचून वाईट वाटलं. 

यशोदा वाकणकर ह्यांचा वडील अनिल अवचट ह्यांनी अनेक वर्षांपूर्वी बिहार दुष्काळाच्या वेळेस केलेल्या पूर्णिया प्रवासाचा मागोवा घेण्यासाठी केलेल्या प्रवासावरचा लेख आवडला. माझी आई जेव्हा तिचं बालपण जिथे गेलं त्या जागांविषयी सांगते तेव्हा तिथे जाण्याचा मोह होतोच. अगदी त्या जागा आता ओळखू न येण्याइतक्या बदलल्या असतील हे माहीत असूनसुद्धा. त्यात अन्न न मिळाल्याने जिथे अन्न मिळू शकत होतं त्या घराच्या दरवाज्याबाहेर मरण पावलेल्या एका गरीब महिलेबद्दल वाचून कसंतरीच होतं.

कोकणातल्या पेशंटवरचा डॉ. मिलिंद कुलकर्णी ह्यांचा लेख छान जमलाय. ह्या वर्षीही त्यांचा लेख वाचायला आवडेल.

इटालीतल्या माफिया युद्धात बळी गेलेल्या लोकांचं आणि ह्या भीतीच्या सावटाखाली जगणाऱ्या सर्वसामान्य लोकांचं आयुष्य आपल्या केमेर्यात बंदिस्त करणाऱ्या लेंटिसीया बतालया वर नितीन दादरवाला हयांनी लिहिलेला लेख वाचून एव्हढी रिस्क घेऊन हे काम करणाऱ्या ह्या बाईची कमाल वाटते. तिने काढलेले काही फोटो ह्या लेखात आहेत. ते पाहून तेव्हाच्या तिथल्या भीषण परिस्थितीची कल्पना येते.

ह्या वर्षीही दिवाळीत हा अंक घेईन बहुतेक. 

६. ऋतुरंग (दिवाळी अंक २०२४) (किंमत रुपये ३००)

अंकाच्या सुरुवातीलाच गुलजारांचा फोटो पाहून खुश झाले. पण पुढचाच विभाग कवितांचा आहे म्हटल्यावर 'अरे बाप रे!' अशीही प्रतिक्रिया झाली कारण कविता बहुतकरून समजत नाहीत असाच अनुभव आहे :-)

पण वसंत आबाजी डहाके ह्यांचा गुलजारच्या कवितेवरचा लेख समजला आणि आवडला देखील. सुरुवात तर चांगली झाली म्हणायची. मग ह्या मालिकेतले पुढले सारेच लेख आवडले. मी कवितेवर एव्हढा खोल विचार करतच नाही हेही जाणवलं. शब्दाचे वरवरचे अर्थ लावून सोडून द्यायची सवय लागली आहे. पण कविता ह्याहून अधिक वेळ आणि विचार मागते. 

मी हिंदी सिनेमा फारसा पाहत नाही. पण 'स्त्री' युनिव्हर्स मधले 'मुंज्या' सोडला तर बाकीचे सारे चित्रपट आवडले होते. नुकताच 'स्त्री २' पहिला. खरं तर तो एव्हढा आवडला नाही. पण त्यातलं पंकज त्रिपाठीचं काम आवडलं होतं. 'तोच क्षण होता' हा 'मनामनातले आवाज' ह्या विभागातला त्यांचा पहिलाच लेख आवडला. ह्या विभागातले बाकीचे लेखही आवर्जून वाचण्यासारखे. 

सोनम वांगचुक ह्यांनी त्यांच्या उपोषणावरचा आणि धीरज अकोलकर ह्यांचा महायुद्धामुळे जन्मलेल्या मुलांच्या मानवाधिकार न्यायालयात लढलेल्या लढाईवरचा लेख वाचून सुन्न व्हायला झालं.

'असहमतीचा आवाज' ह्या विभागात अनेक जणांनी आयुष्यात कोणाशी असहमत व्हायचे क्षण आले त्याबद्दल लिहिलं आहे. बहुतेकांचा सूर जे केलं ते योग्यच होतं असा होता . एखादा असा किस्सा वाचायला आवडला असता ज्यात हा निर्णय चुकीचा निघाला. पण चुकांची जाहीर कबुली द्यायला कोणाला आवडतं म्हणा असो.

'आतला आवाज' विभागात रॉजर फेडररने हॅनोव्हरमधल्या एका कॉलेजात पदवीदान समारंभाच्या वेळी जून २०२४ मध्ये केलेल्या भाषणाचा अनुवाद वाचायला मिळाला. टेनिस कळत नसूनही ह्या माणसाबद्दल मला फार आदर आहे. हे भाषण मूळ इंग्रजीतून वाचायचं ठरवलंय.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की ह्यांच्या भाषणाचा अनुवादही वाचण्यासारखा आहे. 

मला आणखी खूप आवडलेला विभाग म्हणजे 'संतवाणी'. संत तुकाराम, रामदास, एकनाथ, कबीर आणि शेख महंमदमहाराज ह्यांच्या  रचना उलगडून सांगणारे लेख ह्या सदरात आहेत. संतवाङमय वाचायला वेळ काढायला हवा हे जाणवून गेलं.

'आवाज कोणाचा' ह्या विभागातला सर्वात आवडलेला लेख मृदुला-दाढे जोशी ह्यांचा किशोरकुमारवर लिहिलेला. किशोर इतका ऐकूनही समजून उमजून ऐकलंच नाही ही जाणीव ह्या लेखाने दिली. 

एकुणात जे लेख आवडले त्यांनी निखळ वाचनआनंदापेक्षाही अधिक काही पदरात टाकलं.

Tuesday, February 4, 2025

५. दुर्ग (दिवाळी अंक २०२४) (किंमत रुपये ३५०)

मागच्या महिन्यात सहज म्हणून चेक केलं तर 'किल्ला'चे जवळपास मागचे ८-१० दिवाळी अंक संग्रहात आहेत. त्यामानाने दुर्ग आणि दुर्गांच्या देशातूनचे कमी अंक आहेत. मात्र का ते लक्षात येत नाहीये. २०२४ पासून हे दोन्ही दिवाळी अंक सुद्धा जपून ठेवायचे ठरवलं आहे.

'किल्ला' चा अंक वाचताना लक्ष न गेलेली एक गोष्ट इथे लक्षात आली ती म्हणजे बहुतांश लेख पुण्याच्या लेखकांचे आहेत. नाशिक आणि इतर ठिकाणच्या मंडळींनी सुद्धा लिहिलंय पण मुंबईमधलं कोणी नाही. मुंबईमधूनसुद्धा ट्रेकिंगला जाणारे बरेच लोक आहेत की. पण त्यांचा एकही लेख नाही. ह्याचं कारण काय असावं कळत नाही. असो. २०२४ च्या दिवाळी अंकात एकूण २१ लेख आहेत. 

पैकी पहिला अमित मराठे ह्यांनी लिहिलेला लेख कुठल्याही गड-किल्ल्यावर नसून महाबळेश्वरच्या दक्षिणेला असलेल्या कांदाटच्या जंगलाच्या भटकंतीवर आहे. छान माहिती असलेला हा लेख आपणही ही भटकंती करून यावी असंच वाटायला लावतो. झाशीच्या राणीबद्दल आपण सर्वानीच ऐकलं-वाचलेलं असतं. पण किल्ल्याची माहिती फारशी नसते. अमोल सांडे ह्यांचा लेख राणी लक्ष्मीबाईंच्या आधीपासूनचा झाशीचा इतिहास आणि प्रत्यक्ष किल्ला ह्याबद्दल साद्यन्त माहिती देतो. महाराष्ट्रातले किल्ले बघायला अजून मुहूर्त सापडला नाही तर हे बाकीच्या भारतातले किल्ले कधी पाहणार हा विचार नाही म्हटलं तरी डोक्यात येऊन गेलाच. इलाज नाही :-(

