Friday, August 10, 2012

कापूसकोंड्याची गोष्ट

मला वाटतं झी मराठीवरच्या "एका लग्नाची दुसरी गोष्ट" ह्या सिरीयलला हे नाव अधिक शोभून दिसलं असतं. घना आणि राधाच्या contract marriage पासून सुरु झालेली ही गोष्ट मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढतच चालली आहे. खरं तर एव्हाना विनोदी बाज सोडून हा विषय गंभीरपणे हाताळायला सुरुवात करायला हवी होती. पण अजूनही जरा गंभीर संवाद सुरु झाले की कुहू, प्रभात, वल्लभकाका, वल्लीकाकू, दिग्याकाका आणि सुप्रीयाकाकू ह्याच्यापैकी कोणीतरी एक येऊन काहीतरी विनोदी (!) बोलतं. वल्लीकाकूचं 'मला ना खूप टेन्शन आलंय' आणि घनाच्या आईचं 'अहो, काय झालंय?' ऐकून मला वैताग आला. त्यांना हे संवाद म्हणताना कसा येत नाही हे त्या दोघीच जाणोत. कालच्या एपिसोडमध्ये तर कुहुच्या गायनाचा कार्यक्रम झाला. अरे, कथानक काय, तुम्ही दाखवताय काय?

राधाच्या व्यक्तिरेखेची तर मला आजकाल फार चीड येतेय. मुळात तिचं हे contract marriage करणं मला पटलं नव्हतं. स्वत:च्या पायावर उभी असलेली मुलगी ही. केवळ वडिलांचा लकडा थांबवण्यासाठी लग्न करेल? कशाला? 'नाही करायचं मला लग्न' असं म्हटलं असतं तिने तर वडिलांनी काय जबरदस्तीने बोहोल्यावर चढवलं असतं का? आणि आता जो मुलगा लहानपणच्या मैत्रिणीला, जी आता ह्या जगातसुध्दा नाही, तिने म्हटलं म्हणून अमेरिकेला जायचं म्हणतोय, तुझ्यावर माझं प्रेम नाहीये म्हणतोय आणि एकूणातच अतिशय स्वार्थी आहे. त्याच्यावर प्रेम करत राहून ही आपली फरपट करून घेतेय? हिला काही स्वाभिमान आहे की नाही? घनाला जर आपल्या घरच्या लोकांना सांगायची हिम्मत नाही तर हिने तोंड उघडून कां सांगितलं नाही? सगळं सगळं स्पष्ट सांगून डिव्होर्स पेपर्सवर सही करून ते घनाच्या हातात देऊन आणि मंगळसूत्र त्याच्या तोंडावर मारून निघून गेलेली राधा पहायला मला जास्त आवडली असती. पण ही बसली आहे मंगळागौरीची पूजा करत. मग स्वत:च्याच माहेरी 'आज इथे राहू का?' म्हणून केविलवाणा चेहेरा करून विचारायची वेळ आली.

चार दिवसांनी घना काय दिवे लावणार आहे देव जाणे. ऑगस्टअखेर पर्यंत मालिका संपली तरी हत्तीवरून साखर वाटावी लागेल. :-)

No comments: