Sunday, December 3, 2023

२. अक्षर (दिवाळी अंक २०२३) (किंमत ३०० रुपये)

 लोकसत्ताच्या अंकातले चॅटजीपीटीवरचे लेख फारसे आवडले नव्हते. त्यामुळे ह्या अंकाची सुरुवातच तब्बल ११ लेख असलेल्या 'एआयचं जग' ह्या विभागाने झाली हे पाहून थोडी निराशाच झाली. नेटाने काही लेख वाचले खरे पण नंतर नंतर मात्र प्रयत्न सोडून दिला आणि काही लेख चक्क स्किप केले.

सतीश तांबे ह्यांची 'अब्रह्मण्यम ' थोडी वेगळ्या धाटणीची वाटली. पण खरं सांगायचं तर लेखकाला काय म्हणायचं आहे ते आपल्याला पूर्ण कळलेलं नाही असंच अजून वाटतं आहे. तेच 'भर माध्यान्ही' ह्या कथेबद्दल. 'मणिपूरची फाळणी' हा पार्थ एम. एन. ह्यांचा रिपोर्ताज अस्वस्थ करणारा. हे असं काही आपल्या देशात घडलं आणि काही दिवस कोणाला त्याचा पत्ताही लागला नाही हेच मुळात भयंकर अस्वस्थ करणारं आहे. आपण कुठे चाललोय ह्याचा विचारही करवत नाही. :-(

'मॅडपणा नुसता' हा गजू तायडे ह्यांनी लिहिलेला लेख व्यंगचित्रकार Al Jaffee ह्यांची ओळख करून देतो. फोल्ड-इन व्यंगचित्र ही कल्पनाच भारी वाटते, लेखात दिलेले 'snappy answers to stupid questions' चे नमुने खूप आवडतात आणि 'मॅड' चे जुने अंक कुठे वाचायला मिळतील का हा विचार डोक्यात येऊन जातो. व्हिएतनामवरचा हेमंत कर्णिक ह्यांचा रिपोर्ताज आवडला. 

'सण' ही वासिम मणेर ह्यांची कथा एक चांगला विचार मांडते. पण त्यातल्या पात्रांच्या तोंडी जी शिवराळ भाषा आहे ती वाचून अगदी नको नको होतं. पात्रांची सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी अधोरेखित करायला ती कदाचित गरजेची असेलही पण तरी भातातल्या खड्यांसारखी वाक्यावाक्याला टोचत राहते. 

शरणकुमार लिंबाळे हे नाव ऐकून माहीत आहे. पण एकूणात वास्तववादी काही पाहायची किंवा वाचायची हिंमत माझ्यात सध्यातरी नसल्यामुळे त्यापलीकडे त्यांच्या लिखाणाशी माझा परिचय नाही. तो थोड्याफार प्रमाणात संजय पवार ह्यांचा लेख वाचून झाली. वाढत्या वयानुसार ही हिंमत पुढेमागे गोळा करता आलीच तर त्यांची पुस्तकं नक्की वाचेन. 

समीर गायकवाड ह्यांचे काही लेख 'मायबोली' ह्या साईटवर वाचले होते. इथे 'काही' हा शब्द महत्त्वाचा. हेही लिखाण वाचायची हिंमत सध्या नाही. मुळात हे असं  वाचून त्यातून जी भयानक अस्वस्थता येते आणि पुढे दिवसचे दिवस वाचलेला मजकूर आठवून अधूनमधून जाणवत राहाते ती सोसायची तयारी नाही. सध्या कोशात जगणं मान्य केलेलं आहे. पण तरी त्यांनी संस्करण केलेल्या 'कविता वेश्यांच्या' ह्या सदरातल्या सगळ्या कविता वाचल्या. त्यांचं भयानक दु:ख आणि आयुष्य अक्षरश: डोळयांपुढे उभं राहातं. ह्यापुढे आणखी काय सांगायचं? :-(

'शेजारी देशांमधले मुसलमान' हा पाकिस्तानमधले अहमदिया, म्यानमारमधले रोहिंग्या आणि चीनमधले उइघुर ह्यांच्यावरच्या अन्यायाबद्दल माहिती देणारा लेख सध्या अप्रिय असणाऱ्या विषयावर भाष्य करणारा. लोकेश शेवडेंचा 'ब्रूसली चा प्रश्न' हा रिपोर्ताज आवडला. 

जाफर पनाही ह्या इराणी दिग्दर्शकाबद्दल आणि त्याच्या चित्रपटांबद्दल मीना कर्णिक ह्यांनी लिहिलं आहे. पैकी The White Balloon बद्दल वाचलं होतं. वेळ काढून हे सर्व चित्रपट बघणार ही खूणगाठ मनाशी पक्की केली आहे. 

'वैखरी' ही डॉ. संतोष पाठारे ह्यांची कथा आवडली अश्यासाठी की ती आपल्याला कथा वाचताना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर शेवटपर्यंत देतच नाही.

अंजली चिपलकट्टी ह्यांचा 'बेलेईव्हचे पाळतू कोल्हे' हा रिपोर्ताज देशातल्या सद्य स्थितीवर परखड भाष्य करणारा. प्रदीप चंपानेरकर ह्यांचा 'नेहरू आणि मी' आज देशात ज्यांचं विस्मरण होतं आहे त्या विचारांची आठवण करून देतो.

'निरोप' ही शिल्पा पाठक ह्यांची कथा मात्र मला खूप आवडली. नवरा सोबत असताना दर सुट्टीत ritual म्हणून जी गोष्ट करत होतो तीच गोष्ट तो सोबत नसताना आपण करू शकतो की नाही ह्याची खात्री नसताना करत स्वतःच स्वतःला गवसत जाणारी ही स्त्री आहे. 

प्रकाश अकोलकर ह्यांनी 'चारचौघे' मध्ये सुधीर नांदगावकर, जयंत धर्माधिकारी, वि.वि. करमरकर आणि कमलाकर नाडकर्णी ह्यांच्याबद्दल लिहिलं आहे. पण ह्याबद्दल अधिक विस्ताराने वाचायला आवडलं असतं. डॉ. ऋषिकेश रांगणेकर ह्यांनी नेहमीपेक्षा थोडं हटके राशिभविष्य लिहिलं आहे ते वाचण्यासारखं. 

१. लोकसत्ता (दिवाळी अंक २०२३) (किंमत २०० रुपये)

 ह्या वेळेला दर वर्षीचे ठरलेले अंक आधी आणायचे आणि मग उरलेले कुठले आणायचे ते लोकसत्तामधले परीक्षण वाचून ठरवायचं असं मनाशी योजलं होतं. त्याप्रमाणे लोकसत्ता, लोकमत, किल्ला, दुर्गांच्या देशातून आणि भवताल मॅजेस्टिकमधून घेऊन आले. दिवाळी संपायच्या आधी काही कुठला अंक वाचायची सवड झाली नाही. ती झाली तेव्हा हात आपसुक लोकसत्ताकडेच गेला.

पहिला लेख जेजुरीवरचा - भूषण कोरगांवकर ह्यांचा. लोकसत्ताच्याच एका स्तंभात त्यांनी केलेल्या लिखाणावरून त्यांचा परिचय झाला होता.  अनेक वर्षांपूर्वी अष्टविनायक केले तेव्हा शेवटी जेजुरीला गेलं असल्याचं अंधुक आठवतं. ह्या लेखातून जेजुरी, खंडोबा, त्याच्या पत्नी, तिथल्या मातीत जन्मलेले कलाकार अशी बरीच माहिती मिळते. तशी मी फारशी धार्मिक नव्हे. एकदा जाऊन यायला हवं असं मनात येऊन गेलंच. देवाच्या मनात असेल तरच दर्शन होतं म्हणतात. बघू कधी योग येतो. 

लहानपणापासून घरात लोकसत्ता येतो. कोणा एका पक्षाची तळी न उचलता जे बरोबर त्याचं कौतुक करणं आणि जिथे चुकतं तिथे कसलाही मुलाहिजा ना बाळगता खडे बोल सुनावण हे माध्यमाचं काम. ते लोकसत्ता चोख पार पाडतो. लोकसत्ताचा अग्रलेख तर माझा खास आवडीचा विषय. गिरीश कुबेर ह्यांचं लिखाण सहसा आपल्या वाचनात न येणाऱ्या अनेक गोष्टींची ओळख करून देतं. त्यातून राजकारण - मग ते देशी असो वा आंतरराष्ट्रीय - आजकाल फारच इंटरेस्टिंग विषय झाला आहे. त्यामुळे चीनच्या अध्यक्ष्यांवर लिहिलेला कुबेर ह्यांचा लेख खूपच आवडला. चीन ह्याच विषयावरचा सुधींद्र कुलकर्णी ह्यांचा लेखसुद्धा वाचनीय. ह्या विषयावर कितीतरी वाचण्यासारखं आहे. ६० नंतर नक्की करायचं असं परत एकदा मनाला बजावलं.

धर्म ह्या विषयावर काही लिहू नये आणि सांगू नये अशीच आजकाल परिस्थिती असताना वरूण सुखराज मात्र 'सर, मै सेख इद्रिस' ह्या आपल्या लेखातून शहाणपणाचे बोल सहजगत्या सांगून जातात. अर्थात ज्यांना हे समजून घ्यायचंच नाही किंवा समजूनही न समजल्याचा आव आणायचा आहे त्यांच्या पालथ्या घड्यावर पाणीच असणार आहे. असो. 

