Tuesday, November 8, 2011

काही दिवसांपूर्वी एक संस्कृत श्लोक वाचनात आला:

परप्रयुक्त: पुरुषो विचेष्टते
सूत्रप्रोता दारुमयीव योषा

म्हणजे कळसूत्री बाहुली ज्याप्रमाणे सूत्रधाराच्या इच्छेनुसार हालचाली करते त्याप्रमाणे मनुष्य ईश्वराच्या इच्छेनुसार हालचाली करतो.

ह्याच अर्थाचं एक इंग्लिश वाक्य काही दिवसांनी वाचलं.

You walk in the direction God points you

किती साम्य आहे ना दोन्ही वाक्यांत? :-)
Whatever else anyone might say about the new TRAI regulations on SMS, I am happy that I don't have to reach for my phone at every beep to find the SMS is from someone who is offering me an opportunity to work from home or trying to sell something that I absolutely don't need. I don't know for how long this calm will last but for now, I am enjoying it :-)

हेपी बर्थडे पु.लं.

खरं सांगू का? तुम्ही आमच्यातून गेला आहात हे मला अजूनही खरंच वाटत नाहिये. कारण तुमच्या पुस्तकांच्या पानांपानांतून तुम्ही भेटत होतात, भेटत आहात आणि भेटत रहाल. घरापासून दूर परक्या देशात, परक्या लोकांत असताना तिथे रुळेपर्यंत तुमच्याच पुस्तकांनीच आधार दिला. खरं तर ती पुस्तकं अश्या काळातली जो काळ माझ्या पिढीने कधी पाहिलाच नाही. तरी तो आपला वाटत राहिला, नॊस्टेल्जिक करत राहिला. फ़्लॆट संस्कृतीत वाढलेल्या मला चाळीची ओळख तुमच्या बटाट्याच्या चाळीने करून दिली. "अरेरे! आपण चाळीत का वाढलो नाही" हे तेव्हाच्या वयात वाटायला लावायची किमया तुमच्याच लेखणीची. तुमच्या नंदा प्रधानाने रडवलं, पेस्तनकाकांनी हसवलं....आणि त्याच वेळी आयुष्य़ आयुष्य़ ज्याला म्हणतो त्याबद्दल बरंच काही शिकवलं. किती लिहू आणि काय लिहू? ही यादी न संपणारी आहे. तुमचं ऋण न फ़िटणारं आहे किंवा मला ते फ़ेडायचंच नाहिये म्हणा ना.

आता श्रीकांत मोघे तुमची ’वायावरची वरात’ घेऊन आलेत. हा प्रयोग पहायची आशा मलाही आहे. तुमच्याच भाषेत सांगायचं तर ’कधीकधी देवाजी कृपा करतो’, हो ना? बघू माझ्यावर कधी ही कृपा होते.

चला, मग भेटू यात पुन्हा तुमच्या पुस्तकांतून. आत्ता तुमच्या ’हॆपी बर्थढेंच्युयु’ साठी हे कॆडबरी सेलेब्रेशन्स माझ्याकडून :-)

झोपी गेलेला जागा झाला - एक धम्माल-ए-धम्माल अनुभव

हर्बेरियमतर्फ़े येणारं शेवटचं नाटक म्हणून ’झोपी गेलेला जागा झाला’ ची जाहिरात आली तेव्हाच ठरवलं होतं की काहीही झालं तरी हे नाटक चुकवायचं नाही. ह्याआधी आलेलं ’आंधळं दळतंय’ पाहणं मनात असूनही शक्य झालं नव्हतं. १ तास रांगेत उभं राहून मान आणि पाठीचं धिरडं करून घेऊन तिकिट घेतलं. आणि प्रयोग पाहिल्यावर त्याचं अक्षरश: सार्थक झाल्यासारखं वाटलं. :-)

विजू खोटे, सतीश पुळेकर, सुनिल बर्वे, संपदा जोगळेकर, दिन्यार तिरंदाजच काय पण इतर सहकलाकारांचीही काम सुरेख होती. चक्क भरत जाधवचं कामही मला आवडलं. खास लक्षात राहतील ते सतीश पुळेकरांचे डॊक्टर आठवले आणि सीआयडी इन्स्पेक्टर सावंत झालेल्या संतोष पवारांचा अभिनय. अफ़लातून! दिनूच्या घराचा सेटसुध्दा छानच होता. :-)

