Saturday, December 30, 2023

५. किल्ला (दिवाळी अंक २०२३) (किंमत ४५० रुपये)

किल्ल्याचा दरवर्षीचा दिवाळी अंक मोठ्या उत्सुकतेने उघडते. ह्या वर्षीही तसंच झालं. पण ह्या वर्षीच्या अंकाने थोडी निराशा केली असं म्हणावं लागेल. कदाचित काही लेख नेहमीप्रमाणे एखादा विशिष्ट किल्ला किंवा शिवकालीन घटना किंवा शिवकाळातील एखादा विषय ह्यावर आधारित नव्हते म्हणून असेल कदाचित.

उदा. 'शिवपूर्वकाळ' वर डॉ. अजित आपटे ह्यांनी लेख लिहिला आहे. ह्यातली काही माहिती नवी असली तरी बरीचशी बऱ्याच मराठी माणसांना माहीत असलेली. तसाच एक जोडलेख शिवोत्तर काळ ह्या विषयावर लिहिला असता तर कदाचित तौलनिक अभ्यासाच्या दृष्टीने बरं झालं असतं. 'छत्रपती एक अदभूत कारकीर्द' हा संदीप तापकीर ह्यांचा लेखही असाच जेनेरिक वाटला. 

अपवाद काही लेखांचा. त्यातील पहिला आदिशक्ती श्रीतुळजाभवानी वरचा डॉ. मंजिरी भालेराव ह्यांचा. प्रतापगडावरील मूर्तीपासून देवीची अनेक तीर्थं, तिथले लेख आणि स्थापत्य याविषयी माहिती ह्या लेखातून मिळते. दुसरा लेख पुरुषोत्तम भार्गवे ह्यांचा 'शिवकाळातील चलन व्यवस्था' ह्या विषयावरचा. ह्यातल्या अनेक नाण्यांविषयी वाचून लोक रोजच्या जीवनात आर्थिक व्यवहार कसे करायचे हा प्रश्न पडला :-) शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडितांच्या मदतीने शिवराज्यकोष कसा निर्माण केला ह्याविषयीची मनोरंजक माहिती सुहास सोनावणे ह्यांच्या लेखातून मिळते. 'भरडधान्य' ह्या विषयावर आजकाल बरंच लिहिलं जातंय. पण हेच भरडधान्य मराठा सैन्याला कसं उपयुक्त ठरत होतं ह्याविषयी एड. सीमंतिनी नूलकर ह्यांचा लेख वाचून कळतं. तेव्हाच्या काळातल्या भरडधान्य वापरून केलेल्या काही पाककृती दिल्या असत्या तर लेख अधिक परिपूर्ण झाला असता. 

किल्ले पदमदुर्ग ह्याची रचना, दुर्ग निर्मितीतले घटक ह्याविषयी सविस्तर माहिती चंद्रशेखर बुरांडे ह्यांच्या लेखातून मिळते. शिवकाळातील कर म्हणजे औरंगजेबाने हिंदूंवर लादलेला जिझिया एव्हढीच माहिती होती. त्यापलीकडे जाऊन स्वराज्यातला महसूल विभाग, त्यातले अधिकारी,महसुलाचे मुख्य स्रोत, ३ प्रकारचे कर (प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आणि संकीर्ण) ह्याविषयी साद्यन्त माहिती 'शिवरायांची करप्रणाली' मधून प्रवीण गायकवाड आपल्याला देतात. लाल महालात शिरून महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं कापली हा इतिहास सर्वाना माहीत आहे. पण त्या घटनेबद्दल बरीच वेगळी माहिती उदा. मोहीमपूर्व तयारी, प्रत्यक्ष कारवाई आणि ह्या घटनेचे झालेले परिणाम प्रा. अविनाश कोल्हे ह्यांच्या 'लाल महालातील थरार' ह्या लेखातून मिळते. तीच गोष्ट 'मुरारबाजी' वरच्या डॉ. सचिन पोवार ह्यांच्या लेखाची. पुरंदरची लढाई शर्थीने लढणाऱ्या मुरारबाजीबद्दल सर्व मराठी माणसांना माहित आहे. पण त्यांचं घराणं, पुरंदर किल्ला, प्रत्यक्ष लढाई आणि मुरारबाजी ह्यांच्या समाधीच्या जीर्णोद्धारा बद्दल बरीच माहिती हा लेख देतो. 

मला सर्वात आवडलेला अंकातील लेख म्हणजे संजय तळेकर ह्यांनी लिहिलेला उंबरखिंडीच्या लढाईवरचा. ह्या लढाईबद्दल मला तरी खास माहिती नव्हती. पण लढाईची पूर्वपीठिका, कारतलब खानाचं सैन्य, त्याचा प्रवासाचा मार्ग, महाराजांनी केलेली व्यूहरचना आणि प्रत्यक्ष युद्ध ह्याबद्दल वाचताना खरोखर मजा आली. त्यामानाने लेखाचा 'शरणागती' हा शेवटला भाग घाईघाईत गुंडाळल्यासारखा वाटलं. लेखाची शब्दमर्यादा ओलांडली गेल्यामुळे असं झालं असावं का? ह्या लढाईच्या दूरगामी परिणामांबद्दल वाचायला नक्कीच आवडलं असतं. भास्कर सगर ह्यांची रायगडाची रेखाचित्रं आवडली. 

असो. मुख्यत्वेकरून शिवकालीन चलन आणि करप्रणाली ह्याविषयीच्या माहितीसाठी हा अंक दर वर्षीप्रमाणे जपून ठेवते आहे. मोडी लिपीचा सखोल अभ्यास जेव्हा करता येईल तेव्हा ह्या लेखांचा उपयोग होईल असं वाटतं.

Sunday, December 17, 2023

३. कालनिर्णय (दिवाळी अंक २०२३) (किंमत २५० रुपये)

दिवाळीत अंक विकत घेताना कथा असलेले अंक मी शक्यतो विकत घेत नाही. कारण त्या शोकांत असलेल्या असल्या तर उगाच डोक्याला भुंगा लागतो. निदान दिवाळीचे चार दिवस तरी मजेत जावेत असं वाटतं. अर्थात ह्याचा अर्थ असा नाही की एकदम हलकंफुलकं वाचण्याकडे माझा कल आहे. शेवटी सुवर्णमध्य असतोच की. पण तरी एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्याआमच्या जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहेत (आणि ज्याच्याशी राजकारणी लोक काडीचा संबंध येऊ देत नाहीत!) अश्या विषयांवर वाचायला नक्कीच आवडतं. तसंच नेहमीचे विषय सोडले तर काही वेगळं असं ह्या निमित्ताने पदरात पडावं अशीही इच्छा असतेच. म्हणून कालनिर्णयचा अंक घ्यायला सुरुवात केली आहे.

ह्या वर्षीच्या अंकाची सुरुवात 'पृथ्वी अत्यवस्थ' ह्या अतुल देऊळगावकर ह्यांच्या लेखाने झाली आहे. रोजचं वर्तमानपत्र वाचणाऱ्या सर्वांना हा विषय आणि त्याचं गांभीर्य माहीतच असणार. पण संकट किती दाराशी येऊन ठेपलं आहे ह्याची जाणीव ह्या लेखाच्या निमित्ताने पुन्हा एकदा झाली. आपल्या बाल्कनीत दोन गुलाबाची, एक तुळशीचं आणि एक मोगऱ्याचं झाड लावून सुटणाऱ्यातला हा प्रश्न राहिलेला नाही. प्रश्न फक्त हा की वेड पांघरून पेडगावला जाणाऱ्या शासनाला आपण एक जबाबदार नागरिक म्हणून ह्याची जाणीव कधी करुन देणार? 

कुठल्याही वाचकाला लेखन, प्रकाशन, संपादन ह्या सगळ्याबद्दल एक कुतूहल असायला हवं. आपल्या हातात जे पुस्तक आहे ते लेखकाच्या डोक्यात तयार होऊन आपल्या हातात पडेस्तोवर काय काय करावं लागतं ह्याची ही पूर्ण 'प्रोसेस' मनोरंजक असणारच. म्हणून निळू दामले ह्यांचा मॅक्सवेल पार्किन्सवरचा लेख खूप आवडला. विशेषतः स्कॉट फिझगेर्लड आणि अर्नेस्ट हेमिंग्वे हे लेखक माहीत असल्यामुळे तर जास्तच. टॉम वुल्फबाबत मला तुलनेने कमी माहिती आहे. सालाबादप्रमाणे ह्या सगळ्या लेखकांची पुस्तकं कधी वाचून होणार हा प्रश्न पडला आणि तो 'रिटायर झाल्यावर करायच्या गोष्टी' ह्या सदरात ढकलला गेला. :-) असो. 

ह्याच सदरात मोडणारा पुढला लेख प्रा. अ. का. प्रियोळकर ह्यांच्यावरचा डॉ. मीना वैशंपायन ह्यांचा. खरं तर मी प्रा. प्रियोळकरांबद्दल एक संशोधक म्हणूनही कधी ऐकलेले नाही. त्यामुळे ते लेखक होते ह्याबद्दल काही माहिती असण्याची शक्यता शून्य. अर्थात हा माझा दोष. पण शाळेत असताना अभ्यासाच्या धबडग्यात अवांतर वाचन राहून गेलं आणि शाळेतून बाहेर पडल्यावर फक्त इंग्रजीपुरतं मर्यादित राहिलं ही अभिमानाने सांगावी अशी नसली तरी खरी गोष्ट आहे. त्यांच्या संशोधनात्मक लिखाणात किती रस वाटेल हा भाग सोडला आणि त्यांचं ललितलिखाण पुढेमागे कधी वाचावं म्हटलं तरी एव्हढं जुनं साहित्य कुठे उपलब्ध असणार हा प्रश्न राहतोच. त्यावर ह्या लेखात काही प्रकाश टाकला असता तर बरं झालं असतं. 

अमिताभ बच्चन हा काही माझ्या आवडत्या नटांपैकी एक नव्हे. खरं सांगायचं तर मला त्याचा अभिनय बराच एकसुरी वाटत आला आहे. पुन्हा तो ज्या Angry Young Man च्या भूमिकेतून प्रसिद्धीस आला ते चित्रपट मला तरी बरेच अतिशयोक्तीपूर्ण वाटतात. त्यामानाने त्याचे आनंद, अभिमान, चुपके चुपके वगैरे आवडले होते. अर्थात अमिताभ ह्या विषयावर एवढं लिहिलं गेलंय की विजय पाडळकर ह्यांचा लेख वेगळं काय सांगणार असाच प्रश्न पडला होता. जंजीर, दीवार, आनंद वर लिहिलेलं बरंचसं आधी वाचलेलं. पण नमकहराम आणि सौदागर बद्दल (हा हल्ली हल्लीच टीव्हीवर अर्धामुर्धा पाहिला) वाचायला मिळालं. 'अभिमान' मधला शेवटची दोघांनी एकत्र गायची सिच्युएशन अत्यंत फिल्मी हे मत १००% पटलं. 

गोल्डन इरा हा अनेक भारतीय प्रेक्षकांसारखाच माझ्याही जिव्हाळ्याचा विषय. वहिदा, आशा पारेख, शर्मिला टागोर ह्यांचे काही चित्रपट पाहिलेत. अशोक राणे ह्यांचं फिल्मी जगतावरचं एक पुस्तक नुकतंच वाचलं. त्यामुळे त्यांचा 'तीन देविया' हा लेख मोठ्या उत्सुकतेने वाचला. पण तिघींबद्दल एव्हढं त्रोटक लिहिण्याऐवजी प्रत्येकीबद्दल एकेक लेख विस्ताराने लिहायला हवा होता असं वाटून गेलं. तसंच 'सौंदर्याच्या व्याख्येचा विचार करता आशा पारेख त्यात कुठे बसणार नाही' सरसकट विधान करताना आपली सौंदर्याची व्याख्या काय ह्याचाही उलगडा केला असता तर बरं झालं असतं. आशा पारेख नंतर वयाच्या मानाने थोडी थोराड दिसू लागली होती हे मान्य करूनही ती सुरुवातीच्या चित्रपटात गोड दिसायची. हा, आता शेलाटी बांधा हे सौंदर्याच्या व्याख्येतलं एक परिमाण असेल तर विषय संपला. 

८०च्या दशकात आमच्या घरी टाइम्स येत असे. त्यामुळे मारिओ मिरांडा ह्यांची व्यंगचित्रं नक्कीच आठवतात. मला वाटतं फोर्टमधल्या 'फाउंटन सिझलर्स' ह्या हॉटेलमध्येसुद्धा एक भिंतभरून त्यांची मोठी व्यंगचित्रं होती. आपण ऑर्डर केलेलं सिझलर कधी वाफाळत टेबलवर येतंय ह्याची वाट पाहत त्या चित्रातल्या व्यक्तिरेखा पाहणे हा एक आनंदाचा भाग होता. त्यांच्यावर मधुकर धर्मापुरीकर ह्यांनी लिहिलेला लेख आवडला. अँडी गोल्डसवर्दी ह्याच्याबद्दल निदान मी तरी कधी काही ऐकलं नव्हतं. निसर्गातच निर्माण केलेल्या त्याच्या कलाकृतीबद्दल महेंद्र दामले ह्यांनी लेख लिहिलाय. तो वाचणं आणि त्यात दिलेली त्या कलाकृतीची चित्रं पाहणं आवडलं. आता हे सगळं नेटवर शोधून पाहणं आलंच :-) 

'सोनेरी कासवीची गोष्ट' हे शीर्षक वाचून ती परीकथा (कदाचित अनुवादित) असावी असं वाटलं होतं. ही कथा वाचायला सुरुवात केली तेव्हा ती नेमकी कश्याबद्दल आहे ह्याचा उलगडा पहिली काही पानं झाला नाही. मग सीता, द्रौपदी, अहिल्या आणि रेणुका ह्यांचे उल्लेख आले तेव्हा थोडा थोडा उलगडा होऊ लागला. माधवीची कथा माहिती होती पण नंदिनी आणि चित्रांगदा ह्यांच्याबद्दल नंदिनी कामधेनूची मुलगी आणि चित्रांगदा ही अर्जुनाची मणिपूर इथली पत्नी ह्यापलीकडे काही माहिती नव्हती. पण ह्या कथेतली नंदिनी कृष्णाच्या १६१०० पत्नीपैकी एक. किरण येले ह्यांची ही  कथा खूप आवडली पण सोनेरी कासवी कोण ह्याचा मात्र मला उलगडा झाला नाही. लेखकाला ईमेल करून विचारावं का?

'भातुकलीतून निष्कासित' ही संतोष शिंत्रे ह्यांची कल्पित वाटली असती एके काळी. पण आजच्या काळात खूप relevant वाटली ही खरं तर वाईट गोष्ट आहे. 

अंकातले बाकीचे माहितीपूर्ण लेख म्हणजे रंगधुरंधर विद्याधर (शुभदा दादरकर), रंगीला रॉबर्टो  (दिलीप चावरे), जोगती परंपरेतील दंतकथा 'मंजम्मा' (प्रा. डॉ. प्रकाश खांडगे), 'चिनी कूटनीती' (डॉ. शरद वर्दे), 'श्री सरस्वती प्रेस' (पी. आर. रे) आणि  'भारताचा इतिहास बदलणारे पालखेडचे युद्ध' (चंद्रशेखर नेने). 'गुलदस्त्यातील रत्न: ओरछा' हा अनुराधा ठाकूर ह्यांचा लेख वाचून इथे कधीतरी जाण्याचा विचार पक्का केलाय. 

'प्राण्यांचं आधुनिक जग' मधली प्रशांत कुलकर्णी ह्यांची कार्टून्स आवडली. बाकी अंकातल्या हायकू आणि सेनर्यु बर्याचश्या डोक्यावरून गेल्या ह्यात नवल नाही. कवितेचं आणि माझं फारसं कधी जमलेलं नाही. हा नियम सिद्ध करायला की काय कोण जाणे पण अपवाद म्हणून महेश केळुस्कर ह्यांची 'फ्रायकू', उत्तपा कोळगावकर ह्यांची 'चिठ्ठी' आणि अंजली कुलकर्णी ह्यांची 'या आखीवरेखीव सुबक बागेत' फार आवडल्या. शेवटल्या कवितेने तर 'एका तळ्यात होती' ची आठवण करून दिली. 

अंकातले काही लेख अधिक मनोरंजक, अधिक सोप्या पद्धतीने लिहिले असते तर अधिक वाचनीय झाले असते असं वाटलं. पण एकंदरीत अंक आवडला. 

Sunday, December 3, 2023

२. अक्षर (दिवाळी अंक २०२३) (किंमत ३०० रुपये)

 लोकसत्ताच्या अंकातले चॅटजीपीटीवरचे लेख फारसे आवडले नव्हते. त्यामुळे ह्या अंकाची सुरुवातच तब्बल ११ लेख असलेल्या 'एआयचं जग' ह्या विभागाने झाली हे पाहून थोडी निराशाच झाली. नेटाने काही लेख वाचले खरे पण नंतर नंतर मात्र प्रयत्न सोडून दिला आणि काही लेख चक्क स्किप केले.

सतीश तांबे ह्यांची 'अब्रह्मण्यम ' थोडी वेगळ्या धाटणीची वाटली. पण खरं सांगायचं तर लेखकाला काय म्हणायचं आहे ते आपल्याला पूर्ण कळलेलं नाही असंच अजून वाटतं आहे. तेच 'भर माध्यान्ही' ह्या कथेबद्दल. 'मणिपूरची फाळणी' हा पार्थ एम. एन. ह्यांचा रिपोर्ताज अस्वस्थ करणारा. हे असं काही आपल्या देशात घडलं आणि काही दिवस कोणाला त्याचा पत्ताही लागला नाही हेच मुळात भयंकर अस्वस्थ करणारं आहे. आपण कुठे चाललोय ह्याचा विचारही करवत नाही. :-(

'मॅडपणा नुसता' हा गजू तायडे ह्यांनी लिहिलेला लेख व्यंगचित्रकार Al Jaffee ह्यांची ओळख करून देतो. फोल्ड-इन व्यंगचित्र ही कल्पनाच भारी वाटते, लेखात दिलेले 'snappy answers to stupid questions' चे नमुने खूप आवडतात आणि 'मॅड' चे जुने अंक कुठे वाचायला मिळतील का हा विचार डोक्यात येऊन जातो. व्हिएतनामवरचा हेमंत कर्णिक ह्यांचा रिपोर्ताज आवडला. 

'सण' ही वासिम मणेर ह्यांची कथा एक चांगला विचार मांडते. पण त्यातल्या पात्रांच्या तोंडी जी शिवराळ भाषा आहे ती वाचून अगदी नको नको होतं. पात्रांची सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी अधोरेखित करायला ती कदाचित गरजेची असेलही पण तरी भातातल्या खड्यांसारखी वाक्यावाक्याला टोचत राहते. 

शरणकुमार लिंबाळे हे नाव ऐकून माहीत आहे. पण एकूणात वास्तववादी काही पाहायची किंवा वाचायची हिंमत माझ्यात सध्यातरी नसल्यामुळे त्यापलीकडे त्यांच्या लिखाणाशी माझा परिचय नाही. तो थोड्याफार प्रमाणात संजय पवार ह्यांचा लेख वाचून झाली. वाढत्या वयानुसार ही हिंमत पुढेमागे गोळा करता आलीच तर त्यांची पुस्तकं नक्की वाचेन. 

समीर गायकवाड ह्यांचे काही लेख 'मायबोली' ह्या साईटवर वाचले होते. इथे 'काही' हा शब्द महत्त्वाचा. हेही लिखाण वाचायची हिंमत सध्या नाही. मुळात हे असं  वाचून त्यातून जी भयानक अस्वस्थता येते आणि पुढे दिवसचे दिवस वाचलेला मजकूर आठवून अधूनमधून जाणवत राहाते ती सोसायची तयारी नाही. सध्या कोशात जगणं मान्य केलेलं आहे. पण तरी त्यांनी संस्करण केलेल्या 'कविता वेश्यांच्या' ह्या सदरातल्या सगळ्या कविता वाचल्या. त्यांचं भयानक दु:ख आणि आयुष्य अक्षरश: डोळयांपुढे उभं राहातं. ह्यापुढे आणखी काय सांगायचं? :-(

'शेजारी देशांमधले मुसलमान' हा पाकिस्तानमधले अहमदिया, म्यानमारमधले रोहिंग्या आणि चीनमधले उइघुर ह्यांच्यावरच्या अन्यायाबद्दल माहिती देणारा लेख सध्या अप्रिय असणाऱ्या विषयावर भाष्य करणारा. लोकेश शेवडेंचा 'ब्रूसली चा प्रश्न' हा रिपोर्ताज आवडला. 

जाफर पनाही ह्या इराणी दिग्दर्शकाबद्दल आणि त्याच्या चित्रपटांबद्दल मीना कर्णिक ह्यांनी लिहिलं आहे. पैकी The White Balloon बद्दल वाचलं होतं. वेळ काढून हे सर्व चित्रपट बघणार ही खूणगाठ मनाशी पक्की केली आहे. 

'वैखरी' ही डॉ. संतोष पाठारे ह्यांची कथा आवडली अश्यासाठी की ती आपल्याला कथा वाचताना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर शेवटपर्यंत देतच नाही.

अंजली चिपलकट्टी ह्यांचा 'बेलेईव्हचे पाळतू कोल्हे' हा रिपोर्ताज देशातल्या सद्य स्थितीवर परखड भाष्य करणारा. प्रदीप चंपानेरकर ह्यांचा 'नेहरू आणि मी' आज देशात ज्यांचं विस्मरण होतं आहे त्या विचारांची आठवण करून देतो.

'निरोप' ही शिल्पा पाठक ह्यांची कथा मात्र मला खूप आवडली. नवरा सोबत असताना दर सुट्टीत ritual म्हणून जी गोष्ट करत होतो तीच गोष्ट तो सोबत नसताना आपण करू शकतो की नाही ह्याची खात्री नसताना करत स्वतःच स्वतःला गवसत जाणारी ही स्त्री आहे. 

प्रकाश अकोलकर ह्यांनी 'चारचौघे' मध्ये सुधीर नांदगावकर, जयंत धर्माधिकारी, वि.वि. करमरकर आणि कमलाकर नाडकर्णी ह्यांच्याबद्दल लिहिलं आहे. पण ह्याबद्दल अधिक विस्ताराने वाचायला आवडलं असतं. डॉ. ऋषिकेश रांगणेकर ह्यांनी नेहमीपेक्षा थोडं हटके राशिभविष्य लिहिलं आहे ते वाचण्यासारखं. 

१. लोकसत्ता (दिवाळी अंक २०२३) (किंमत २०० रुपये)

 ह्या वेळेला दर वर्षीचे ठरलेले अंक आधी आणायचे आणि मग उरलेले कुठले आणायचे ते लोकसत्तामधले परीक्षण वाचून ठरवायचं असं मनाशी योजलं होतं. त्याप्रमाणे लोकसत्ता, लोकमत, किल्ला, दुर्गांच्या देशातून आणि भवताल मॅजेस्टिकमधून घेऊन आले. दिवाळी संपायच्या आधी काही कुठला अंक वाचायची सवड झाली नाही. ती झाली तेव्हा हात आपसुक लोकसत्ताकडेच गेला.

पहिला लेख जेजुरीवरचा - भूषण कोरगांवकर ह्यांचा. लोकसत्ताच्याच एका स्तंभात त्यांनी केलेल्या लिखाणावरून त्यांचा परिचय झाला होता.  अनेक वर्षांपूर्वी अष्टविनायक केले तेव्हा शेवटी जेजुरीला गेलं असल्याचं अंधुक आठवतं. ह्या लेखातून जेजुरी, खंडोबा, त्याच्या पत्नी, तिथल्या मातीत जन्मलेले कलाकार अशी बरीच माहिती मिळते. तशी मी फारशी धार्मिक नव्हे. एकदा जाऊन यायला हवं असं मनात येऊन गेलंच. देवाच्या मनात असेल तरच दर्शन होतं म्हणतात. बघू कधी योग येतो. 