किल्ला म्हटलं की चढायला कितपत सोपा हा विचार आधी मनात येतो. अंकुर काळे ह्यांच्या लोहगडावरच्या लेखात गडाच्या महाद्वाराचा फोटो पाहूनच गडाच्या प्रेमात पडायला झालं. रतनगडाचा उल्लेख आधी वाचनात आलेला असला तरी मृगगड आणि सोनगिरी ह्याबद्दल राज मेमाणे ह्यांच्या लेखातून प्रथमच वाचायला मिळालं. मोडी कागदपत्रांचा अभ्यास करताना ह्या गडांच्या इतिहासाबद्दल त्यांना माहिती मिळाली. आपण मोडीचा अभ्यास सुरु ठेवला नाही ह्याचा पुन्हा एकदा खेद वाटला.

महाबळेश्वरजवळच्या प्रतापगडाविषयी वाचलं होतं आणि जावळीचे खोरं शिवाजी महाराजांनी मोरयांना घडवलेल्या अद्दलीबद्दल वाचून माहीत होतं. पण विदर्भातसुद्धा एक प्रतापगड आहे ही  माहीती नवीन. त्यामुळे विनीत दाते ह्यांचा लेख उत्सुकतेने वाचला. त्यातला गडाच्या वाटेवरच्या जंगलाचा फोटो एव्हढा सुरेख आहे की तो पाहूनच तिथे जायचा मोह व्हावा. गम्मत म्हणजे महाबळेश्वरजवळच्या प्रतापगडाविषयी साईप्रकाश बेलसरे ह्यांनी सुद्धा एक लेख लिहिलेला आहे. भूतकाळात होऊन गेलेल्या राजवटींनी पाडलेली नाणी हा कायमच कुतूहलाचा विषय. निखिल दीक्षित ह्यांनी नाण्यावरच नाही तर दुर्ग-किल्ल्यांवर असलेल्या टांकसाळीवर माहितीपूर्ण लेख लिहिला आहे. मला तर सगळी नाणी सारखीच दिसत होती. :-) वेगळी कशी ओळखतात ते लेखात दिलं होतं तरी बरीच चिन्हे निदान मला तरी नाण्यांवर दिसली नाहीत :-(

रवळ्या-जवळ्याचा फक्त उल्लेख आधीच्या अंकांत वाचला होता. पण टाकीरा आणि चौंगावचा किल्ला ह्यांचा उल्लेख आठवत नाही. म्हणून ह्या सगळ्या किल्ल्यांवरचे लेख वाचायला मजा आली. मोहनगड आणि पारमाची नाळ ट्रेक चा लेख (ओंकार ओक) वाचून आपणच तो ट्रेक केल्यासारखं वाटलं. प्रचितगडाची प्रचिती (डॉ. हेमंत बोरसे) एका फसलेल्या ट्रेकची गोष्ट सांगतो. 'पदरगडाशी झटापट' हा अरविंद देशपांडेंचा लेख वाचून तर त्यांना खरोखर साष्टांग नमस्कार घालावयास वाटला. एव्हढं धाडस काही आपल्याच्यानं झालं नसतं.

