Friday, October 18, 2013

पवित्र रिश्ता नावाची कापूसकोंड्याची गोष्ट

एक होती अर्चना. ती, तिचे आईबाबा, तिचा भाऊ विनोद, वहिनी आणि दोन धाकटया बहिणी - वर्षा आणि वैशाली. अर्चना आईला तिच्या आजारपणात मदत करायला घरीच असल्याने फारसी शिकली नाही. म्हणून नोकरीही मिळत नाही आणि लग्नासाठी चांगली स्थळं येत नाहीत. पुढे तिला भेटला मानव - एक कार मेकेनिक. मग ही गोष्ट पुढे सरकली ती त्यांचं लग्न होतं की नाही ह्या मुद्द्यावर. जोडीला वर्षा, वैशाली आणि मानवाचा भाऊ सचिन ह्यांची आयुष्यं तोंडी लावायला होतीच. मानवला भेटली उद्योगपती डीकेची बायको. मानवचा उत्कर्ष सुरु झाला. वर्षाला मूल होणार नाही हे निदान झालं. अर्चनाने आपला मुलगा सोहम तिला वाढवायला काही दिवस दिला. वर्षाला त्याचा लळा लागला. आणि अर्चनाच्या जुळ्या मुलींच्या बारश्याच्या दिवशी त्याला घेऊन ती गायब झाली. मानव भडकला आणि दोन्ही मुलींना घेऊन त्याने तडक केनडा गाठलं. अर्चनाने अनाथ पुर्विला वाढवायला सुरुवात केली.

इथे सिरीयलने पहिली टाईमलीप घेतली. मग मानव केनडाहून येणं, जुळ्या मुलींचा आईवरचा राग, वर्षाचा बिहारी नवरा बालन आणि सोहम प्रकरण, पूर्वी आणि ओवी एकाच माणसाच्या, अर्जुनच्या, प्रेमात पडणं, आधी पूर्वीचं लग्न अर्जुनशी ठरणं, मग तिने ओविचं लग्न त्याच्याशी लावून देणं, पूर्वीचं प्रेग्नंट असणं, ओनीर आणि कोलकाता, मग पूर्वीचं अर्जुनशी लग्न लागणं, अर्चनाचा स्मृतिभ्रंश, तिचं बरं होणं, तेजू आणि शेजारचं गुजराती कुटुंब, सोहमचं डॉक्टर गौरीच्या प्रेमात पडणं, मधूनमधून अर्चनाच्या भावाची मुलगी पुन्नी आणि तिच्या नवर्याच्या कारवाया, अर्चनाने सचिनचं डॉक्टर गौरीशी लग्न ठरवणं, सोहमने तिला पळवून नेणं वगैरे यथासांग पार पडलं.

आता म्हणे सिरीयलने पुन्हा एक टाईमलीप घेतली आहे. मानवचे आईवडील, अर्चनाची आई सगळे जिवंत आहेत. दोन दोन लग्नं होऊन बिचारा अर्जुन भारतात एकटाच राहतोय. पूर्वी त्याला सोडून आईवडिलांबरोबर केनडात आहे. सचिनला ३ मुलं आहेत. इथे भारतात सोहमला ४ मुलं आहेत. मोठी मुलगी अर्चनाची कार्बनकॉपी आहे. पूर्वीच्या दुसर्या बाळाचं काय झालं माहीत नाही. सध्या तरी परी एकटीच दिसतेय. ओवी कुठे आहे माहीत नाही. तेजूचं लग्न झालेलं नाही तेच बरंय नाहीतर पुढल्या आयपीएल सिझनमध्ये ह्यांनी आपली टीम उतरवली असती. अर्चनाबाई मध्येमध्ये पिकलेले केस घेऊन भारतातल्या समुद्राकडे पहात 'केनडामे सुबह हो गयी' असे मजेशीर संवाद म्हणताहेत. आता सोहमची मुलगी अर्चनासारखेच कष्ट उपसणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.

एकुणात काय तर पहिले पाढे पंचावन्न अशी ह्या सिरियलची गत आहे. आणखी काही महिन्यांनी अजून एक टाईमलीप आली तरी अर्चनाबाई फार म्हाताऱ्या दिसणार नाहीत. त्यांची पणती कष्ट उपसायला तयार होणार आणि कापूसकोंड्याची गोष्ट चालूच रहाणार हे नक्की.

No comments: