Wednesday, April 14, 2010

ग्रामीण महाराष्ट्र पहायची तसं म्हटलं तर पहिलीच वेळ. मागल्या ट्रीपच्या वेळेस फार काही पाहिल्याचं आठवत नाही. ह्या वेळी मात्र हिरवी शेतं, तारांवर बसलेले ड्रॉन्गो, किंगफिशर, बुलबुल, टिटवी असे पक्षी, तरारून आलेले उस, डोलणारी कणसं, दुरून दिसणारे इटुकल्या देवळांचे कळस पोटभरून पाहिले. अर्थात भरून वाहणारी गटारं, प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे ढीग, रिकामे बसलेले गावातले लोक, कशीतरी तग धरून उभी असलेली खोपटं हे पाहून मन विष्षण झालं. २०-२५ जणांचे १०-१२ गट झाले तर ही गावं साफ करायला वेळ लागणार नाही असं वाटून गेलं पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? :-(

असो. गाडी पार्क करायला जागा नाही म्हणून दगडू हलवाईच्या गणपतीचं बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं ही एक खंत आहे :-( अष्टविनायक दर्शन तर झालं आता कोल्हापूरची अंबाबाई, पंढरीचा विठोबा-रखुमाई आणि वणीची सप्तश्रृंगीमाता कधी दर्शनाला बोलावतात पाहूया :-)
काही म्हणा पण प्रवास करताना खाण्याचे जरा हालच होतात. त्यातून देवाच्या दर्शनाला जात असल्याने फक्त शाकाहाराचाच पर्याय होता. मला तर ह्या हॉटेलातून मेन्यूकार्ड का ठेवलेलं असतं तेच कळत नाही. साऊथ इंडियन पदार्थ म्हटले तर डोसा (सादा, मसाला, मैसोर सादा, मैसोर मसाला, रवा सादा इत्यादि), इडली, मेदू (किंवा मेंदू!) वडा, उत्ताप्पा (बटर, सादा, टोमॅटो, कांदा इत्यादि) ह्यात कारभार आटोपतो. पंजाबी जेवणाचं म्हणाल तर नवरतन कोर्मा, छोले, पालक पनीर, आलू मटर, मटर पनीर, मेथी मटर मलाई, राजमा, पनीर टिक्का मसाला, कढई पनीर, व्हेज कढई, व्हेज जालफ्रेजी ह्या डिशेस मेनू न बघताही सगळीकडे मिळतील. चायनीज (किंवा चायनिस!) जेवणात च्याऊ मेन, शेझवान, मांचुरियन ह्यांना मरण नाही.

नाही म्हणायला रांजणगावला जायच्या आधी एका फाट्यावर वळताना "हॉटेल राजधानी" अशी पाटी दिसली म्हणून गाडी वळवली. ड्रायव्हरचं काय बिनसलं होतं देवाला ठाऊक. "बाहेरच्या बाईक्स कामगारांच्या दिसताहेत" वगैरे सांगायला लागला. पण आम्ही नेट धरला. आत तोच मेन्यू. पण त्या गर्दीत मला "कढी खिचडी" दिसलं. वेटर बहुतेक नाहिये असं सांगणार अशी मनाची तयारी करून ऑर्डर केली. अहो आश्चर्यम! गरमागरम आणि चविष्ट अशी खिचडी कढी मिळाली. देवाजी कधीकधी अशी क्रृपा करतो! :-) तसाच एक लक्षात राहिलेला पदार्थ म्हणजे शेवटल्या दिवशी पुण्यात "सवेरा" नामक हॉटेलमध्ये खाल्लेला उपमा.. अप्रतिम!

खरं तर घरी परतायच्या प्रवासात लंचला नॉनव्हेज खायचं नाही अशीच इच्छा होती. पण बाकीची जनता व्हेज खाऊन कंटाळली होती. एकटीपुरतं व्हेज मागवून अन्न वाया घालवण्यापेक्षा नॉनव्हेजच मागवलं. ते हॉटेल नक्की कुठे होतं सांगता येणार नाही. पण सितेवाडी असं पुढे लागलेल्या गावाचं नाव होतं आणि माळशेज घाटाच्या आधी लागलं होतं. हॉटेल देवेन्द्र असं त्याचं नाव. तिथे मिळालेलं बटर चिकन इतरत्र मिळणार्‍या बटर चिकनपेक्षा वेगळं होतं पण मस्त होतं. आणि चिकन मसाला सुध्दा छान झणझणीत होता :-)

आणि हो, हॉटेल लहान असो वा मोठं - चहा मात्र ३ दिवस सगळीकडे झकास मिळाला. कदाचित दुधाचा परिणाम असावा. :-)
विकेन्डला अष्टविनायकाच्या ट्रीपला जाऊन आले. जायचं जायचं असं डिसेंबरपासून घाटत होतं पण योग येत नव्हता. म्हणतात ना देवाचं बोलावणं यायला लागतं.:-)

तसे एकदा मी पूर्वीही अष्टविनायक केलेत पण ते एका टूरिस्ट कंपनीबरोबर. ह्या वेळी गाडी घेऊन गेलो होतो त्यामुळे प्रवास मजेत झाला. पाली, महड आणि थेऊर हे पहिल्या दिवशी. मोरगाव, सिध्दटेक आणि रांजणगाव दुसर्‍या तर ओझर आणि लेण्याद्री शेवटल्या दिवशी केले. बाप्पांना भेटून छान वाटलं. :-)

महडच्या मंदिराबाहेरच्या दुकानांत कसल्या सुरेख रंगांच्या बांगड्या होत्या पण सगळ्या काचेच्या. शहरातल्या धकाधकीत किती वेळ टिकाव धरतील काय माहित म्हणून घेतल्या नाहित. आता पश्चात्ताप होतोय :-( थेऊरच्या मंदिरात पोचेतो अंधार पडला होता. त्यातून ज्याला पत्ता विचारावा तो इथेच आहे, एक २५ किलोमीटरवर म्हणून सांगायचा. त्यातून आपण पोचेतो मंदिर उघडं असेल की नाही ही शंका पोटात घेऊन प्रवास केला पण पोचलो तेव्हा छान दर्शन झालं.

सिध्दटेकला मागल्या वेळी नावेतून प्रवास करून गेल्याचं आठवत होतं. आता मंदिरापर्यंत गाडी गेली. रांजणगावच्या मंदिरात खूप गर्दी होती. खरं तर पैसे देऊन रांगेत उभं न राहता दर्शन घेणं पटत नाही. पण आमचा नाईलाज होता कारण आम्ही मुक्कामाला पुण्याला परत जाणार होतो. त्यामुळे बाप्पाकडे माफी मागून दर्शन घेतलं.

लेण्याद्रीच्या पायर्‍या चढताना दमछाक झाली थोडी पण वर पोचल्यावर सार्थक झाल्यासारखं वाटलं. गुहेत कुलूप घालून ठेवलेली दारं कसली आहेत कळायला मार्ग नव्हता पण तिथे सफाई करणं आवश्यक आहे. कोळीष्टकं जमलेली पाहून वाईट वाटलं. :-( मूर्तीचे फोटो काढू नका असं लिहिलं असतानाही मूर्तीसोबत पोझ देऊन फोटो काढणारे लोक पाहून तिळपापड झाला :-(
मागल्या आठवड्यात पु.लं.चं "वंगचित्रे" परत वाचलं. वाचून एकाच वेळी आनंद झाला आणि दु:खही. शांतिनिकेतनमध्ये रहाण्याचा आनंद ह्या पुस्तकाने दिला. पण दु:ख ह्याचं की इतक्या वर्षांपूर्वीच गुरुदेवांच्या स्वप्नातून साकार झालेल्या ह्या वास्तूचे चिरे निखळायला सुरुवात झाली होती तर आता काय झालं असेल? आपण भारतीय दुर्दैवीच. अशी अनेक शिल्पं आपल्या देशात निर्माण झाली पण आपण सगळ्यांचं उध्वस्त होणं उघड्या डोळ्यांनी पहात आलो :-(

२-३ वर्षांपूर्वी एका मैत्रिणीच्या कोलकात्याच्या घरी नवरात्रीच्या दिवसात जायचा योग आला होता. शांतिनिकेतन सोडाच पण हावरा ब्रिज पहायचं पण स्वप्न पुरं होऊ शकलं नाही. पु.लं.च्याच शब्दात ह्याचं कारण सांगायचं तर "भीषोण लोकारण्य". दोर मो़कळा केल्यावर सैरावैरा धावणारे लोक पाहून मुंबईच्या गणपतीउत्सवातली गर्दी पाहिलेल्या माझीही छाती दडपली. बरं ह्या गर्दीत हरवले तर "आमार नाम स्वप्ना" ह्यापुढे माझी गाडी जाणार नाही ह्याची खात्री. त्यामुळे निमूटपणे मैत्रिण आणि तिचे कुटुंबिय जिथे नेतील तिथे जायचं असं शेवटी ठरवून टाकलं.

पुन्हा जायचा योग आलाच तर तिथली खादाडीची ठिकाणं, शांतिनिकेतन, हावरा ब्रिज आणि ट्राम हे कार्यक्रम पार पाडल्याशिवाय तिथून निघणार नाही अशी प्रतिज्ञा तूर्तास केली आहे :-)