लहानपणापासून घरात लोकसत्ता येतो. कोणा एका पक्षाची तळी न उचलता जे बरोबर त्याचं कौतुक करणं आणि जिथे चुकतं तिथे कसलाही मुलाहिजा ना बाळगता खडे बोल सुनावण हे माध्यमाचं काम. ते लोकसत्ता चोख पार पाडतो. लोकसत्ताचा अग्रलेख तर माझा खास आवडीचा विषय. गिरीश कुबेर ह्यांचं लिखाण सहसा आपल्या वाचनात न येणाऱ्या अनेक गोष्टींची ओळख करून देतं. त्यातून राजकारण - मग ते देशी असो वा आंतरराष्ट्रीय - आजकाल फारच इंटरेस्टिंग विषय झाला आहे. त्यामुळे चीनच्या अध्यक्ष्यांवर लिहिलेला कुबेर ह्यांचा लेख खूपच आवडला. चीन ह्याच विषयावरचा सुधींद्र कुलकर्णी ह्यांचा लेखसुद्धा वाचनीय. ह्या विषयावर कितीतरी वाचण्यासारखं आहे. ६० नंतर नक्की करायचं असं परत एकदा मनाला बजावलं.

धर्म ह्या विषयावर काही लिहू नये आणि सांगू नये अशीच आजकाल परिस्थिती असताना वरूण सुखराज मात्र 'सर, मै सेख इद्रिस' ह्या आपल्या लेखातून शहाणपणाचे बोल सहजगत्या सांगून जातात. अर्थात ज्यांना हे समजून घ्यायचंच नाही किंवा समजूनही न समजल्याचा आव आणायचा आहे त्यांच्या पालथ्या घड्यावर पाणीच असणार आहे. असो. 

दर वर्षी 'किल्ला' किंवा 'दुर्गांच्या देशातून' चे दिवाळी अंक वाचताना आपल्या किल्ल्यांचा परवडीबद्दल वाचून खंत वाटते. आपण ह्यात बदल घडवून आणायला काय करू शकतो हे समजत नसल्याने अधिकच अपराधी वाटतं. 'किल्ल्यांच्या प्रश्नांना कुलूप' हा लोकेश शेवडे ह्यांचा लेख वाचून पुन्हा एकदा ज्यांनी हे करणं आवश्यक आहे ते कुठल्या चर्चेत गुंतले आहेत ते आठवून विषण्णता आली. :-(

'पुरोगामी? परंपराभिमानी? कर्कशतेला कंटाळलेल्या अभ्यासकाची टिपणे' हा लांबलचक शीर्षकाचा हेमंत राजोपाध्ये ह्यांचा लेख ते शीर्षक वाचून उत्सुकतेने वाचायला घेतला खरा. पण सुरुवातीचा काही भाग सोडला तर तो भरकटत गेल्यासारखा वाटला. लेखकाला नक्की काय सांगायचं आहे ते निदान मला तरी कळलं नाही. 

'सिनेमा' आणि 'नाटक' हे माझे आणखी दोन आवडीचे विषय. बाबुराव पटेल हे नाव मी आधी कधी ऐकल्याचं स्मरणात नाही. पण विजय पाडळकर ह्यांचा त्यांच्याविषयीचा लेख वाचून 'फिल्म इंडिया' चे अंक कुठे मिळतात का ते पाहण्याची आणि सादत हसन मंटो ह्यांनी लिहिलेलं 'Stars From Another Sky' हे पुस्तक वाचायची इच्छा मात्र बळावली आहे. तीच गोष्ट 'पांगळ्या श्रद्धेचं  युग' ह्या आसाराम लोमटे ह्यांच्या लेखाची. शाळेत सातवीपर्यंत असलेलं हिंदी आठवीला पूर्ण संस्कृत घेतल्यावर सुटलं. नंतर पुढे फक्त हिंदी चित्रपट आणि बंबैय्या हिंदी. अभ्यासात असलेल्या मुन्शी प्रेमचंद ह्यांच्या काही कथा सोडल्या तर हिंदी साहित्याचा परिचय व्हायची संधीच आली नाही. ६० नंतर करायची आणखी एक गोष्ट ह्या सदरात सध्या हा एक पॉईंट बनून आहे. त्यात हा लेख वाचून हरिशंकर परसाई हे एक नाव समाविष्ट झालं. 

'भारत @ २०४७' ह्या विभागातले २ लेख मला तरी फारसे आवडले नाहीत किंवा झेपले नाहीत म्हणा हवं तर. 

सतराव्या शतकातलय भारताची ओळख करून देणारया 'विश्वगुणादर्शचंपू' ह्या दाक्षिणात्य ग्रंथाविषयीचा निखिल बेल्लारीकर ह्यांचा लेख आणि दक्षिणेचा दिग्विजय ह्या विभागातले ३ लेख माहितीपूर्ण वाटले. रघुनंदन गोखले ह्यांचा लोकसत्तातला बुद्धिबळाविषयीचा लेख दर आठवड्याला (त्यातलं बरंचसं कळत  नसूनही!) वाचते त्यामुळे त्यांच्या 'भारतीय बुद्धिबळ तरुण झाले' ह्या लेखात उल्लेख केलेले बरेचजण वाचून परिचयाचे आहेत. बाकी त्यापलीकडे ह्या खेळाचा आणि अस्मादिकांचा संबंध ह्या जन्मी येईल असं वाटत नाही :-)

चॅटजीपीटी ह्या विषयावर इतकं बोललं आणि लिहिलं जातंय की आता खरोखर अजीर्ण व्हायची वेळ आली आहे. तरी ह्या नव्या टेक्नोलॉजीने लिहिलेल्या कथा आहेत  तरी कश्या म्हणून 'कथाकार चॅटजीपीटी' भागातल्या एकाच कल्पनेभोवती गुंफलेल्या ५ विविध genre मधल्या कथा वाचल्या. मला तरी बर्याच बाळबोध आणि काहींश्या असंबध्द्दच वाटल्या.

दरवर्षीप्रमाणेच ह्या वर्षीही कवितांचा विभाग चाळला. खरं तर आपल्याला कविता कळली की नाही ह्याबद्दल नेहमीच माझ्या मनात एक संदेह असतो. हे वर्ष अपवाद कसं असणार म्हणा. काही कविता कळल्या असं वाटलं. काही कळल्या नाहीत ह्याची खात्री आहे :-) 'सूर्यास्त एक पाहणे' ह्या विभागातली प्रशांत कुलकर्णी ह्यांनी काढलेली व्यंगचित्रं आवडली. 

Sunday, March 26, 2023

११. दीपोत्सव (दिवाळी अंक २०२२) (किंमत २९९ रुपये)

लोकमतचा दीपोत्सवचा अंक वाचणं ही दर दिवाळीला मेजवानी असते. मागच्या दिवाळी अंकाची किंमत काय होती पाहायला हवं. ह्या वर्षीची २९९ रुपये किंमत वाचून हसायला आलं. अमेरिकेतलं ९९ सेंट्सचं खूळ दिवाळी अंकातसुद्धा येईल असं वाटलं नव्हतं. असो. 

तर दर वर्षीच्या लोकमतच्या दिवाळी अंकात रिपोर्ताज असतात. खरं तर मला हा अंक एवढा आवडण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. ह्या वर्षीच्या अंकातदेखील कोल्हापूरच्या कुस्त्या आणि त्यातल्या पहिलवानांचं जीवन, स्त्रियांना सोबत आणि इतर बरंच काही पुरवणारे जिगोलोज (हा विषय दिवाळी अंकासाठी बोल्डच म्हणायचा. किती लोकांना चिवड्याचे बोकणे भरताना आणि चकलीचा तुकडा मोडताना ठसका लागला असेल देव जाणे!), हवे ते अमली पदार्थ हवे तेव्हा हवे तेव्हढे अगदी घरपोच आणून देणारे ड्रग पेडलर्स, गावातल्या अनेक गोष्टींची काळजी घेणारे तलाठी, देश-विदेशातल्या लोकांची बॅंक खाती हातोहात साफ करणारे जमतारा आणि आसपासच्या गावातले सायबर गुन्हेगार आणि भारतातलया दूरवर पसरलेल्या दुर्गम खेड्यापाड्यात - जिथे वैद्यकीय सेवा अजून पोचलेली नाही - लोकांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या आशा सेविका अश्या नानाविध विषयांवरचे रिपोर्ताज आहेत. मला आठवतं की काही वर्षांपूर्वीच्या एका दिवाळी अंकात ट्रक ड्रायव्हर्सच्या आयुष्यावर वेगवेगळे लेख होते. ह्या वर्षीही अंकात त्यांच्यावर एक लेख आहे. 

ह्याखेरीज आपल्या आयुष्यावर रणवीर सिंगने बरंच काही सांगितलंय. गेल्या काही वर्षात भारताला श्रीमंतांची व्याख्या कशी बदलली ह्याबद्दल शोभा डे ह्यांनी लिहिलंय. त्यांचं लिखाण बऱ्याच वर्षांनी वाचनात आलं. ह्या मूळच्या राजाध्यक्ष असूनही लेखाच्या शेवटी 'अनुवाद' वाचून हसावं का रडावं ते कळेना. माणूस मातृभाषेला इतका पारखा होऊ शकतो? असो. पैशाशी भारतीयांच्या असलेल्या लव्ह-हेट रिलेशनशीपबद्दल मंदार भारदे ह्यांनी काही अचूक निरीक्षणं  नोंदवली आहेत.

जनरेशन झेडबद्दल अनेकांनी अनेक वेळा लिहून झालंय. पण तरी संजय आवटे ह्यांच्या लेखातून ह्या विषयाबद्दलचे अजून काही पैलू उलगडतात. फाळणीनंतर कधीही आपल्या मूळ गावी परतू न शकलेल्या पण त्या गावाची, तिथल्या माणसांची आठवण मनात जपणारी पिढी आणि आपल्या आजी-आजोबाना व्हर्च्युअली का होईना पण ते गाव दाखवायला धडपडणारी त्यांची नातवंडं ह्यावर शर्मिला फडके ह्यांनी लिहिलंय. विदेशातून भारतात काम करायला येणाऱ्या लोकांचं 'इंडिया सेन्सीटायझिंग' करताना आलेल्या अनुभवांवर वैशाली करमरकर ह्यांनी लिहिलेला लेख वाचनीय आहे. तर भारतातली गावं आणि तिथे राहणारे लोक ह्यांच्याविषयीच्या शहरी लोकांच्या टिपिकल समजुतींना छेद देणारा लेख मिलिंद थत्ते ह्यांनी स्वानुभवातून लिहिलाय. जागतिकीकरणाच्या लाटेत आपल्याकडच्या नानाविध खाद्यपरंपरा कश्या नष्ट होत चालल्या आहेत ह्यावर चिन्मय दामले ह्यांनी लिहिलेला लेख विचार करायला लावतो. 

दर वर्षीप्रमाणेच ह्या अंकाने यंदाही उत्तम वाचनीय पण तरीही विचार करायला लावणारा मजकूर दिला आहे ह्यात शंकाच नाही. 

Tuesday, March 14, 2023

१०. भवताल (दिवाळी अंक २०२२) (किंमत ३०० रुपये)

भवतालचा २०२२ चा दिवाळी अंक 'सडे पठारे' विशेषांक. कोकणाशी फारसा संबंध नसला तरी गेली काही वर्षं भवतालचे अंक वाचून सडे म्हणजे जांभ्या दगडाची बनलेली सपाट जागा एव्हढं ज्ञान आहे. ह्या सड्यांवर आढळणाऱ्या कातळशिल्पांबद्दल वाचलंय. तेव्हा अख्खा दिवाळी अंक काढण्याइतकं ह्यात काय आहे बुवा लिहिण्यासारखं हे थोडं अधिक कुतूहल नेहमीप्रमाणे हा अंक घेताना होतं. 

अंक वाचायला सुरुवात केली तेव्हा ह्यावर लिहिण्यासारखं किती आणि कायकाय आहे ते लवकरच लक्षात आलं. मुळात सडे पावसाचे चार महिने सोडले तर कोरडे असतात म्हणून सरकारदरबारी त्याची पडीक जमीन म्हणून नोंदणी असली तरी प्रत्यक्षात तिथे विविध प्रकारची जीवसृष्टी नांदत असते. पावसाळा सुरु झाला की निरनिराळ्या प्रकारची फुलं, गवताचे नानाविध प्रकार, फुलपाखरं, किडे-कीटक, पक्षी असं काय काय एकोप्याने नांदायची जागा म्हणजे सडे. हे सडे सच्छिद्र जांभ्या दगडाचे बनलेले असल्याने ह्यातून पाणी आत झिरपते आणि भूजल पातळी तर वाढतेच पण आजूबाजूच्या गावांना ह्यातून पाणी पुरवठा होतो. सड्यावर इतर वेळी उगवणारं गवत गुरांना चारा म्हणून उपयोगी पडते. सडे हा एकाच अधिवास नसून त्यात अनेक छोटे अधिवास असतात आणि तिथे त्या त्या अधिवासाप्रमाणे अनुकूल (आणि फक्त तिथेच सापडतील अश्या!) प्रजाती सापडतात. पावसाळ्याचे चार महिने दर पंधरा दिवसांनी सडयाचं रूप बदलतं कारण आधीच्या वनस्पती आपलं आयुष्य जगून पुढल्या वनस्पतींना फुलायला जागा मोकळी करून देतात. पाचगणीचं टेबललॅन्ड म्हणजे एक सडा असून त्याचं बेलगाम पर्यटनामुळे होणारं नुकसान थांबवायला कोर्टात जावं लागलं हे वाचून तर मी थक्क झाले. 

ही सगळी माहिती देणारे अत्यंत सुरेख लेख ह्या अंकात आहेत. तरी मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो तो विभाग पाचचा - ह्यात कोकणातल्या सड्यांसोबत चांदवड, अंजनेरी, दुर्गावाडी. बाकाळे आणि चोर्ला इथल्या सड्यांविषयी माहिती आहे - आणि केलेंडर ह्या सदराचा - ह्यात कौस्तुभ मोघेंनी वर्षाच्या बारा महिन्यात सड्यात होणाऱ्या बदलांना टिपणारे प्राणी, फुलं, कीटक, वनस्पती ह्यांचे सुरेख फोटो दिलेत. 

आपल्या बेपर्वाईमुळे, पैश्याच्या हावेपोटी आणि जनतेचं भलं करण्यापेक्षा आपलं आणि आपल्या सात पिढ्यांचं भलं करायचं ह्या ध्येयाने पछाडलेल्या राजकर्त्यामुळे राज्यभरात सड्याचं किती नुकसान होतंय हे जवळजवळ प्रत्येक लेखात वाचून मन खंतावतं. आपल्याला कधी अक्कल येणारच नाहीये का? :-(

तरी अंकातील शेवटच्या विभागातले - शिकवण-संवर्धन-दृष्टी - लेख वाचून थोडी आशा वाटते. ठिकठिकाणी कार्यरत असलेल्या संस्थांमुळे आणि त्यात काम करणाऱ्या लोकांमुळे जे राहिलंय ते वाचेल, तगेल अशी आशा वाटतेय. देव करो आणि जनतेला अक्कल येवो आणि राज्यकर्त्यांना उपरती होवो.

एक लिहावंसं वाटतं की संपादकांनी ज्या व्यक्तींचे लेख घेणार आहोत त्यांच्याशी संपर्क साधून बाकी कुठले लेख अंकात असणार ह्याविषयी कल्पना द्यावी. त्यामुळे अंकात होणारी पुनरावृत्ती टळेल. उदा. अंकातील पहिला लेख सडे म्हणजे काय, ते कसे बनले असावेत वगैरे प्राथमिक माहिती देणारा असला तर बाकीच्या लेखांत हा उल्लेख टाळता येईल आणि अधिक उपयुक्त माहिती देता येईल. 

ह्या वर्षीच्या दिवाळीला कुठला विशेषांक असेल ह्याची उत्सुकता आत्तापासूनच लागलेली आहे :-)

Saturday, March 11, 2023

९. उत्तम अनुवाद (दिवाळी अंक २०२२) (किंमत ३२० रुपये)

 अनुवादित साहित्य असणारा दिवाळी अंक घ्यायचा की नाही हे मला दरवर्षी नव्याने ठरवावं लागतं. कारण अनुवाद ही अशी गोष्ट आहे की ती जर जमली नाही तर ती कथा किंवा कादंबरी जे काय असेल ते एकदम कृत्रिम वाटायला लागते. ओरिजिनल वाचता आली असती तर बरं झालं असतं ही बोच लागते. आणि वेळ फुकट गेला ही चिडचिड होते. पदरचे पैसे खर्च करून हा त्रास का विकत घ्या. अर्थात मी ही पोस्ट करतेय म्हणजे २०२२ च्या दिवाळीत हा अंक घेतला हे उघड आहे. असो. 

ह्यातल्या खूप आवडलेल्या गोष्टी म्हणजे पोस्ट ऑफिस (गौरीशंकर गोवर्धनराम जोशी हे मूळ गुजराती लेखक - गुजराती थोडंफार समजत असल्याने ह्यांचं मूळ साहित्य शोधून वाचायचा प्रयत्न करता येईल म्हणून ही नोंद), कुंती व निषादी (मूळ लेखिका महाश्वेतादेवी), पोस्टमास्तर (मूळ लेखक रवींद्रनाथ टागोर - बंगाली शिकायला मुहूर्त लागेतो मूळ साहित्य वाचणं अशक्य!), कोलकाता शेई काल, एई काल (मूळ लेखिका आशापूर्णादेवी), दही विक्रेती (मूळ लेखक मस्ती व्यंकटेश अय्यंगार - इथे मूळ साहित्य वाचणं ह्या जन्मी शक्य होईल असं वाटत नाही!), टेलिग्राम (मूळ लेखक आयन क्रायटन स्मिथ - हे नाव आधी कधी ऐकलं नव्हतं), रमजानी (मूळ लेखक ललित मिश्रा), वळून बघता मागे (मूळ लेखिका इस्मत चुगताई), ढिगाऱ्याचा मालक (मूळ लेखक मोहन राकेश), नांगर बोलतोय (मूळ लेखक पोंकून्नम वारकी) आणि मोहर बदलून गेली (मूळ लेखक कृष्णा सोबती). 

हिंदी साहित्य वाचायला सुरूवात करायला हवी हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं. खरं तर मराठी साहित्यसुद्धा आपण फारसं वाचलेलं नाही ही जुनी बोच आहेच. साठी उलटण्याची वाट बघायला नको - कल करे सो आज कर, आज करे सो अब हेच खरं. 

Thursday, February 16, 2023

८. ऋतुरंग (दिवाळी अंक २०२२) (किंमत ३०० रुपये)

 ह्या ब्लॉगवर एक नजर टाकल्यावर लक्षात आलं की २०२१ मध्ये मी ऋतुरंगचा दिवाळी अंक घेतला नव्हता. २०२० मध्ये घेतला होता. ह्या वर्षीची ह्या अंकांची खरेदी अनुक्रमणिका बघून केली होती.

पैकी बरेचसे लेख शब्दांकित. मग तो सत्यजित रेंवरचा शर्मिला टागोरचा असो किंवा शबाना आझमीवरचा जावेद अख्तर ह्यांचा असो किंवा निसर्गाशी असलेलं स्वतःचं नातं उलगडून सांगणारा दीप्ती नवल ह्यांचा असो. पण ह्यामुळे झालंय काय की शब्दांकन कितीही समजून उमजून केलेलं असलं तरी मूळ लेखाची सर त्याला येत नाही. कुठे ना कुठे तरी एखादा शब्द बोचतोच. कुठे वाक्यरचना उगाचच क्लिष्ट वाटते. दुसरं म्हणजे हे लेख छोटे वाटतात, त्रोटक वाटतात. पण हेही खरंच की शब्दांकन नसतं तर मिंटल मुखिजा, रसिका रेड्डी (ह्यांचा लेख बहुतेक लोकसत्तात आधी वाचला होता), दुर्गा गुडीलू ह्यांच्याबद्दल कळलंच नसतं.

त्यामानाने मराठी माणसाच्या लेखांचं शब्दांकन तितकंसं खटकत नाही. ह्यात कमल परदेशी, मीरा उमप, मीरा बाबर, लक्ष्मण चव्हाण, राजू बाविस्कर, सुरेख कोरडे, शिवराम भंडारी ह्या निदान मी तरी कधी नावं न ऐकलेल्या व्यक्तींच्या आयुष्याच्या प्रेरणादायक कथा आहेत. सुशीलकुमार शिंदे, मुकुंद संगोराम, किशोर मेढे ह्यांचे लेखही वाचनीय आहेत. वसंतदादा पाटील आणि गुलजार ह्यांच्यावरच्या अंबरीश मिश्र ह्यांच्या लेखात सुद्धा ह्या त्रुटी तुलनेने कमी जाणवल्या. भास्करराव पेरे पाटील ह्यांच्या लेखाचा खास उल्लेख करावासा वाटतो कारण सरकार मदत करेल म्हणून वाट बघत न बसता त्यांनी आपल्या गावाचा जो कायापालट केला त्याबद्दल वाचायला फार छान वाटलं. ज्याला आपण आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग म्हणतो त्याचा प्रॅक्टिकल वापर केलाय. 

ललित भागातले हिमवाटेवरील पहाट (सुरेशचंद्र वारघडे) आणि मायकल पालीनचा जगप्रवास (नीती मेहेंदळे) हे लेख आवडले. अंजली आंबेकर ह्यांच्या लेखातून आदिवासी संगीत पार सातासमुद्रापल्याड नेणाऱ्या नंचयम्मा ह्यांची ओळख होते. मल्हार अरणकल्ले ह्यांचा गावाकडल्या ऋतूबदलांची ओळख करून देणारा 'ही वाट दूर जाते' हा लेखही वाचनीय आहे. 

दोन लेख मात्र खटकले. एक नृत्यसाधनेची सहा वर्षं हा डॉ. भाग्यश्री पाटील ह्यांचा. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली आणि ते नेटाने पूर्ण केलं हे कौतुकास्पद आहे ह्यात वादच नाही. पण ह्या नृत्यप्रवासात त्यांना काय अडचणी आल्या, त्यावर त्यांनी कशी मात केली ह्याबाबत लेखात फार कमी माहिती आहे. नृत्य लहान वयात शिकायला सुरुवात करावी लागते कारण त्यासाठी लागणार लवचिकपणा तेव्हा शरीरात असतो ही सर्वमान्य समजूत आहे. त्याला छेद देत हा प्रवास त्यांनी केला तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कोणाला जायचं असेल तर त्या व्यक्तीने काय करायला हवं किंवा नको त्याविषयीची माहिती लेखात हवी होती. तसं न होता हा लेख निव्वळ आभारप्रदर्शनाचा झाला आहे. हे टाळता आलं असतं.

दुसरा लेख विनय सहस्र्बुद्धे ह्यांचा - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्यांच्यावर लिहिलेला. सहस्र्बुद्धे ह्यांचं नाव ओळखीचं वाटलं. गुगल केल्यावर त्यांचं लिखाण कुठे वाचलंय आणि गाडी कुठल्या रुळावरून धावणार ह्याचा नेमका अंदाज आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्यांच्या आयुष्याबद्दल माहिती मिळाली. त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाबद्दल, त्यांच्या राष्ट्रपती पदावर नेमणूक होण्याआधीच्या कामाबद्दल आदर आहे. पण "त्या कोणालाही गृहीत धरत नाहीत आणि कोणीही त्यांना गृहीत धरू शकत नाही" वगैरे लेखकाची विधानं भाषणात टाळ्या पडाव्या ह्या हेतूने करतात थेट तश्या पद्धतीची वाटली. त्यांची नोकरशाहीवरची पकड आणि अचूक थेट प्रश्न विचारायची सवय वगैरे अजून तरी दिसायची आहे. तूर्तास रबर स्टॅम्प ह्या यशवंत सिंह ह्यांच्या शब्दांची आठवण व्हावी अशीच स्थिती आहे. स्थिती बदलेल अशी आशा करावी का?

असो. पुढल्या वेळी अनुक्रमणिका जरा सावधपणे पाहावी लागेल असं दिसतंय. 

Sunday, February 12, 2023

७. लोकसत्ता (दिवाळी अंक २०२२) (किंमत १७५ रुपये)

खरं तर दर वर्षी दिवाळी अंक वाचनाची सुरुवात लोकसत्ताच्या अंकाने करायची हा माझा अलिखित शिरस्ता.  हा अंक आधी आणलेल्या अंकांत होता. नंतर काही अंक आणले ते खाली ठेवले आणि आधीच संच कपाटावर ठेवला गेला. मग खाली ठेवलेले अंक आधी वाचून टाकले. त्यामुळे लोकसत्ताचा अंक वाचायला उशीर झाला. 

२०२२ च्या बरीच बऱ्याच अंकांप्रमाणे ह्या अंकाची अनुक्रमणिका वाचून आता वेळ सत्कारणी लागणार ह्याची खात्री पटली. पहिला लेख अभिनव चंद्रचूड ह्यांचा - दुय्यम न्यायालयांना देशाच्या घटनेचा अर्थ लावण्याचा हक्क मिळावा असा ह्यातला युक्तिवाद. म्हटलं तर क्लिष्ट विषय. शाळेत असतानाही नागरिकशास्त्र हा आवडीचा विषय नव्हता. पण गेली काही वर्षं राज्यघटना आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टीबाबत थोडं वाचू लागले आहे. त्यामुळे हा लेख ज्ञानात भर टाकणारा वाटला. बीबीसी माहीत नसलेल्या लोकांनाही भारतात गेले काही दिवस हे नाव माहित झालेलं आहे. मी गेली कित्येक वर्ष त्यांचा ऐतिहासिक घटनांचा ९-१० मिनिटात मागोवा घेणारा Witness History हा पॉडकास्ट ऐकते आहे. त्यामुळे ह्या संस्थेबद्दल मनात खूप आदर आहे. सतीश जेकब ह्यांचा 'बीबीसीतले  दिवस', आशुतोष ह्यांचा 'बीबीसी आजही आशेचा किरण' आणि गिरीश कुबेर ह्यांचा 'एका क्रान्तीचं शतक' हे लेख वाचून तर हा आदर आणखी वाढला. कधी इंग्लंडला जाणं झालंच तर बाहेरून का होईना त्यांची इमारत नक्की पाहून येणार आहे. श्याम सरन ह्यांच्या 'बीबीसीचे भारताबद्दलचे धोरण बदलते आहे' मध्ये थोडा वेगळा सूर लागला आहे. असो.

'प्राचीन भारत', 'भारतीय संस्कृती' वगैरे शब्द कोणी वापरायला लागले की धडकी भरते आजकाल. पण 'सहिष्णुता' शब्द वाचल्यावर जीवात जीव आला. आजकाल हा शब्द नाहीसा झालाय वापरातून. हेमंत राजोपाध्ये ह्यांचा हा लेख संस्कृतीच्या नावाने गळे काढणाऱ्या समस्त मंडळींना वाचायला द्यायला हवा. ह्या वाढत्या असहिष्णूतेची कारणं आपल्या सर्वानाच ठाऊक आहेत. तरीही ह्या कारणांसोबतच ह्यावर काय उपाय करता येईल ह्याचा उहापोह नौशाद उस्मान ह्यांनी आपल्या लेखात केला आहे. त्यांच्या लेखाच्या शेवटच्या 'इन्शा अल्लाह' ला माझं 'देव करो' आणि 'Amen' जोडते. हे होईल तो सुदिन.

विनय सहस्त्रबुद्धे ह्यांचे लेख लोकसत्तामध्ये वाचले आहेत. त्यांच्या लेखाचं 'सदिच्छा संपदेकडून सॉफ्ट पॉवरकडे' हे शीर्षक वाचून लेखात काय मालमसाला असेल ह्याचा अंदाज आला. तरी लोकशाही टिकवून ठेवण्यात भारताने यश संपादन केलं आहे हे ते मान्य करतात हे वाचून आनंद वाटला. २०१४ च्या आधीपासून देशात लोकशाही होती हे त्यांना मान्य आहे की नाही कोणास ठाऊक. लष्कराने आपली स्वायत्तता टिकवून ठेवली आहे हे आपलं नशीब. पण न्यायालयांच्या स्वायत्ततेबाबत आजकाल शंका येऊ लागली आहे. पुन्हा असो.

म्युझियम्स हा माझा आवडता विषय. मुंबईमधलं छत्रपती शिवाजी महाराज वास्तूसंग्रहालय (पूर्वाश्रमीचं प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियम) ही माझी अत्यंत आवडती जागा. अरुंधती देवस्थळे ह्यांच्या 'कलासंग्रहालयाचिये दारी' ह्या लेखात मात्र देशविदेशातल्या नानाविध प्रकारच्या म्यूझियम्सबद्दल वाचायला मिळतं - अगदी museum of broken relationships, museum of bad art, Gelato Museum पासून ते पार फ्रॉईड म्यूझियम सर जॉन सोन्स म्युझियम ऑफ आर्किटेक्चरपर्यंत. खासगी संग्रहालयांवरचा अभिजित बेल्हेकर ह्यांचा आणि Anatomy ला वाहून घेतलेल्या एना मोरंडी मंझोलीनी वरचा विजय तापस ह्यांचा लेखही वाचनीय. हे लेख वाचून हे सगळं आपण कधी पाहणार हा प्रश्न अर्थात मनात उगवलाच. 

हिंदी सिनेसृष्टीतला चिरतरुण समजला जाणाऱ्या देव आनंदवर लिहिलेला अरुणा अंतरकर ह्यांचा लेख देवच्या चाहत्यांना नक्की आवडेल. हबीब तन्वीर हे नाव कुठेकुठे वाचलेलं पण मला त्यांच्याबद्दल फार काही माहिती नव्हती. लेखातला त्यांचा फोटो पाहिल्यावर काही आर्ट फिल्म्समध्ये त्यांना पाहिल्याचं आठवलं. पण त्यांच्या नाट्यकलेतल्या प्रवासाबद्दल त्यांच्याच शब्दात 'मोर नाम हबीब तन्वीर' ह्या लेखात वाचायला मिळतं. जुन्या काळातलं किती आणि काय काय निसटून गेलंय हे वाचून खिन्न व्हायला होतं. 

शाळेत असताना जी. ए. ची पुस्तकं वाचली होती. काही गोष्टी कळल्या, बऱ्याचश्या डोक्यावरून गेल्या. पण ह्या नावाचं गारूड कायम राहिलं. रामदास भटकळ ह्यांनी जी. ए. वर लिहिलेल्या लेखावरून आणि त्यात समाविष्ट केलेल्या त्यांना जी. ए.नी लिहिलेल्या पत्रातून त्यांच्या स्वभावाबद्दल थोडी कल्पना येते.

'मुकेश' म्हटलं की सुमधुर गाण्यांची एक मालिकाच मनात उभी राहते. गाणी काय आपण सगळेच ऐकतो. पण ती कशी ऐकावीत हे डॉ. मृदुला दाढे-जोशी ह्यांचा मुकेशवर लिहिलेला लेख वाचून कळतं. मी तर ठरवलं आहे की वेळ मिळेल तेव्हा हा लेख घेऊन बसायचं आणि पारायणं केलेली मुकेशची गाणी पुन्हा एकदा ऐकायची. लेखिकेने सांगितलेल्या जागा आपल्याला सापडताहेत का ते पाहायचं आणि मग गोल्डन एरातली इतर आवडती गाणी त्याच पद्धतीने ऐकून पाहायची. पाहू कधी जमतंय ते. 

प्रवीण बांदेकरांची 'कावळ्याची अंडी आणि गडगडलेलं सरकार' ही कथा कळतेय कळतेय म्हणेस्तोवर हातातून निसटली. तीच गोष्ट प्रणव सुखदेव ह्यांच्या 'नर आणि सागर' ह्या कथेची. त्यामानाने 'राखण' (रश्मी कशेळकर), 'एका राणीची गोष्ट' (डॉ. शुभदा कुलकर्णी)आणि 'दिलशाद खालाची न्हाणी '(वसीमबारी मणेर) ह्या कथा आवडल्या. 'दिलशाद खालाची न्हाणी' मधली मुसलमान पात्रांच्या तोंडची मराठीमिश्रित हिंदी फार वैशिष्ट्यपूर्ण वाटली. 

प्रमोद मुनघाटे ह्यांचा लेख वाचून 'सुशील राधा आणि सद्गुणी कृष्णराव' हे अजब नाव असलेली कादंबरी वाचायची उत्सुकता लागली आहे. कविता विभागातली  'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' ही नीरजा ह्यांची कविता आवडली. 'चिन्हचित्रं' मधली गणितातल्या चिन्हांवर आधारलेली व्यंगचित्रं मस्तच. 

Monday, January 30, 2023

६. महाअनुभव (दिवाळी अंक २०२२) (किंमत २५० रुपये)

महाअनुभवचा अंक मी दर दिवाळीला घेत असले तरी ह्या वर्षी अनुक्रमणिका पाहून अंक वाचायच्या आधीच खुश झाले. निळू  दामले, डॉ. शंतनू अभ्यंकर, प्रीति छत्रे, उमेश झिरपे अशी अनेक परिचयाची नावं दिसली ना.

पहिलाच लेख निळू दामले ह्यांचा 'कुंपणच जेव्हा शेत खातं. लोकशाहीच्या बुरख्याआडची हुकूमशाही'. शीर्षक वाचूनच लेख कश्याबद्दल असणार ह्याची कल्पना आली. इराण, रशिया, अमेरिका, ब्रिटन आणि अर्थात मायभूमी भारत इथल्या सरकार आणि एकुणात शासनव्यवस्थेचा उहापोह करणारा हा लेख रोजची पेपरातली चिखलफेक वाचून व्यथित होणाऱ्या कोणाही सुजाण माणसाला पटावा असाच.

डॉ. शंतनू अभ्यंकर ह्यांचा एक लेख आधीच्या वर्षीच्या कुठल्या तरी दिवाळी अंकात वाचला होता. मूल जन्माला येताना काय गुंतागुंतीची प्रक्रिया घडून यावी लागते त्याचं अतिशय सोपं वर्णन त्यांनी त्या लेखात केलं होतं. नंतर लोकसत्तामध्ये उत्क्रान्तीचा डार्विनचा सिध्दांत मोडून काढून त्याऐवजी सकल सृष्टीचा कोणी कर्ताकरविता आहे असा सिध्दांत मांडणाऱ्या - ज्याला छद्मविज्ञान म्हटलं जातं अश्या एका पुस्तकाचा खडसून समाचार घेणारा त्यांचा लेखही वाचनात आला. पुन्हा ह्या अंकातल्या त्यांच्या लेखाचं शीर्षकसुद्धा 'आपुले मरण पाहिले म्या डोळा'. (ते 'आपुले मरण पाहिले मी म्या डोळा' असं असायला हवं होतं खरं तर!) पण लेख वाचून हादरायला झालं. क्षणभर हे जे लिहिलंय ते अभ्यंकर ह्यांच्यासोबत खरोखर झालंय का कल्पित कथा आहे असंही वाटून गेलं. रोज संध्याकाळी येणारा बारीक ताप आणि थकवा ते फुफ्फुसाच्या कॅंसरचं निदान ह्या प्रवासातल्या आपल्या विविध अवस्थांचं त्यांनी ह्या लेखात वर्णन केलंय. हे नुसतं वाचूनच आपल्याला कसंतरी होतं ते ह्या माणसाने कसं निभावलं असेल ह्याचं आश्चर्य आणि कौतुक वाटतं. पुन्हा ह्यात त्यांनी आपली विनोदबुद्धी शाबूत ठेवली आहे. हा लेख वाचून असं वाटलंच की ते डॉक्टर असल्याने अनेक डॉक्टर मित्रांची त्यांना अचूक निदान होण्यात म्हणा किंवा एक सपोर्ट सिस्टीम उभी करण्यात म्हणा खूप मदत झाली. ज्याचां वैद्यकीय क्षेत्रांत कोणीही ओळखीचं नाही अश्या लोकांना मात्र हा अनुभव दुरापास्तच. पूर्वीच्या काळी फेमिली डॉक्टर हे जसा आधार वाटायचे तशी सोय आता नाही. जवळपास सगळेच डॉक्टर पेशंटसंबंधी सहअनुभूती दाखवत नाहीत. मग कारण काहीही असो. तसा एखादा डॉक्टर मिळालाच तर तुमचं नशीब जोरावर म्हणायचं. 

'सोनपावसाचं ऐतिहासिक गाव' (इथे लेखाच्या शीर्षकात 'ऐतिहासिक' ह्या शब्दात एक मात्रा अधिक छापली गेली आहे) हा प्रणव पाटील ह्यांचा कोल्हापूरजवळच्या कसबा बीड गावाबद्दलचा लेख आवडला. शिलाहार राजांच्या काळातली नाणी इथे सापडतात. त्या काळातल्या वीरगळी आणि अजून बऱ्याच खुणा तिथे आहेत. कधीतरी जायला हवं इथे असं वाटून गेलं. 'भारत विकास ग्रुप' ह्या उद्योगाचे संस्थापक हणमंतराव गायकवाड ह्यांच्यावरचा आनंद अवधानी ह्यांनी लिहिलेला लेख वाचून मस्त वाटलं. एका मराठी माणसाने एकट्याने एव्हढा पसारा उभा केला ह्याचं कौतुक वाटल्यावाचून राहात नाही. आधी हा लेख कदाचित स्पॉन्सर्ड असावा असं वाटून मी वाचायचं टाळणार होते. पण वाचला हे बरं झालं. 

मेघश्री दळवी ह्यांच्या तिन्ही कथा सगळीकडे रोषणाई आणि जमिनीची तोडफोड करून मेट्रो बांधणं एव्हढीच मुंबईच्या विकासाची कल्पना डोक्यात असणाऱ्या सर्व राजकारणी लोकांना वाचायला द्यायला हव्यात. ह्या अश्या कथा वाचून भयानक भीती वाटते. कारण अवकाळी पाऊस, बिघडलेली हवा अश्यासारखे अनेक धोक्याचे इशारे केव्हापासूनच दिसायला लागलेले आहेत. हे भविष्य खूप नजीकचं तर नाही?

लेवीसन वुडवरचा प्रीति छत्रे ह्यांचा लेख वाचून पृथ्वी उभीआडवी पालथी घालणाऱ्या ह्या अवलियाला मनोमन सलाम केला. विशेषतः कुठल्याश्या आदिम जमातीतले लोक केसाला केशरी रंग द्यायला त्यावर एक विशिष्ट राख फासून शॉवरखाली आंघोळ केल्यासारखे डायरेक्ट गोमूत्राची धार अंगावर घेतात म्हटल्यावर ह्या पठ्ठ्याने तेही केलं हे वाचून तर मी उडालेच. गोमातेचा उठता बसता जयजयकार करणारे किती हिंदुत्ववादी लोक हे स्नान करायला तयार होतील हा मजेशीर प्रश्न मनात डोकावून गेला. Walking The Himalayas हे नाव टीव्हीगाईड मध्ये पाहिलं होतं. पण लेवीसन वुडच्या भटकंतीवर तो आहे हे ठाऊक नव्हतं. भारत-पाकिस्तान सीमेवरची त्याची भटकंती पाहायला डिस्कव्हरी प्लस पाहिलं पाहिजे आता.  

'यात्रा अपघातांची' हा एक लोको पायलट असलेल्या गणेश मनोहर कुलकर्णी ह्यांनी लिहिलेला लेख सुन्न करणारा. टेनिस क्रिकेट हा शब्द मी कधी ऐकलाही नव्हता. मग तिथेही अनेक संघ आहेत, त्यांच्या देश-विदेशात मालिका खेळलया जातात आणि खूप लोक ह्या खेळाचे, खेळाडूंचे चाहते आहेत हे ठाऊक असणार तरी कसं. तुषार कलबुर्गी ह्यांचा लेख मात्र ह्यावर सविस्तर माहिती देतो. माहिती अक्षरश: एका क्लिकवर उपलब्ध असायच्या काळातसुद्धा आपल्याला किती गोष्टी माहित नसतात. सुझन मेसेलस ह्या फोटोग्राफरवरचा 'अस्वस्थ काळाची फोटोग्राफर' हा लेख वाचूनसुद्धा असंच वाटलं. 

आयुष्यात प्रत्येकाची एक बकेट लिस्ट असते - करून बघायच्या गोष्टींची. त्यात बहुतेक साऱ्या असाध्य असतात म्हणा. माझ्या बकेट लिस्टमध्येही एव्हरेस्टच्या बेस केम्पपर्यंत जाऊन यायचं अशी एक एंट्री आहे. त्यामुळे भारतातला अव्वल गिर्यारोहक असलेल्या मिंग्मा शेर्पावरचा लेख मोठ्या उत्सुकतेने वाचला. ह्याही बाबाला माझा सलाम आहे. 'कोकणातला कातळखजिना' हा सुहास गुर्जर ह्यांचा लेख वाचून हे सगळं आपण बघायचा मुहूर्त लागायच्या आधी नष्ट तर होणार नाही ना असा एक भुंगा डोक्याला लागला. पुन्हा एकदा 'हजारो ख्वाहिशें ऐसी' वगैरे.... 

अगोचर, द मिस्ट्री रूम, छर्रा  ह्या कथा फारश्या आवडल्या नाहीत. त्यामानाने 'सगळ्याचा मिळून पांढरा किंवा काळा' ही कथा खूप भावली. विशेषतः: त्यातलं 'सगळ्यात पांढराच खरा! सुरुवातबी तो करून देतोय न शेवटाला बी तोच हात देतोय' हे वाक्य अगदी पटलं.

Sunday, January 29, 2023

५. कालनिर्णय (दिवाळी अंक २०२२) (किंमत २५० रुपये)

 निदान मागच्या दोन वर्षी तरी कालनिर्णयचा अंक वाचल्याचं स्मरणात नाही. ह्या वर्षीही हा अंक असल्याचं मला माहित नव्हतं. मग लोकसत्तामध्ये त्याबद्दल वाचलं. आणि घरी पेपर टाकणाऱ्या व्यक्तीला आणून द्यायला सांगितलं. 

अंकाच्या सुरुवातीलाच इंदिरा संतांची 'अक्कू बक्कूची दिवाळी' ही कविता वाचली. शाळेत असताना कधी ही कविता वाचनात आली नव्हती. पण मुद्दामहून कुठलीही कविता शोधून वाचावी असं मला फारसं कधी वाटत नाहीच. असो. तर शाळेत असताना ही कविता वाचून काय वाटलं असतं ते आता सांगता नाही येणार. पण आता ह्या वयात तरी ती फारशी भावली नाही. भाचरांची दिवाळी आनंदात जावी अश्या भावनेतून जरी मामाने सगळ्या वस्तू आणल्या असल्या तरी त्यातून बहिणीची गरिबी अधिक अधोरेखित होते. तसंच मामा भाचरांना आजोळी घेऊन जायला आलेला असतो तर एव्हढं सामान का घेऊन येतो ते कळलं नाही. वर तुम्ही येणार नाही म्हणून मामीने दिलं आहे असाही उल्लेख आहे. ते मामीला आधीच कसं कळलं हेही समजलं नाही. कदाचित बालवयात हे प्रश्न पडले नसते.

पुढली अनुक्रमणिका वाचून मात्र पुढे मेजवानीच वाढून ठेवली आहे ह्याची खात्री पटली :-)

मराठ्यांचं आरमार २०२२ च्या दिवाळीतला लाडका विषय दिसतो. किल्ला किंवा दुर्ग ह्यापैकी एका अंकातही ह्यावरचा लेख ह्याच दिवाळीत वाचल्याचं आठवलं. अर्थात आरमारातलया जहाजांवर छान माहिती ह्या लेखातून मिळाली. ' गोव्याच्या मातीचा सन्मान' हा कोकणी साहित्यातलया दामोदर मावजो ह्या लेखकांवर लिहिलेला लेख उत्सुकतेने वाचला. आम्ही जीएसबी म्हटल्यावर बरेच लोक कोकणी समजतात. त्यामुळे कित्येक दिवसात मलाही वाटायचं की आपल्याला कोकणी कसं येत नाही. पण आमच्या कुठल्याही पिढीत कधीच कोकणी बोलली गेली नाही. तरी त्या भाषेबद्दल एक कुतूहल नेहमीच राहिलं. त्यातून भाषा हा  माझा नेहमीच आवडीचा विषय राहिलेला आहे. कोकणी शिकून मूळ साहित्य वाचायची संधी मिळेल असं वाटत नाही. पण कधी कुठे काही अनुवादित मिळालं तर नक्की वाचेन. 

न्यू यॉर्कर बद्दल आणि त्याच्या विल्यम शॉन ह्या संपादकांबद्दल वाचून आपल्याला किती आणि काय वाचायचं आहे हे जाणवून छाती दडपून गेली. हे असलं रोखठोक, कोणाचीही भीड ना बाळगता लिहिणारे लेखक, ते छापणारे संपादक आणि वाचणारे वाचक आपल्या देशात कधी दिसतील असा विचार नको नको म्हणताना डोकावून गेलाच. 

हंसा वाडकर आणि त्यांच्या चरित्राबद्दल वाचलंय. पण हे एव्हढं अंगावर येणारं काही आपल्याला झेपेल असं वाटत नसल्याने ते चरित्र कधी वाचलं नाही आणि त्यावर  बेतलेला 'भूमिका' कधी पाहिला नाही. श्रीकांत बोजेवार ह्यांचा लेख मात्र आवडला. हंसाबाई दिसायला सुरेखच होत्या हे फोटोवरून कळून येतं. एकदम मिळालेली प्रसिद्धी, हातात आलेला पैसा, मार्गदर्शन करायला कोणा वडीलधाऱ्या व्यक्तीचं नसणं ह्या परिस्थितीत आयुष्य उध्वस्त झाल्याच्या घटना चित्रपटसृष्टीत नव्या नाहीत. पण तरी दरवेळी त्या वाचून जीव कळवळतोच. 

कविता आणि माझं जसं कधी जमलं नाही तसंच शास्त्रीय संगीत आणि माझं कधी जमेल असं वाटत नाही. अर्थात मी शास्त्रीय संगीत मुळापासून जाणून घ्यायचा प्रयत्न कधी केला नाही ही माझी चूक आहे. पण सध्या तरी तेव्हढा वेळ आणि सवड नाही हे खरं . मास्तर कृष्णराव हे नाव ऐकलेलं असलं तरी त्यांच्याविषयी फार माहिती मला असण्याचं त्यामुळे काही कारण नाही. लीना पाटणकर ह्यांच्या लेखाने ती ओळख यथास्थित करून दिली. गरीब घरात जन्मूनही पुढे आयुष्याचं सोनं करणाऱ्या अश्या व्यक्तींबद्दल वाचलं की हे सगळं योगायोगाने घडतं का पूर्वनियोजित असतं हा नेहमीच प्रश्न पडतोच. 'कीचकवध' चित्रपटातलं 'धुंद मधुमती रात रे' हे माझं ऑल टाईम फेव्हरेट गाणं ह्याच मास्टर कृष्णरावांनी संगीतबद्ध केलं आहे हे वाचून तर मी उडालेच. ह्या गाण्याचा संगीतकार कोण हा विचारच मी कधी  केला नव्हता.

हंसा वाडकर ह्यांच्याबद्दल जसं ऐकलंय, कुठेकुठे थोडंफार वाचलंय तसंच देविकाराणी ह्यांच्याबद्दलही त्रोटक माहिती मला होती. पूर्वीच्या काळी सौंदर्यवती वगैरे गणल्या जाणाऱ्या अभिनेत्री मला बऱ्याच वेळा अजिबात सुंदर वाटलेल्या नाहीत. उदा. लीला नायडू किंवा सुरेय्या. पण हंसा वाडकर आणि देविकाराणी दोघींचे फोटो पाहून त्या आजकालच्या काही नट्यापेक्षाही अधिक सुंदर असतील असं वाटून गेलं. निदान देविकाराणी ह्यांचं उत्तर आयुष्य तरी सुखात गेलं हे वाटून बरं वाटलं. हा लेख थोडा त्रोटक वाटलं. अजून वाचायला आवडलं असतं. 

ह्या दोघींच्या मानाने अभिनेत्री नंदा माझ्या अधिक परिचयाची. तिचे गुमनाम, कानून, द ट्रेन, इत्तेफाक, धूल का फूल हे चित्रपट पाहिले आहेत. आईच्या लहानपणची तिची एक मैत्रीण नंदाची चुलतबहीण होती तेव्हा आई तिच्या घरी एकदा नंदाला भेटली होती हे तिच्याकडून ऐकलंय. त्यामुळे तिच्यावर लिहिलेला प्रकाश चांदे ह्यांचा 'चिरतरुण बेबी' हा लेख उत्सुकतेने वाचला. नंदाने मराठी चित्रपटात काम केलं आहे ह्याची मला अजिबात माहिती नव्हती. मला तर ती थेट हिंदी चित्रपटात आली असंच वाटायचं. 

'चित्रकला' हा मला न जमणारा आणखी एक प्रकार. विशेषतः ती abstract paintings तर अजिबात समजत नाहीत. त्यामुळे 'सुझा' हे नाव कुठेकुठे वाचलेलं असलं तरी एक चित्रकार ह्यापलीकडे मला त्यांच्याविषयी फार माहिती नव्हती. त्यांच्यावर राजेंद्र पाटील ह्यंनी लिहिलेल्या लेखातून ती ओळख झाली. पण हा लेखही फारसा कळला नाही. आणि त्यांची लेखात दिलेली चित्रं पाहून हा आपला प्रांत नव्हे ही खात्री झाली :-)

स्टॅम्प्स, नाणी वगैरे जमवायचा छंद वाचून ठाऊक आहे. मी स्वतः सुद्धा विविध चित्रं असलेली नाणी जमवते. भारतात अशी नाणी मिळायची संधी कमीच आहे. एकुणात फक्त चलन म्हणून नाणी वापरायची हा आपल्या इथला खाक्या. जाने दो. तर सांगायचं मुद्दा हा की फक्त शिपच्या काडेपेट्या पाहून सवय असलेल्या मला काडेपेट्यांवरही वेगवेगळी चित्रं असतात हे वाचून धक्काच बसला. नाही म्हणायला लॉकडाऊनच्या काळात शिपची काडेपेटी मिळाली नव्हती तेव्हा दुसरी कुठलीतरी आणली होती (ती पेटेल की नाही ही शंका मनात घेऊन!). रविप्रकाश कुलकर्णी ह्यांचा 'काडेपेटीवरच्या चित्रांची वेगळी कहाणी' हा लेख खूप मनोरंजक माहिती देतो. सुलोचना उर्फ रुबी मायर्स (ह्यांच्याबद्दलही फक्त ऐकून-वाचूनच आहे) ह्यांची छबीही काडेपेटीवर असायची. त्याचा लेखकाने सांगितलेला किस्सा वाचण्याजोगाच. 

'रंगातून जग पाहणारा चित्रकार' हे प्रशांत कुलकर्णी ह्यांच्या लेखाचं शीर्षक वाचून म्हटलं हाही लेख डोक्यावरून जाणार. पण ख्रिस्तोफ निमनच्या (ह्याचं नाव मात्र मी आजवर ऐकलेलं नव्हतं!) चित्रकलेतलं ओ की ठो कळत नसणाऱ्या लोकांनाही सहजगत्या समजू शकणाऱ्या अफलातून चित्रांची त्यांनी सुरेख ओळख करून दिली आहे. आजवर आपण ह्याचं नाव कसं ऐकलं नाही ह्याचंच आश्चर्य मला लेख वाचून संपला तरी वाटत राहिलं. 

'केनेडींच्या हत्येमागील विलक्षण ताणेबाणे' हा दीपक करंजीकर ह्यांचा लेख अमेरिकी इतिहासातल्या एका महत्त्वाच्या घटनेवर आहे. पण तो विषयाला न्याय देत नाही. ह्या घटनेबाबत ज्या conspiracy theories आहेत त्यांचा व्यवस्थित उहापोह अपेक्षित होता. पण लेखकाने काही थिअरीजना उदा. अमेरिकी परराष्ट्र धोरण खूप जास्त महत्त्व दिलं आहे. बाकी थिअरीज थोडक्यात आटपल्या आहेत. असं करण्यामागचं कारण स्पष्ट होत नाही. त्यामुळे लेखही खूप विस्कळीत वाटतो. 

जंगल आणि पर्वत ह्यांच्यावर खास प्रेम असलेल्या मला सुरेशचंद्र वारघडे ह्यांचा 'अरण्यजीवन' हा लेखही खूप आवडला. लेखातले फोटोही सुरेख आहेत. हिंदी साहित्यातल्या कुमार अंबुज ह्यांच्या 'मंदिर-चौक' ह्या कथेचा मधुकर धर्मापुरीकर ह्यांची केलेला अनुवाद आवडला. निदान हिंदी साहित्य तरी वाचायला सुरुवात करायला हवी हे पुन्हा एकदा जाणवलं. त्यामानाने 'पेस्ट्री दुकानातली चोरी'  ही अनुवादित कथा फारशी आवडली नाही. 

वसंत देशमुख ह्यांचा गुप्तचर खात्यातल्या अनुभवांवरचा लेख, डॉ. स. गं मालशे आणि कच्छच्या लोककला संगीतात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या धनबाई कारा ह्यांची ओळख करून देणारे लेख वाचनीय. 

कवितांचा विभाग 'पाहू काही समजतात का?' हा पूर्वग्रह मनात घेऊन वाचला. त्यातल्या काही कळल्या. काही कळल्या नाहीत. पण विशेष आवडलेल्या कविता म्हणजे एक कौटुंबिक कविता (अलका गांधी असेरकर) आणि घुसमट (मंदाकिनी पाटील). 

'पाकनिर्णय' मधल्या वाळवणाचे पदार्थ, सूप्स आणि आईसक्रीम ह्या विभागातले पदार्थ वेगळे वाटले. 

एकंदरीत ह्या वर्षीपासून कालनिर्णयचा दिवाळी अंकसुद्धा विकत घेणार हे नक्की. 

Saturday, January 21, 2023

 I spent the last week of 2022 out of the city. It felt good to see the concrete landscape gradually give way to greenery nearby and the mountains from the Sahyadri ranges in the distance. In the mornings I stepped out to take long walks past the sleepy little villages.

It is difficult to put into words what you feel when you see an empty road, intermittently hemmed in by fields or grassy expanse, stretching out far in the distance. You can hear birds chirping about in the trees. Occasionally, you pass cattle munching on the leaves contentedly. For a city person like me, it is a wonder to hear the sound that a solitary leave makes while falling on the road. Or the rustling of the wind in the trees. I never knew that the leaves can be of such different shapes. It is a delight to see the patterns that the sun's rays make as they filter through the treetops. Or to suddenly come across a burst of tiny blue flowers in full bloom by the roadside.

You can see giant spiders waiting patiently in the middle of the web spun across tree branches. If you are lucky, you can spot a snake slither away in a thicket. I have seen this only once and was so thrilled that I could not stop talking about it the whole day.

This road is my favorite hangout. Every time I go for a walk I discover something new. I never tire of it. And when I return to the city, I see it in my dreams as I fall asleep in the night.

Wednesday, January 11, 2023

A friend forwarded me a puzzle yesterday - a list of 25 or so English translations of the names of Marathi plays. And immediately I thought of Alka - a dear friend who I lost about a year ago. She kept me sane through the pandemic by sending such puzzles daily. I am sure she had sent me this one as well.

Even when I came to know that she has cancer, I assumed that she will get cured. That's why I did not go and see her. I told her that I have never been to the Asiatic Library, and she said that she hadn't been there either. We planned to go there and spend a whole day surrounded by books, to be followed by coffee or lunch. I am not sure I want to go to the Asiatic anymore.

We argued a lot - given the fact that our opinions on the current political scene in India differed widely. They were polar opposites of each other, to be honest. But the friendship remained - till she was gone. Now, the arguments seem so silly and hollow.

It felt nice to think of Alka again. It is just that I never expected death to snatch a friend away so soon in my life :-(

Monday, January 9, 2023

४. किल्ला (दिवाळी अंक २०२२) (किंमत ४५० रुपये)

 खरं तर वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात सुट्टीवर जाताना दुर्गांच्या देशातून आणि किल्ला हे दोन्ही अंक सोबत नेले होते. दोन्ही एकदमच वाचायला सुरुवात केली. पण एकही अंक वाचून पूर्ण झाला नाही :-) मुंबईला परत आल्यावर 'दुर्गांच्या देशातून' आधी वाचून पूर्ण झाला. विकांताला किल्ला वाचून झाला.

ह्या अंकाचं मुखपृष्ठ नेहमीच देखणं असतं. २०२२ चा अंकही अपवाद नाही. मुखपृष्ठावरील हे प्रकाशचित्र किल्ले रामशेजच्या महादरवाज्याचं आहे. चित्रावर नजर अगदी खिळून राहिली. ती मुश्किलीने सोडवून घेऊन अंक उघडला. अनुक्रमणिका पाहताच पहिला लेख मंदिरावर आणि शेवटला नाण्यांवर म्हणजे सोनेपे सुहागा. 'संपादकीय' वाचून कळलं की महाराष्ट्रातल्या ज्या १४ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून तत्त्वत: मान्यता दिली आहे त्या सर्वावर ह्या वर्षी लेख असणार होते. पण सहाच लेख मिळाल्याने ते ह्या अंकात समाविष्ट आहेत. उरलेले आठ पुढल्या वर्षी कव्हर होतील. 

हे सहा किल्ले म्हणजे शिवनेरी, राजगड, रांगणा, सिंधुदुर्ग, किल्ले कुलाबा आणि किल्ले लोहगड. ह्यातला प्रत्येक लेख मन लावून वाचावा, आणि मुख्य म्हणजे ह्या किल्ल्यांना भेट देताना न विसरता सोबत ठेवावा असाच आहे. बाय द वे, किल्ल्याच्या उल्लेख 'किल्ले' असा अनेकवचनी का करतात ह्या कोड्याचं उत्तर अजून मिळालेलं नाहीये :-) 

सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरावर डॉ. गो. बं. देगलुरकर ह्यांनी लिहिलं आहे. देगलुरकरांचं लिखाण मी फारसं वाचलेलं नसलं तरी त्यांचं नाव परिचित आहे. ह्या लेखाने थोडी निराशा केली. कारण लेखात माहिती तर भरपूर आहे. पण ती ज्यांना ह्यातलं आधीच बरंच माहीत आहे त्यांना तिचा उपयोग. उदा. मंदिराला ३ प्रक्षेप आहेत किंवा द्वारमार्ग पंचशाखा प्रकारचा आहे हे वाचून माझ्यासारख्या वाचकाला काय अर्थबोध होणार? त्यापेक्षा मंदिरबांधणीतल्या ह्या संज्ञांची मुळातून ओळख करून देणारी लेखमाला असेल तर तिचा बऱ्याच जणांना उपयोग होईल असं वाटतं. असो. 

जॉर्डन नदीच्या खोऱ्यात वसलेल्या जेरिकोबद्दल एड. सीमंतिनी नुलकर ह्यांनी लिहिलेला लेख ज्या प्रदेशात पहिल्या मानवनिर्मित भिंती उभारल्या गेल्या त्या प्रदेशाची छान माहिती देतो. आता इथेही जावं लागणार :-)

भुवनेश्वरच्या उदयगिरी लेण्यांवर अशोक गोपाळ परब ह्यांनी सविस्तर लिहिलंय. लेखासोबतचे फोटोज पाहून लेणी पाहायची प्रबळ इच्छा होते. 

दुर्गांच्या देशातूनमध्ये विश्वास पाटील ह्यांनी छोटासा लेख लिहिला होता. ह्याच विषयावर संदीप तापकीर ह्यांनी थोडं विस्ताराने लिहिलं आहे. 

अंकातला शेवटचा लेख तंजावरच्या मराठी नाण्यांवर आहे. नाण्यांचे ३०-३१ फोटोज पाहूनच मस्त वाटतं. सोबत दिलेली माहिती वाचून नाणी नीट पाहायचा प्रयत्न केला. पण फोटो म्हणावे तितके स्पष्ट नसतील म्हणा किंवा नाण्यांच्या झिजेमुळे ते स्पष्ट आले नसतील म्हणा - काही नाण्यांवरची अक्षरं नीट लागली नाहीत. माहिती मात्र खूप इंटरेस्टिंग आहे. विशेषतः तंजावरच्या 'सरस्वती महाल' ह्या ग्रंथालयात अनेक कागदपत्रं आणि रेकॉर्ड्स मोडी लिपीत आहेत पण मोडी लिपी वाचू शकणारे मिळत नसल्याने त्यांचं वाचन पूर्ण झालेलं नाही हे वाचून रिटायर्ड झाल्यावर मोडीचा काही वर्षांपूर्वी केलेला अभ्यास पूर्ण करून इथे काही मदत करता येईल का असा विचार मनात येऊन गेलाच.

कधीकाळी कुठल्या किल्ल्यावर गेल्यावर एखादं तरी नाणं आपल्याला सापडावं अशी एक सुप्त इच्छा आहे :-) पूर्वीच्या काळी किल्ला सर केल्यावर अशी नाणी उधळायची पद्धत होती आणि अशी नाणी अजूनही झाडाझुडपांत अडकलेली सापडतात असं कुठेतरी वाचनात आल्यापासून तर ही इच्छा अधिकच बळावली आहे. 

असेल नशीब जोरावर तर मिळेलही एखादं. कोणी सांगावं. उम्मीदपे दुनिया कायम है :-)

३. दुर्गांच्या देशातून (दिवाळी अंक २०२२) (किंमत ३०० रुपये)

दरवर्षीप्रमाणेच मागल्या वर्षीही हा अंक घेतला. अंकाच्या सुरुवातीलाच 'संपादकीय' मध्ये 'किमान ह्या वर्षीचा तरी अंक काढू या असं ठरवून हा अंक मार्गी लावला आहे' हे वाक्य वाचून वाईट वाटलं. दरवर्षी नवेच लेखक असायला हवेत हा अट्टाहास का आहे ते कळलं नाही. लेख दर्जेदार असले म्हणजे झालं. असो. ह्या वर्षी दिवाळीला हा अंक वाचायला मिळेल ही आशा आहे.

पहिलाच लेख 'अष्टदशकातला भीमपराक्रम'. ८० व्या वर्षी ८ महिन्यात ८० किल्ले करणं कौतुकास्पद आहे हे खरंच . पण म्हणून त्याला स्वतः:च 'भीमपराक्रम' म्हणणं थोडं विचित्र वाटलं. तरी लेख वाचायला सुरुवात केल्यावर अरविंद दीक्षित ह्यांचा 'मी इतिहास संशोधक नाही किंवा किल्ल्यातलं मला फारसं काही कळत नाही. किल्ल्यांना भेट द्यायचा थरार अनुभवायचा होता' हा प्रांजळपणा आवडला. किल्ल्यापर्यंतचा प्रवास हा थोडातरी खडतर हवा ह्या त्यांच्या मताशी तर मी अगदी सहमत. ८१ होण्यापूर्वीच (तेव्हढं जगेन की नाही काय माहित!) ८१ किल्ले पाहून होतील का हा विचार डोक्यात आलाच. मला मात्र किल्ला माहिती घेत पाहायला आवडेल. खूप फोटो काढून ती माहिती टिपून ठेवायला आवडेल. असो. 

ह्यापुढल्या लेखावरचं 'विश्वास पाटील' हे नाव वाचून अगदी सरसावून बसले. पण लेख सुरु व्हायच्या आधीच संपल्यासारखा वाटला. शिवाजीमहाराजांच्या बसरूरच्या आरमारी मोहिमेवर अधिक वाचायला आवडलं असतं. 

'शिवछत्रपतींचे शिलेदार आणि गडकोट' ह्या लेखात पन्हाळगड, विशाळगड, पुरंदर ह्या परिचयाच्या गडांसोबत साल्हेर आणि कुर्डूगड ह्या तुलनेने मला कमी माहिती असलेल्या किल्याबद्दल माहिती मिळाली. तशीच भरपूर माहिती कंधार ह्या नांदेडजवळील किल्ल्याबाबत डॉ. सुनील पुरी ह्यांच्या लेखातून मिळते. गोवा म्हणजे देवस्थानं - मग ती मंदिरं असोत वा चर्चेस - आणि बीचेस ह्या समीकरणाला छेद देणारा डॉ. विनय मडगांवकर ह्यांचा छोटेखानी लेख कोलवाळच्या किल्ल्याबद्दल आहे. असेच छोटे लेख फलटणजवळच्या वारुगड आणि संतोषगडवर (डॉ. दत्तात्रय देशपांडे), वसंतगडवर  (विक्रमसिंग मोहिते) ह्यांचे आहेत. 

गड-किल्ल्याबद्दल नसलेला पण गिर्यारोहण ह्या तेव्हढयाच रोमहर्षक विषयाला स्पर्श करणारा विवेक वैद्य ह्यांचा मलेशियातलया किनाबालु वरचा लेख फार आवडला. 

ट्रेकिंग, गिर्यारोहण म्हटलं की अपघातांची शक्यता आलीच. अपघात घडण्याच्या ३ प्रमुख कारणांबद्दल आणि ते टाळण्याच्या उपायांवर वसंत वसंत लिमये ह्यांनी खूप महत्त्वपूर्ण लेख लिहिला आहे. 

'गढी' हा शब्द मी ऐकलेला असला तरी त्याचा नक्की अर्थ काय ते मला अजूनही माहित नाही. तरी ह्यावरचा प्रवीण हरपळे ह्यांचा लेख वाचून थोडीफार कल्पना येते. महाराष्ट्रात किती आणि काय काय पाहण्यासारखं आहे ते जाणवून अगदी दडपून जायला होतं. पुन्हा एकदा हजारो ख्वाहिशें ऐसी ची आठवण झाली. मला हे सगळं पाहायचा मुहूर्त लागेस्तोवर ह्यातलं काय काय टिकून राहतं ही चिंता मात्र लागली. 

'गडकिल्ल्यांचा चित्रकार' ह्या लेखात हरेश पैठणकर ह्यांनी किल्ल्यांची चित्रं काढायच्या आपल्या अनुभवावर लिहिलं आहे. चित्रकला आणि माझा ३६ चा आकडा असल्याने बरंच काही डोक्यावरून गेलं. पण ही चित्रं पाहायला नक्की आवडेल.

दुर्गांशी निगडित पण ट्रेकिंग किंवा गिर्यारोहण वगैरेंशी संबंध नसलेला एक लेख ह्या मांदियाळीत आहे - डॉ. लता मुळे-पाडेकर ह्यांचा. श्री ज्ञानेश्वरी मधल्या किल्ल्यांच्या उल्लेखाबाबत सांगणारा. 'एक तरी ओवी अनुभवावी' म्हणून दिलेल्या ओळींचा अर्थ वाचायच्या आधी मी आपल्या परीने तो लावायचा प्रयत्न केला खरा. पण ते काही जमलं नाही :-) 

असाच आणखी दोन वेगळे लेख आहेत. पहिली, ओंकार ओक ह्यांचा 'गणेशपुराण'. नावावरून मला वाटलं की किल्ल्यात आढळणार्या गणेशाच्या प्रतिमा, मूर्ती ह्यावर असेल. मी काही ट्रेकिंग करत नाही. त्यामुळे गणेश गीध हे नाव मला माहित असायचं काही कारण नाही. पण ह्या रॉक क्लाइम्बर आणि रेस्क्यू टीमचा सदस्य असलेल्या अवलियाच्या जगावेगळ्या गोष्टीत आवर्जून वाचावं असं बरंच काही आहे. दुसरा लेख उणंपुरं १३ वर्षं वयोमान असलेल्या पण दहाव्या वर्षीच १०० हुन अधिक किल्ले पाहिलेल्या साई कवाडे ह्या सह्याद्रीपुत्राने लिहिलेला.

रायगडाचे स्थापत्यविशारद हिरोजी इंदलकर ह्यांच्यावर त्यांचे वंशज असलेल्या अशोक इंदलकर ह्यांनी लिहिलेला लेख आवर्जून वाचण्यासारखा. राजधानीचा गड उभारायला ज्याने आपला राहता वाडा आणि शेती विकायला मागेपुढे पाहिलं नाही त्याने बक्षीस मागायची वेळ आली तेव्हा फक्त जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीच्या एका दगडावर आपलं नाव कोरायची परवानगी मागितली. कसल्या मातीचे बनले होते हे लोक? नाहीतर इथे आमदार निधीतून (स्वतः:च्या खिशातुन नव्हे!) हजार वेळा दुरुस्त केलेल्या फुटपाथच्या फरश्या (पुन्हा फुटण्यासाठी) बदलतात आणि मोठ्ठाले बेनर्स लावून त्याची जाहिरात करतात. कालाय तस्मै नम:! दुसरं काय?

किल्ले म्हटलं की बालेकिल्ल्याचा उल्लेख अपरिहार्य. पण हा बालेकिल्ला नक्की असतो तरी काय आणि तो किल्ल्याच्या कारकिर्दीत किती मोलाची कामगिरी बजावतो हे 'बालेकिल्ला म्हणजे किल्ल्याचं हृदय' ह्या कृष्णा घाडगेंच्या लेखातून समजतं.

अंकातले शेवटचे ५-६ लेख दुर्गसंवर्धनासाठी निरनिराळ्या संस्था करत असलेल्या कामाची माहिती देतात. पण खरं सांगायचं तर हे वाचून हे सगळं करावं लागतंय ह्यात एक समाज म्हणून आपलं किती अपयश आहे हे जाणवून खिन्न व्हायला होतं. सरकार महत्त्वाच्या कामांकडे लक्ष देत नसेल तर ते तिथे वेधून घेऊन ती कामं पूर्ण करून घेणं हे एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. पण आपण नुसती जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न. Quality, not Quantity हे आपल्या गावीही नाही. असो. हेही नसे थोडके.

दर वर्षीप्रमाणे ह्या वर्षीही अंक जपून ठेवला आहे. पुढल्या वर्षी आणि त्यापुढली अनेक वर्षं अंक असाच मिळत राहो ही आशा.

Wednesday, January 4, 2023

२. भयकथा (विशेषांक दिवाळी २०२२) (किंमत ३०० रुपये)

२०२१ मध्ये हा अंक आणला होता तेव्हा फारसा आवडला नाही. पण भयकथा (वाचून कितीही टरकली तरी!) हा आवडीचा विषय असल्याने 'ह्या वर्षी घेऊन बघू या' असं म्हणत २०२२च्या दिवाळीत आणला.

पहिलीच कथा नारायण धारपांची. त्यांच्या भयकथा मी फारश्या वाचलेल्या नाहीत. म्हणून उत्सुकतेने वाचली खरी. पण बहुतेक ही acquired taste असावी. कारण मला ती भयकथा कमी आणि विनोदी कथा जास्त वाटली. तरी त्यांच्या बाकी भयकथा कितीही वाचाव्या असं वाटत असलं तरी ते धाडस अजून होईल असं वाटत नाही. श्रीकांत सिनकर ह्यांची 'जेव्हा नराधम ओशाळतो' सुन्न करून गेली. 'ग्रहण' ही जी.ए.ची कथा शाळेत असताना मराठीच्या पुस्तकात होती त्यामुळे स्किप केली. 'अनघा' सत्यकथा असेल तर 'बाप रे!' म्हणण्यावाचून गत्यंतर नाही. 

'सर्पकुल', 'फक्त २४ तास', 'मृत्युंजयी', 'स्वप्नेरी जग' (स्वप्नेरी हा शब्द मराठीत आहे?), 'सोबत', 'तो बघतोय', 'बीपीओ', 'धन्यवाद' ह्या कथा आवडल्या. 'कैद्यांमधला माणूस' हा लेख वेगळा असला तरी भयकथा विशेषांकात तो समाविष्ट करण्याचं प्रयोजन कळलं नाही. 'शैशवपद' आवडली पण लहान बाळाचा खून, आत्मा वगैरे वाचून कसंतरी झालं. 

'नेणीव', 'संधीकाळ', '८४ लिमिटेड', 'पाठलाग', 'मागे वळून पहाताना', 'थरार', 'प्लेसमेंट', ' किस्मत गेस्ट हाऊस', 'मृत्युगोल', 'पाखरू' ह्या कथा predictable वाटल्या. 

'रात्रपाळी', 'माणिक', 'सुनसान रस्ता', 'भय स्वप्नीचे गेले नाही'  ह्या कथा एक तर पटलया नाहीत किंवा आवडल्या नाहीत. 'सापळा' ही कथा खूप मोठी आहे पण आयटी क्षेत्रात असल्याने क्रिप्टो करन्सी बद्दल थोडीफार माहिती असूनही मला ती बरीच far-fetched वाटली. 'दैव देतं कर्म नेतं' ही पटली नाही. Contact list मध्ये असलेला नंबर डायल केला जातोय हे हिमानीला कसं कळलं नाही? तसंच व्हिजिटिंग कार्ड वरच्या नंबरवरून एक-दीड वर्ष तिने विजय पाटीलशी संपर्क करायचा प्रयत्नही केला नाही हे अतर्क्य वाटतं. 'अखेरची भेट' ही कथा आधी मायबोली ह्या साईटवर वाचल्यासारखी वाटली. 'साक्षीदार' ही कथाही थोडी आटोपशीर करायला हवी होती असं वाटून गेलं. 

एकुणात काय तर मला वाटतं ह्या वर्षी मी हा अंक विकत घेणार नाही. मागच्या वर्षीही हेच ठरवलं होतं का? :-)