किल्ले बाणकोट (शलाका वारंगे) आणि वसंतगड (रेणुका काळे) हे लेख लिहीणार्या लेखिका आहेत हे वाचून सुखद धक्का बसला. नाहीतर हे बहुतांश लेख पुरुष ट्रेकर्सनीच लिहिलेले असतात. त्याबद्दल अर्थातच काही तक्रार नाही. पण तरी एक स्त्री म्हणून ह्या स्त्रियांचे लेख वाचून आनंद वाटला हे कबूल करायलाच हवं :-)

मुडागड (शिवप्रसाद शेवाळे), मिरजन (मिलिंद आमडेकर), तळा-घोसाळगड (संकेत शिंदे) बद्दल सुद्धा कधी ऐकलं नव्हतं. चिपळूण तालुक्यातल्या नवतेदुर्ग, कासारदुर्ग आणि माणिकदुर्गची ओळख राहुल वारंगे करून देतात. संतोष जाधव हयांनी नाणेघाटाजवळच्या निमगिरीवर लिहिलं आहे. त्या लेखातल्या फोटोत किल्ल्याकडे जाणाऱ्या उभ्या पायऱ्या बघून छाती दडपते. अपरिचित दुर्गांबद्दल डिटेल माहिती देणारे असे लेख हे गड-किल्ल्यांना वाहून घेतलेल्या साऱ्याच अंकांचं वैशिष्ट्य आहे. 

अंकाच्या शेवटी रियासतकारांवरचा छोटेखानी लेख नंदन वांद्रे ह्यांनी लिहिलाय. मराठी रियासत (हिचे ८ खंड असावेत असं लेखाच्या शेवटच्या जाहिरातीवरून कळतं), ब्रिटिश रियासत, मुसलमान रियासत (ह्यांचे किती खंड आहेत देव जाणे) हे सगळे वाचायची इच्छा झाली. 

आता खरोखर 'हजार ख्वाहिशें ऐसी' च्या वर ख्वाहिशें झाली आहेत :-) बाकी मनोरथ तडीस नेण्याचं काम देवाजीचं! आपण काय रंगमंचकी कठपुतलिया!

Thursday, January 30, 2025

४. कालनिर्णय (दिवाळी अंक २०२४) (किंमत रुपये ३२५)

पहिल्याच लेखाचं 'आपत्तींची उत्क्रांती' हे शीर्षक वाचून पोटात गोळा आला. अर्थात वर्तमानपत्रात रोजच ह्याबद्दल काही ना काही छापून येतं. आणि बाकी सगळ्या छानछान बातम्या वाचायचं सोडून असल्या वास्तवदर्शी बातम्याच वाचायची खोड असल्याने वाचलं जातं त्यामुळे लेखात काय असेल ह्याचा थोडाफार अंदाज होताच. पण ह्या बाबतीत देशातच काय पण विदेशातही सर्वांचा मौनीबाबा झालाय. जे बाकीच्यांचं होणार तेच आपलं अशी 'जे बदलता येत नाही ते सहन करण्याची शक्ती दे' ह्या प्रार्थनेनुसार भूमिका ठेवली आहे. तरी जे वाचलं त्याने हादरून जायला झालंच. 'दो बिघा जमिनीत' मधल्या ज्या गाण्याच्या ओळी लेखाच्या शेवटी उद्धृत केल्या आहेत त्यातली 'कौन कहे इस ओर तू फिर आये ना आये' ही ओळ समस्त मानवजातीला उद्देशून आहे असंच वाटलं. 

समुद्राची सोबत असलेल्या मुंबईत जन्म झालेला असूनही समुद्रापेक्षा नेहमीच जंगल आणि पर्वत ह्यांचं आकर्षण मला कायम राहिलं. 'भाकरीचा चंद्र' शोधायची अपरिहार्यता शहरात राहायची मजबुरी आहे. त्यामुळे मेळघाटावरच्या सुनील लिमयेंच्या लेखाच्या सुरुवातीचा जंगलाचा फोटो पाहून जीव अगदी एव्हढा एव्हढा झाला. लेख सुरेख आहे पण त्यांनी अजून लिहायला हवं होतं असं वाटलं. कालनिर्णयच्या ह्या वर्षीच्या अंकातसुद्धा त्यांचा लेख वाचायला आवडेल. 'किल्ला' ह्या विषयावर अंक निघू शकतात तर 'जंगल' ह्या विषयावर सुद्धा कोणीतरी दिवाळी अंक काढायला हवा.

'द न्यू यॉर्क बुक ऑफ रिव्ह्यूज' बद्दल मला वाटतं लोकसत्ताच्या 'बुकमार्क' सदरात वाचलं. रॉबर्ट सिल्व्हर्स' ह्या त्याच्या संपादकाची ओळख करून देणारा लेख निळू दामले ह्यांनी लिहिलाय. १९६३ ते २०१७ म्हणजे जवळपास ५४ वर्ष ह्या माणसाने ही जबाबदारी निभावली हे वाचून तर मी मनोमन त्याला दंडवतच घातला. अगदी मृत्यूपर्यंत त्यांनी काम केलं हे वाचून आणखी एक दंडवत. नाहीतर कट्टयावर बसून राजकारणी लोकांवर निरर्थक चर्चा करणारे सिनियर सिटिझन्स रोज पार्कात दिसतातच की.

लावणीची आणि माझी ओळख लहानपणी टीव्हीवर लागलेल्या जुन्या तमाशाप्रधान चित्रपटांतून झालेली. त्यामुळे ह्या कलाप्रकाराबद्दल फारसं चांगलं मत असायचं काही कारण नव्हतं. पण मग लावणीची वेगळी ओळख करून देणारे लेख वाचनात आले आणि मत बदलायला सुरुवात झाली. तरी बैठकीची लावणी ह्या प्रकारची फारशी माहिती नव्हती. ही लावणी सादर करणाऱ्या यमुनाबाई वाईकर ह्यांच्यावर प्रकाश खांडगे ह्यांनी लिहिलेल्या लेखातून ती झाली. 

शास्त्रीय संगीत हा अस्मादिकांच्या घोर अज्ञानाचा आणखी एक प्रांत. त्यामुळे मारुबिहाग आणि प्रभा अत्रे ह्यांच्यावर लिहिलेला अमरेंद्र धनेश्वर ह्यांचा लेख कितपत झेपेल ही धागधुग घेऊनच वाचला. लेखात १९५५ च्या आसपास आलेल्या एका ध्वनिमुद्रिकेवर असलेल्या तरुण प्रभा अत्रेंचा फोटो फार सुरेख आहे.

'नाकमोठा नायक आणि अनुवादित बालसाहित्य' ह्या पंकज भोसले ह्यांच्या लेखात १९९० नंतर मराठी बालसाहित्याची पीछेहाट कशी झाली त्याचा आढावा घेतला आहे. तो वाचून मला 'नंदूचा यांत्रिक माणूस' आणि 'नंदू उडाला आकाशी' ही पुस्तकं शोधण्याचा खटाटोप आठवला. लहानपणी वाचलेली चिनी, जपानी परीकथांची पुस्तकं ज्यांची नावं आठवत नाहीत पण आतल्या कथा आठवतात तीही ह्या निमित्ताने आठवली. त्याबद्दल पुन्हा कधीतरी. ह्या लेखात कितीतरी अश्या बालपुस्तकांचा उल्लेख आहे जी मी माझ्या बालपणीसुद्धा वाचली नव्हती :-( मन खंतावलं. 

'म्युनिक बर्लिन पेरीस' (जयराज साळगावकर), 'टेरेन्टीनो इज फन' (महेंद्र तेरेदेसाई), 'तिबेटमधील मुद्रणतंत्राचा सुवर्णइतिहास' (मुरली रंगनाथन), 'आठवणी दळवी यांच्या' (रविप्रकाश कुळकर्णी) हे आणखी काही आवडलेले लेख.

कविता फारशी कळत नसूनही खास आवडलेल्या कविता म्हणजे जबाबदारी (प्रशांत असनारे), बुडत्या गोष्टी मला आतून खुडून टाकतात (संदीप शिवाजीराव जगदाळे), ज्याची त्याची पायरी (वीरा राठोड) आणि फुलपाखरू (नामदेव कोळी). लघुकथा सेक्शनमधल्या आवडलेल्या कथा म्हणजे होरा (सोनाली करमरकर), बोन्साय (भरती मेहता), वारी (डॉ. कृष्णकांत नाबर), घर (वर्षा गव्हाणे), आरे रे (अमोल जडे) आणि वटपौर्णिमा (सुषमा पोतदार). तरी ह्यातल्या काही कथा अधिक चांगल्या पद्धतीने लिहिता आल्या असत्या असं वाटलं. किरण येलेंची 'मुंडू' आवडली. 

प्रशांत कुलकर्णी ह्यांची 'घुसखोरी पेंटिंग्जमधली' ही व्यंगचित्रं खूप आवडली. मात्र 'कुटुंब रंगलंय पाककृतीत' मधल्या विजेत्या पाककृती काही अपवाद वगळता खास वाटल्या नाहीत. 

३. किल्ला (दिवाळी अंक २०२४) (किंमत रुपये ५००)

किल्लाच्या दिवाळी अंकाचं दरवर्षीचं मुखपृष्ठ छानच असतं. पण ह्या वर्षीचं मुखपृष्ठ मला खास आवडलं. किल्ल्याचं प्रवेशद्वार आणि त्यातून दिसणारा धुक्याने आच्छादलेला पलीकडचा भाग. त्यात घडून गेलेल्या इतिहासाइतकाच गूढ आणि रहस्यमय. संपादकीयातून हा किल्ला साल्हेरचा आहे हे कळलं. तसंच यंदाच्या अंकात एकूण १४ लेख आहेत हेही कळलं. त्यापैकी खास आवडलेल्या लेखांबद्दल थोडंसं.

किल्ल्यांवरच्या जलव्यवस्थापनाबद्दल डॉ. अरुणचंद्र पाठक हयांनी लिहिलेला लेख माहितीपूर्ण तर आहेच पण एखाद्या किल्ल्यावर गेल्यावर कायकाय पाहावं ह्याविषयीसुद्धा ही माहिती उपयुक्त ठरेल अशी आहे. एका किल्ल्याची साद्यन्त माहिती देणारे लेख ही किल्ला अंकाची विशेषता. ह्यावेळी अभिजित बेल्हेकर ह्यांनी पुरंदरवर लिहिलंय. पुरंदर म्हटलं की मराठ्यांचा इतिहास शिकलेल्या कोणालाही मुरारबाजी देशपांडे आठवणारच. पण त्याच्याही पलिकडे जाऊन पायथ्याचं गाव, त्यातलं नारायणेश्वराचं मंदिर, किल्ल्याच्या आसपासच्या परिसरात आढळणाऱ्या औषधी वनस्पती, किल्ल्याच्या नावाच्या उत्पत्ती, गडावरचे दरवाजे, वास्तू, माची, तट, बालेकिल्ला, स्वराज्यात येण्याआधीचा ते इंग्रजांच्या हाती १८१८ साली जाईतो पुरंदरचा इतिहास असा भरभक्कम ऐवज ह्या लेखात आहे. सरकारच्या अनास्थेतून आणि  काळाच्या तडाख्यातून वाचून हे गड उभे आहेत तोवर ते एकदा फिरून यायची मनीषा आहे ती देवाजी पुरी करेल तेव्हा ह्या लेखांचा संदर्भच कामी येणार आहे. 

रायलसीमामधल्या गुत्तीच्या किल्ल्याचं निदान मी तरी कधी नाव ऐकलं नव्हतं. होयसाळ आणि विजयनगर साम्राज्याच्या इतिहासात लष्करी ठाणं असलेल्या ह्या किल्ल्याचा परिचय यशोधन जोशी हयांनी करून दिलाय. 