फ़क्त २५ प्रयोग आणि त्यामुळे तिकिट काढायला होणारी प्रेक्षकांची गर्दी नसती ना तर मी पुन्हा एकदा नक्की हे नाटक पाहिलं असतं. ’सूर्याची पिल्लं’, ’हमिदाबाईची कोठी’ आणि ’झोपी गेलेला जागा झाला’ सारखी नाटकं पहायची संधी दिल्याबद्दल सुनिल बर्वेचे खरंच मनापासून आभार! आणि पुढच्या वर्षीही हर्बेरियमतर्फ़े आणखी नाटकं घेऊन याच ही कळकळीची विनंती :-)
गीतेचा पहिला अध्याय काल वाचून संपला. त्यातून Takeaway काय असं जेव्हा मी माझ्या मनाला विचारलं तेव्हा एकच गोष्ट आठवली. अर्जुन कृष्णाला म्हणतो की सगळं सोडून देवाचं नाव घेत बसणं मला शक्य होणार नाही. अगदी खरं आहे ते. मीही पूर्वी बसमधून जाताना बयाचदा काही लोकांना वहीत रामनाम किंवा एखादा श्लोक पुन्हा पुन्हा लिहिताना पाहिलंय. हे मला कधी जमणार नाही आणि का कोणास ठाऊक पण पटतही नाहिये. का ते नेमकं नाही सांगता येणार. ह्यावर कृष्ण अर्जुनाला म्हणतो की मी असं सांगतच नाहिये की तू सगळं कामधाम सोडून देवाची प्रार्थना करत बस. तुझं नेहमीचं काम कर पण त्याचबरोबर देवाचीही आठवण ठेव. हे प्रॆक्टिकल वाटतं खरं पण महाकठिण. माझंच बघा ना, सकाळी ऒफ़िसच्या आधी देवाची पूजा करून निघालं की देव एकदम संध्याकाळी सूर्यास्तानंतर उदबत्ती लावताना आठवतो आणि मग रात्री अंथरुणाला पाठ टेकल्यावर. बाकीचा दिवस आयुष्य नावाचं यंत्र कशाकशाची म्हणून आठवण राहूच देत नाही. मग कुठला देव आणि कुठलं काय? :-( कसं जमवायचं हे सगळं?

पुन्हा एक गोष्ट खटकली. एका श्लोकात अर्जुन म्हणतो की घरात मोठी माणसं नसतील तर कुळातली माणसं बिघडायला वेळ लागत नाही. म्हणून मी इथल्या वडिलधाया माणसांना मारु शकत नाही. हे इथपर्यंत ठीक आहे. (तेव्हाच्या काळात झी वरच्या ’पवित्र रिश्ता’ मधल्या मानवच्या आईसारखे वडिलधारे नसतील बहुतेक!) पण पुढे असा उल्लेख आहे की कुलस्त्रिया बिघडल्या की कुलाच्या धार्मिक रीती वगैरेंचा नाश होतो, वर्णसंकर होतो. ह्या सगळ्यात फ़क्त स्त्रीचीच चूक का? वर्णसंकर करायला फ़क्त एक स्त्रीच जबाबदार असते का? त्यात पुरुषाचा हातभार असतोच ना? मग तो दोषी नाही? का बरं?

बरं, ह्यावरच्या विवरणात हे जे स्वामी प्रभुपाद आहेत त्यांनी म्हटलं आहे की स्त्रिया पुरुषात मिसळू नयेत आणि त्यांचं अध:पतन होऊ नये म्हणून त्यांना धार्मिक कर्मकांडांत गुंतवावं. तसंच स्त्रिया बुध्दिमान नसल्याने त्यांना सदोदित वडिलधाया मंडळींचं मार्गदर्शन असावं. हे वाचून मी फ़क्त ’हरे राम’ एव्हढंच म्हटलं. :-(