Saturday, February 17, 2024

१०. लोकमत दीपोत्सव (दिवाळी अंक २०२३) (किंमत रुपये २९९)

दरवर्षी लोकमतचा अंक मी सर्वात शेवटी वाचते कारण त्यात डोक्याला भुंगा लावणारे रिपोर्ताज आणि लेख असतात. वाचून त्यावर विचार करायला वेळ मिळतो त्यामुळे. पण खरं सांगते - ह्या वर्षीच्या अंकावरचे 'पुरुष "अस्वस्थ" रहस्याचा शोध' हे शब्द - tagline म्हणा हवं तर - वाचले आणि पोटात गोळाच आला. आता काय वाचायला लागणार ह्याचा. आणि मग काही अगदी जवळचे 'पुरुष' मित्र आठवले. खरं तर जवळचे मित्र-मैत्रीण पुरुष का स्त्री हे आपली दृष्टीने कधी महत्वाचं नसतंच. पण आज कधी नव्हे ते त्यांच्या ह्या ओळखीला महत्त्व आलं. आपण काय वाचणार त्यावरून आपला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर? पण अंकात काय आहे हे वाचायची उत्सुकताही होतीच. ही धाकधूक + उत्सुकता मनात घेऊनच अंक उघडला.

अंकाच्या सुरुवातीलाच अपर्णा वेलणकरांची एक संपादक म्हणून ह्या विषयावरची भूमिका मानणारा लेख आहे. हा विषय मागची अनेक वर्षं घ्यायचा ठरवून घेतला गेला नव्हता हे वाचून अजिबात आश्चर्य वाटलं नाही. 

अपर्णा वेलणकरांची भूमिका समजून घेतल्यावर मनातली धाकधूक थोडी कमी झाली खरी. पण सतीश तांबेंचा 'पुरुषपण भार रे देवा' हा वाचून ती पुन्हा सुरु झाली. मुळात मला हा लेख पटला नाही. पुरुषांच्या वखवखलेपणाचं जस्टिफिकेशन केल्यासारखं वाटलं. आणि पुन्हा मनात हेही येऊ लागलं की आपले जे पुरुष सहकारी किंवा मित्र 'सज्जन' किंवा 'त्यातले नाहीत' असे समजत होतो तेही तसेच आहेत का काय? नर आणि मादी ह्यांवाचून दुसरं कुठलंही नातं शक्यच नाही? मला तरी हे पटत नाही. हे सहकारी किंवा मित्र त्यातलेच असतील तर एक तर मी त्यांना ओळखण्यात कमी पडलेय किंवा ते अव्वल दर्जाचे नट आहेत :-( त्यामानाने डॉ. प्रदीप पाटकर ह्यांचा पुरुषांच्या आक्रमकतेचं विश्लेषण करणारा लेख संतुलित वाटला. मंदार भारदे ह्यांनी लिहिलेला 'शहरातल्या हतबल पुरुषाची गोची' हा लेख वाचून हे आपल्या कधीच कसं लक्षात आलं नाही हा प्रश्न मी स्वतःलाच विचारला. गावातल्या मध्यमवयीन पुरुषांच्या आयुष्यावर बोलणारा 'अजगराने गिळलेला धूळमातीतला पुरुष' हा लेख शहरात राहणार्या स्त्रिया आणि पुरुष ह्या दोघांनाही सारखाच अस्वस्थ करेल. 

शहरात आपल्याला ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक, भाजीवाले,फळवाले, इस्त्रीवाले वगैरें दिसतात. आपल्या कुटुंबापासून दूर कसे राहात असतील हा प्रश्न आपल्या मनात येतोच पण जगण्याच्या रोजच्या रेट्यात आपण तो विसरून जातो. 'एकटे पुरुष' हा लेख आपल्या ह्या प्रश्नांची पुन्हा आठवण करून देतो. 'स्साली जबान चलाती है' आणि 'हसबेण्डका काम क्याह होता हेई? कमाना!' हे लेख वाचून तर मी महाराष्ट्रातल्या मुलगा-मुलगी असा भेदभाव न करणाऱ्या घरात जन्माला आले ह्याबद्दल मी नियतीचे, देवाचे अक्षरश: आभार मानले. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' ह्या घोषणेला सत्यात यायला किती अवकाश आहे हे समजायला आपल्या राजकारणी लोकांना हे लेख वाचायला द्यायला हवेत. 

'बाईची नजर' हा शर्मिला फडके ह्यांचा लेख स्त्री चित्रकारांनी पुरुषाचं न्यूड शरीर आपल्या चित्रांत कसे दाखवले आहे ह्याबद्दल सांगतो. एरव्ही तुम्ही आम्ही ह्या विषयावर काही वाचणं अशक्यच. 'थँक यु पेद्राम' हा रेणुका खोत ह्यांचा लेख वेगळा विचार मांडतो तो मुळातूनच वाचायला हवा. 'समानता मानता मानता' हा योगेश गायकवाड ह्यांचा लेखही आवडला.  'He की She? हा शर्मिष्ठा भोसले ह्यांचा लेख खरं तर दोन transmenआणि दोन transwoman ह्यांची कहाणी सांगणारा. पण त्यात transwoman - तेही सायशा शिंदे ह्या सेलेब्रिटी transwoman वर जास्त लिहिलं गेलंय. दुसऱ्या transwoman विजया वसावे आणि दोन transmen रंकन आणि श्रेयांश वर लेखात फार काही नाही हे खटकलं. 

'पत्नीपीडित' हा गौरी पटवर्धन यांचा लेख हा बाईच्या बाजूने असलेल्या कायद्यांचा गैरवापर करून नवऱ्याला आणि सासरच्यांना जेरीला आणण्याच्या सध्या बोकाळत चाललेल्या घटनांवर परखड भाष्य करतो. 'मर्दानगीची कटकट' ही अनुराग कश्यपची छोटेखानी मुलाखतसुद्धा खास. 

अंकाचा मूळ विषय 'पुरुष' असला तरी अंकात बाकी अनेक विषयावर सुरेख लेख आहेत - मालेगावच्या युट्युबर्स आणि इन्फ्लुएन्सर बद्दल सांगणारा 'अपनी स्टोरी आपुन बेचेगा', 'AI माणसाला खाईल?' हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरचा, 'बकासुर' हा 'मुळशी पेटर्न' ह्या चित्रपटात जे दाखवलं आहे त्या वास्तवाचे आणखी पापुद्रे उलगडून दाखवणारा आणि 'इष्काचा विडा' हा लावणीच्या जगावरचा.

थोडक्यात काय तर, अंक नेहेमीप्रमाणेच पैसे वसूल. आत्तापासूनच ह्या वर्षीच्या दिवाळी अंकाचा विषय काय असेल ह्याची उत्सुकता आहे :-)


९. दुर्गांच्या देशातून (दिवाळी अंक २०२३) (किंमत रुपये ४००)

'ट्रेकिंगवरचा पहिला दिवाळी अंक' अशी ओळख असणाऱ्या ह्या दिवाळी अंकाचा हा बारावा अंक. म्हणजे अंक सुरु होऊन एक तप पूर्ण झालं. 'दिवाळी अंक' हा मराठी माणसाचा चकली-चिवडा आणि नाटक ह्यांइतकाच वीक पॉईट असला तरी आजकालच्या जमान्यात कोणी पुस्तक वाचायला जात नाही अशी सार्वत्रिक ओरड नेहमीच ऐकू येते. ह्या परिस्थितीत अंकाचं हे यश खरंच कौतुकास्पद आहे. मी कधीपासून अंक आणायला सुरुवात केली ते ह्या ब्लॉगच्या जुन्या नोंदी पाहून मला कळेलच पण अंक प्रथम वाचला त्यानंतर प्रत्येक दिवाळीला आणलाच बहुतेक. 'किल्ला' चा अंक दार दिवाळीला जपून ठेवते. 'दुर्गांच्या देशातून' चा अंक आजवर ठेवला नाही. पण ह्या वर्षीचा मात्र ठेवणार आहे. ह्याला कारण ह्या वर्षीच्या अंकात आधी कधी न वाचलेल्या किल्ल्यांबाबत भरपूर माहिती आहे. आणि कधी न कधी तरी वेळ काढून हे सर्व किल्ले डोळस नजरेने पाहायचे हा आयुष्यातल्या टू-डू लिस्टमधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर असो.

अंकात आधी ज्यांनी कधी लिहिलेलं नाही शक्यतो अश्या लेखकांना संधी द्यायचा आपला शिरस्ता ह्या वर्षीही अंकाने पाळलेला दिसतो हे संपादकीयातून समजतं. ह्या वर्षीच्या अंकात लिहीणार्या लेखकांची संख्या ३२ आहे हेही कळतं. पण ह्या ३२ लेखांविषयी दोन शब्द लिहिल्याचा नादात संपादकीय चांगलं ६ पानी झालेलं आहे. मी सुरुवातीचं एक पान वाचलं. मग शेवटचं पान वाचलं आणि सरळ लेखांकडे वळले. मला असं वाटतं की ह्याऐवजी प्रत्येक लेखाच्या सुरुवातीला त्या लेखक-लेखिकेबद्दल थोडी माहिती दिली तर बरं होईल. 

तर नमनाला घडाभर तेल घालून झाल्यावर आता अंकातल्या मला आवडलेल्या लेखांकडे वळते. 

'हे आपल्याच्याने ह्या जन्मी तरी होणे नाही' अशी गोष्ट म्हणजे गिर्यारोहण. त्यामुळे बाकीच्यांनी केलेल्या मोहिमेबद्दल वाचण्याची उत्सुकता असतेच. 'अष्टहजारी मोहिमांचा थरार' हा जितेंद्र गवारे ह्यांचा लेख ह्यावर भरपूर माहिती देतो. आणि ह्या असल्या कठीण मोहिमा करून ही गिरिशिखरं सर करणाऱ्या लोकांचं खरंच कौतुक वाटतं. आपण जिथे राहातो त्या परिसरातले किल्ले आपल्या शाळेतल्या मुलांनाही दाखवले पाहिजेत ह्या ध्यासातून ही कल्पना सत्यात उतरवणाऱ्या ३ शिक्षकांच्या उपक्रमाची माहिती शिवराज पिंपुडे ह्यांच्या 'दुर्गजागर' ह्या लेखातून मिळते. त्यातून प्रेरणा घेऊन अधिक शिक्षक असे उपक्रम राबवतील अशी आशा वाटते. 'Mountains Memoirs' हा लेख मॅरेथॉन धावपटू असलेल्या सुविधा कडलग ह्यांच्या सह्याद्रीतल्या आणि हिमालयातल्या गिर्यारोहणावरचा लेख छान आहे. पण तो इंग्लिशमधून का आहे हे कोडं काही उलगडलं नाही. पन्हाळा, लोहगड आणि तोरणा ह्या ३ किल्ल्यावर लिहिलेला सुनील लिमये ह्यांचा 'गडकोटांच्या सान्निध्यात' हा छोटेखानी लेखही मला आवडला. एव्हरेस्टच्या बेस केम्पपर्यंत जायचं एक वेडं स्वप्न मी अनेक वर्षं उराशी बाळगून आहे. त्यामुळे एव्हरेस्ट चढाईवरचा शिवाजी ननवरे ह्यांचा 'माझा एव्हरेस्ट प्रवास' हा लेख आवडला. 

'चक्रम हायकर्स' हे नाव कधी त्यांनी आयोजित केलेले उपक्रम किंवा त्यांनी यशस्वी केलेली रेस्क्यू ह्यामुळे पेपरातून वाचून अनेकांना माहितीचं असेल. अश्या लोकांना 'गिरिभ्रमण कळे कौतुक' हा समीर कर्वे ह्यांचा लेख आवडेल. तीन संस्कृत श्लोकांच्या आद्याक्षरांतून 'चक्रम' हे नाव तयार झालंय हे वाचून आश्चर्य वाटतं. रायगड माहीत नाही असा मराठी माणूस विरळा. स्वराज्यातल्या ह्या महत्वाच्या किल्ल्यावर मयूर खोपकर ह्यांनी 'महाराजांच्या दृष्टिकोनातून राजगडाचे महत्व' हा छान माहितीपूर्ण लेख लिहिलेला आहे.  डॉ. नितीन हडप ह्यांनी प्रतापगड आणि रायगड ह्यांचं नातं उलगडून दाखवलेलं आहे. अशीच माहिती पुरंदर ह्या किल्ल्याबद्दल यशोधन जोशी ह्यांच्या 'डॉ. हरमान गोएटस ह्यांच्या नजरेतून पुरंदर' ह्या लेखातून मिळते. 

साल्हेरच्या लढाईवर सुभाष फासे ह्यांच्या 'साल्हेर स्ट्रॅटेजिकल सर्जिकल स्ट्राईक' ह्या लेखातून बरीच माहिती मिळते. पंकज समेळ ह्यांचा लेख धारावी, वसई, घोडबंदर, ठाणे, पारसिक, दुर्गाडी ह्या किल्ल्यांची माहिती देतो. डॉ. राहुल वारंगे हयांनी रसाळगड, सुमारगड आणि महीपतगड  ह्या दुर्गत्रयीवर लिहिलंय. अशीच माहिती सूरज गुरव (नांदेडचा नंदगिरी), विजय माने (पदरगड सह्याद्रीच्या कुशीतली अनोखी किमया), प्राची पालकर (रामगड), शिवाजी आंधळे (सुधागड) ह्यांच्या लेखातून मिळते. शिल्पा पिसाळ ह्यांचा 'देवतिब्बा' च्या ट्रेकवरचा लेख आणि संकेत शिंदे ह्यांचा 'कुंभेघाट ते ठिबठिबा नाळ' हे लेख वाचून वाचकालाही तिथे जायची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही. डॉ. किमया देशपान्डे ह्यांनी पुणे जिल्ह्यातल्या किल्ल्यांवरच्या मंदिरांवर माहितीपूर्ण लेख लिहिलाय. 

अंकातले शेवटचे काही लेख शिवनेरी, सामानगड आणि कलानिधीगड ह्यांच्या संवर्धनाविषयी माहिती देतात. उठसुठ शिवाजीमहाराजांचं नाव घेणारे राजकारणी ज्या महाराष्ट्रदेशात आहेत तिथे प्राचीन किल्ल्यांचं असं संवर्धन करायची वेळ येते ह्याबद्दल खंत वाटते. पण सरकारी मदतीची वाट न बघता स्थानिक लोक आणि संस्था ह्यात पुढाकार घेत आहेत हे चित्र आशादायक वाटतं. 

ज्या वर्षी स्वराज्यातल्या प्रत्येक गडावर दसरा-दिवाळीच्या दिवशी दिवे लागतील, रांगोळ्या काढल्या जातील, पाडव्याला गुढी उभारली जाईल आणि बाकी वर्षभर पर्यावरणाचं, निसर्गाचं आणि इतिहासाचं भान राखून माणसांचा राबता चालू होईल तो सुदिन. तो लवकर यावा ही देवाजवळ कळकळीची प्रार्थना.