ह्या एतद्देशीय किल्ल्यांसोबतच फोर्ट नायगारा वर अमित सामंत हयांनी लिहिलं आहे. ह्या लेखात असलेलें क्यू आर कोड स्कॅन करून मस्केट रायफलचं प्रात्यक्षिक सुद्धा पाहून घेतलं. श्रीलंकेतल्या अलकमांदा किल्ल्यावर एडव्होकेट सीमंतिनी नूलकर ह्यांनी लिहिलेला लेखही छान आहे. ह्या किल्ल्याला रावणाचा किल्ला म्हणतात म्हणे. कारण सिंहली लोकांच्या मते ५००० वर्षांपूर्वी हा किल्ला कुबेराने बांधला आणि तो रावणाचा भाऊ. श्रीलंकेला जाईन तेव्हा हा किल्ला बघायचं लक्षात ठेवायला हवं. 

शिवाजी महाराजांच्या वैचारिक वारशाची आपण कशी वाट लावली आहे ह्याचं उत्तम विवेचन डॉ. दीपक पवार ह्यांच्या लेखात केलंय. ते वाचून लोकसत्ता ज्यांना "समाजमाध्यमी अर्धवटराव" म्हणतो तश्या लोकांना काही अक्कल आली तरी पुरे. पण अश्या लोकांतले किती हा अंक वाचायची तसदी घेतील हा प्रश्नच आहे. 

राजांच्या निवाड्यांवर डॉ. अनुराधा कुलकर्णी ह्यांनी लिहिलेल्या लेखात मूळ मोडी कागदपत्रांचे नमुने आहेत. मोडी लिपी शिकून खूप वर्ष झाली. आता काही एक वाचता येत नाही ह्याची नव्याने खंत वाटली. ट्रेकिंग बद्दल खूप काही वाचलंय. कधी काळी जाण्याची इच्छा आहे. आपल्याला जमेल की नाही ह्याची धाकधूक आहे. ट्रेकिंग करणाऱ्या तमाम भटक्यांचं कौतुक आहे. त्यामुळे 'ट्रेक नावाची थेरपी' हा मुकेश माचकर ह्यांचा लेख उत्सुकतेने वाचला. 

पुरुषोत्तम भार्गवे ह्यांचा शिवराई वरचा लेख वाचून एखाद्या गडावर आपल्यालाही असं शिवकालीन नाणं मिळावं असं पुन्हा एकदा वाटून गेलं :-)

गडावर गेल्यावर काय पाहायचं ह्याबद्दल डॉ. मुकुंद कुळे ह्यांच्या 'गडरक्षक दैवतं' ह्या लेखातूनही उत्तम माहिती मिळते. हे सगळं वाचून आता वाटतंय की मी फारसे गड-किल्ले ह्याआधी पाहिले नाहीत तेच बरं आहे. ते कसे पाहायचे त्याची थोडीतरी अक्कल आता आली आहे. तरी एखाद्या अंकात पदर, नाळ वगैरे खास दुर्गांच्या बाबतीत वापरले जाणारे शब्द समजावून देणारा एखादा लेख वाचायला मिळावा असं वाटतं. असो. 

ऋषिकेशला गेले तेव्हा फार तरुण होते. वाराणसी, गंगेची आरती वगैरे करायचं खूप मनात आहे. गिरीजा देशमुख ह्यांचा नेमक्या ह्याच विषयावरचा लेख खूप आवडला. नीती मेहेंदळेचा जिर्णोद्धारीत मंदिरांवरचा लेखही वाचनीय आहे. 

अंकाच्या शेवटी 'दुर्गरंग' मध्ये वसईच्या किल्ल्याची संजय शेट्ये हयांनी काढलेली सुरेख चित्रं आवडली. नाही म्हटलं तरी आपल्याला चित्रकला ह्या विषयात गती नाही ह्याची खंत वाटलीच. काही गोष्टी माणूस जन्माला येताना सोबत घेऊन येतो. त्याला इलाज नाही. ह्या जन्मी नाही तर पुढल्या जन्मी पाहू :-)