दर वर्षी 'किल्ला' किंवा 'दुर्गांच्या देशातून' चे दिवाळी अंक वाचताना आपल्या किल्ल्यांचा परवडीबद्दल वाचून खंत वाटते. आपण ह्यात बदल घडवून आणायला काय करू शकतो हे समजत नसल्याने अधिकच अपराधी वाटतं. 'किल्ल्यांच्या प्रश्नांना कुलूप' हा लोकेश शेवडे ह्यांचा लेख वाचून पुन्हा एकदा ज्यांनी हे करणं आवश्यक आहे ते कुठल्या चर्चेत गुंतले आहेत ते आठवून विषण्णता आली. :-(

'पुरोगामी? परंपराभिमानी? कर्कशतेला कंटाळलेल्या अभ्यासकाची टिपणे' हा लांबलचक शीर्षकाचा हेमंत राजोपाध्ये ह्यांचा लेख ते शीर्षक वाचून उत्सुकतेने वाचायला घेतला खरा. पण सुरुवातीचा काही भाग सोडला तर तो भरकटत गेल्यासारखा वाटला. लेखकाला नक्की काय सांगायचं आहे ते निदान मला तरी कळलं नाही. 

'सिनेमा' आणि 'नाटक' हे माझे आणखी दोन आवडीचे विषय. बाबुराव पटेल हे नाव मी आधी कधी ऐकल्याचं स्मरणात नाही. पण विजय पाडळकर ह्यांचा त्यांच्याविषयीचा लेख वाचून 'फिल्म इंडिया' चे अंक कुठे मिळतात का ते पाहण्याची आणि सादत हसन मंटो ह्यांनी लिहिलेलं 'Stars From Another Sky' हे पुस्तक वाचायची इच्छा मात्र बळावली आहे. तीच गोष्ट 'पांगळ्या श्रद्धेचं  युग' ह्या आसाराम लोमटे ह्यांच्या लेखाची. शाळेत सातवीपर्यंत असलेलं हिंदी आठवीला पूर्ण संस्कृत घेतल्यावर सुटलं. नंतर पुढे फक्त हिंदी चित्रपट आणि बंबैय्या हिंदी. अभ्यासात असलेल्या मुन्शी प्रेमचंद ह्यांच्या काही कथा सोडल्या तर हिंदी साहित्याचा परिचय व्हायची संधीच आली नाही. ६० नंतर करायची आणखी एक गोष्ट ह्या सदरात सध्या हा एक पॉईंट बनून आहे. त्यात हा लेख वाचून हरिशंकर परसाई हे एक नाव समाविष्ट झालं. 

'भारत @ २०४७' ह्या विभागातले २ लेख मला तरी फारसे आवडले नाहीत किंवा झेपले नाहीत म्हणा हवं तर. 

सतराव्या शतकातलय भारताची ओळख करून देणारया 'विश्वगुणादर्शचंपू' ह्या दाक्षिणात्य ग्रंथाविषयीचा निखिल बेल्लारीकर ह्यांचा लेख आणि दक्षिणेचा दिग्विजय ह्या विभागातले ३ लेख माहितीपूर्ण वाटले. रघुनंदन गोखले ह्यांचा लोकसत्तातला बुद्धिबळाविषयीचा लेख दर आठवड्याला (त्यातलं बरंचसं कळत  नसूनही!) वाचते त्यामुळे त्यांच्या 'भारतीय बुद्धिबळ तरुण झाले' ह्या लेखात उल्लेख केलेले बरेचजण वाचून परिचयाचे आहेत. बाकी त्यापलीकडे ह्या खेळाचा आणि अस्मादिकांचा संबंध ह्या जन्मी येईल असं वाटत नाही :-)

चॅटजीपीटी ह्या विषयावर इतकं बोललं आणि लिहिलं जातंय की आता खरोखर अजीर्ण व्हायची वेळ आली आहे. तरी ह्या नव्या टेक्नोलॉजीने लिहिलेल्या कथा आहेत  तरी कश्या म्हणून 'कथाकार चॅटजीपीटी' भागातल्या एकाच कल्पनेभोवती गुंफलेल्या ५ विविध genre मधल्या कथा वाचल्या. मला तरी बर्याच बाळबोध आणि काहींश्या असंबध्द्दच वाटल्या.

दरवर्षीप्रमाणेच ह्या वर्षीही कवितांचा विभाग चाळला. खरं तर आपल्याला कविता कळली की नाही ह्याबद्दल नेहमीच माझ्या मनात एक संदेह असतो. हे वर्ष अपवाद कसं असणार म्हणा. काही कविता कळल्या असं वाटलं. काही कळल्या नाहीत ह्याची खात्री आहे :-) 'सूर्यास्त एक पाहणे' ह्या विभागातली प्रशांत कुलकर्णी ह्यांनी काढलेली व्यंगचित्रं आवडली.