Sunday, October 29, 2017

इन-मीन-तीन व्होटसएप ग्रुपची मेम्बर असूनही मला आता त्यातल्या किमान दोनमधून बाहेर पडावंसं वाटू लागलंय. कारण दुसरं काहीही नसून फक्त काही मेंबर्स फॉरवर्ड करत असलेल्या फालतू पोस्टस हे आहे.

आता दिवाळीच्या दिवसांचंच उदाहरण घ्या. ग्रुपमधल्या १-२ जणांनीच 'शुभ दीपावली' चे मेसेजेस पाठवले म्हणून मी खुश होते. तर एके दिवशी रात्री एका बाईंचा मेसेज ग्रूपवर आला. काय तर म्हणे   कोण एक माणूस ह्यांना सतत अर्धा तास मिस्ड कॉल्स देत होता. आता हा अनुभव किती जणींना आला असेल. ० ते ९ ह्या अंकांचं कुठलंही १० नंबरी कॉम्बिनेशन केलं की एक मोबाईल नंबर मिळतो. तो डायल करायचा आणि बाईचा आवाज आला कि वाह्यातपणा सुरु करायचा ह्या उद्योगाला कितीसं डोकं लागतं? एकदा असा कॉल आला की तो नंबर ब्लॉक करायचा आणि पुढले कॉल्स घ्यायचे नाहीत. किती वेळा तो माणूस कॉल करेल? मागे मी एकदा अश्या एका महाभागाला फोनवर पाचेक मिनिटं झी मराठीवरच्या अत्यंत पकाउ (त्यांच्या सगळ्याच सिरियल्स तश्या असतात म्हणा!) सिरीयलचे संवाद ऐकवले होते. त्याने परत फोन केला नाही कधी. असो.

तर ह्या बाईनी आपण कसा नंबर ब्लॉक करूनही तो माणूस कसा थांबला नाही, मग आपण कसा कुठल्यातरी महिला संरक्षण का कुठल्यश्या सेलला कॉल केला तेव्हा त्यांनी काही मदत करू शकत नसल्याचं सांगितलं, मग पोलिसांना फोन केला तेव्हा त्यांनी त्याला कसा दम दिला आणि कॉल्स बंद झाले हे सगळं साग्रसंगीत लिहिलं. मध्येच ग्रुपवरच्या एका महाभागाने त्यांना तुमचा नंबर त्याला कुठून मिळाला हा एक अत्यंत बिनडोक प्रश्न विचारला. बाईना अर्थात त्याबद्दल काही माहिती नव्हती. मग ग्रुपवर कोणाला असा अनुभव आला तर काय करावं ह्याची माहिती मिळावी म्हणून आपण हा मेसेज टाकल्याचं बाईनी आवर्जून सांगितलं.

हे एव्हढ्यावरच थांबतं तरी ठीक होतं. पण बाईनी एक अत्यंत चीड आणणारं विधान केलं. ‘फोन करणारा रांचीचा होता म्हणे. बिहारीला काय कळणार शिवाजीमहाराजांची महती'. आं? सगळे बिहारी असे असतात का? हे एक आणि दुसरं असं कि ह्यात शिवाजीमहाराज मध्येच कुठून आले ते काही मला समजलं नाही. ‘अरे वा! शिवाजीमहाराजांनी फोन करून त्याला दम दिला का?’ असं विचारायला माझी बोटं शिवशिवत होती. बरं महाराजांचे पोवाडे गाणार्या ह्या बाईनी त्या माणसाला स्वत: धडा शिकवला असंही नाही.  पोलीस मराठी होते म्हणून ही मुक्ताफळं! पण ग्रूपवरच्या काही लोकांची सवय माहित असल्याने दिवाळीच्या दिवसात कशाला अश्या लोकांच्या तोंडाला लागा असा सुज्ञ विचार मी केला.  म्हणतात ना 'Choose Your Battles’.

आजकाल अश्या लढाया लढायचा कंटाळा आलाय. काय वाटेल ते करू देत लोकांना, आपण कशाला भानगडीत पडा. करण्यासारख्या कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत. जिथे जिंकण्याची सुतराम शक्यता नाही तिथे तलवार म्यानातच राहिलेली बरी, नाही का?

No comments: