Tuesday, November 11, 2014

३. वसा, दिवाळी अंक २०१४

लोकसत्तामध्ये दिवाळी अंकांचं परिक्षण येतं ते वाचून मी ५ अंकांची एक लिस्ट बनवली होती. त्यात 'वसा' एक होता. मागच्या आठवड्यात शिवाजी मंदिराच्या मेजेस्टीक दालनात उत्साहाने गेले खरी पण फक्त 'वसा' च मिळाला. मी इतकी हिरमुसले की तो पण घ्यावा की नाही असा विचार आला मनात. पण तो घेऊन घरी आले हे चांगलं केलं. ह्या निमित्ताने एक वेगळा अंक वाचायला मिळाला.

अंकाची सुरुवात होते ती पहिल्या महायुध्दाच्या शंभर वर्षांच्या निमित्ताने लिहीलेल्या तीन लेखांनी. पहिल्या महायुध्दातल्या भारतीय सैनिकांच्या सहभागाबद्दल लिहिलेला समीर कर्वे ह्यांचा, युध्द ह्या विषयावर आधारित विदेशी चित्रपटांवरचा अभिजीत रणदिवे ह्यांचा आणि पोएटस् इन आर्म्स हा युद्ध ह्या ह्या विषयावर कविता करणाऱ्या कवींवरचा डॉ.सुप्रिया सहस्त्रबुद्धे ह्यांचा असे तिन्ही लेख खूप वेगळी छान अशी माहिती वाचल्याचं समाधान देऊन गेले. मनोरंजन आणि ज्ञानात भर म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर 'बाय वन गेट वन फ्री'. :-)

'कथा' विभागात सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे मनस्विनी लता रविंद्र ह्यांची 'साडेएकतीस वर्षांचा संसार'. विवेक गोविलकरांच्या 'इन्वेस्टमेंट' चा विषय चांगला पण कथा खूप लांबल्यासारखी वाटली. 'गुरुचे चंद्र' ही अनुवादित कथा सुरुवातीला छान वाटली मात्र पुढे फारशी कळली नाही. एकदा मुळातून वाचावी काय?

'लेख' हा विभाग माझ्यासारख्या गंभीर वाचन न करणाऱ्या वाचकांची कसोटी पहाणारा. ;-) ह्यातला दिवंगत पत्रकार डेनिएल पर्ल ह्यांच्या मृत्यूचं रहस्य खणून काढणाऱ्या त्यांच्या सहकारी आणि मैत्रिण आसरा नोमानी ह्यांच्या लेखाचा 'सायली परांजपे' ह्यांनी केलेला अनुवाद भावला. आसरा नोमानी ह्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. कसली धडाडीची बाई आहे ही. मुलाला एकटीने वाढवताना आपला जीव धोक्यात घालून हे सगळं प्रकरण धसास लावणं कसं निभावलं असेल तिने? तिच्या शतांशाने देखील वाट्याला आली तरी धन्य समजेन मी स्वत:ला. हिटलरच्या पुस्तकप्रेमावरचा नितीन रिंढे ह्यांचा लेख एक पुस्तकप्रेमी म्हणून आवडला. ह्या निमित्ताने हिटलरची एक वेगळीच बाजू कळली.

'भूमी उसवून भूमिगात होताना' वाचताना थोडं गोंधळ उडाला - हे फिक्शन आहे का सत्यघटना आहेत ह्याबद्दल. पण लेखाने प्रचंड अस्वस्थ केलं. 'हिंदू राष्ट्राच्या दिशेने' ह्या लेखाचा विषय वृत्तपत्रांतून बऱ्याचदा वाचलेला. 'काळ्यांची निळी जखम' मधली माहिती मात्र नवीन. 'अब्राम्हणी निरपेक्षता' आणि 'सकल आनंदाचा प्रदेश' हे लेख उडत उडत वाचले ह्यात चूक सर्वस्वी माझी. आधी एकदा म्हटलं त्याप्रमाणे गंभीर काही वाचायची सवयच नाही.

संतविचारांवर आधारित भागातील 'मन तू पार उतर कहा जइ हो'  आवडला पण 'अंतरीचा ज्ञानदिवा' आणि 'नाथसंप्रदाय: अभ्यासाच्या काही दिशा'  हेही लेख वरवर वाचले असंच दुर्देवाने म्हणावं लागतंय.

कविता हा विषय शाळेत असल्यापासूनच फारसा समजत नसल्याने 'कविता' विभागाबद्दल काय लिहिणार? :-)

पुढल्या वर्षी ह्या अंकावर नक्की लक्ष ठेवणार.

No comments: