Friday, July 5, 2013

शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला

जवळपास एक वर्षाहून अधिक काळाने नाटक पहायचा योग आला. खरं तर मराठीत पुन्हा नाटकांना चांगले दिवस आले आहेत. वर्तमानपत्रावर नजर टाकली तरी विविध विषयांवरची खूप नाटकं रंगभूमीवर आली आहेत हे सहज लक्षात येतं. फक्त नाटकांचं आणि माझं टायमिंग जुळत नाही. विकेंडला दुपारी लोळत पडायचं सोडून बाहेर पडायचं जीवावर येतं. आणि रात्रीचं नाटक म्हणजे जेवायचा खोळंबा होतो. म्हणून मागचं एक वर्ष नाटक हा विषयच मी डोक्यातून काढून टाकला होता. पण नाटकवेडाने पुन्हा उचल खाल्ली आणि "दुपारी तर दुपारी, बघून तर येऊ यात" म्हणून मी जायचं ठरवलं.

लोकसत्तातल्या परिक्षणावरून नाटकाच्या विषयाचा अंदाज आला होताच. शिवाजी महाराज. हे एव्हढे २ शब्द उच्चारले तरी काय काय आठवतं - शिवनेरी, पुण्यावरून फिरवलेला गाढवाचा नांगर, रोहिडेश्वराची शपथ, तोरणा, रायगड, कोंढाणा, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची बोटं कापण्याचा प्रसंग, प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेली अफझलखानाची भेट, बाजीप्रभूंची झुंज, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची मानाने केलेली पाठवणी. इसवी सनं नसू देत लक्षात पण इतिहास आठवतोय हे काय कमी आहे. दुर्देवानं, ह्या नावाबरोबर वर्तमानातल्या काही गोष्टी अश्या जोडल्या गेल्या आहेत की इतिहास विसरायला व्हावा. जो तो शिवाजीराजांना आपल्या कंपूत ओढण्याच्या प्रयत्नात. आज महाराज असते तर ह्या मतामतांच्या गलबल्यात आपण नक्की होतो तरी कसे असा संभ्रम त्यांना स्वत:लाच पडला असता.

अगदी हेच नेमकेपणानं ह्या नाटकात मांडलंय.  नाटकाच्या सुरुवातीलाच महाराजांचे प्राण हरण करण्याचा आदेश इन्र्ददेव यमाला देतात. वर हेही सांगतात की महाराजांना त्यांचे विचार सोबत आणायला सांग. यम महाराजांना पृथ्वीवरून घेऊन निघतो खरा पण वाटेत जेव्हा तो त्यांना त्यांच्या विचारांबद्दळ विचारतो तेव्हा ते आपले विचार पृथ्वीवरच राहिल्याचे सांगतात. त्यांना विचार घेऊन यायला सांगून यम एक डुलकी काढायला लवंडतो आणि महाराज त्याच्या हातावर तुरी देऊन निसटतात. महाराजांना घेऊन आल्याशिवाय स्वर्गलोकात परत यायचं नाही असा आदेश इंद्र त्याला देतो. त्यामुळे त्यांना शोधत पृथ्वीवर फिरणं त्याच्यासाठी जरुरीचं होऊन बसतं. जिथे जिथे म्हणून महाराजांचं नाव येतं तिथे तिथे तो धावत जातो. आणि इथेच त्याची बिचार्याची गोची होते. कारण त्यातल्या कुठल्याच ठिकाणी त्याला महाराज सापडत नाहीत.

हाच शोध त्याला एका राजकीय पक्षाकडे घेऊन येतो. पक्षाचे पदाधिकारी आपणच महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते कसे आहोत ते जनतेला कळावं म्हणून एका शाहिराचा कार्यक्रम ठेवतात. हे शाहीर गाजलेले, महाराजांवरची त्यांची काही पुस्तकं प्रकाशित झालेली तर काही प्रकाशनाच्या वाटेवर. पण महाराजांचे विचार नक्की नेमके कोणते ह्यावर शाहिरांचा त्यांच्या साथीदाराशी मतभेद झालेला असतो आणि तो साथीदार त्यांना दुरावलेला असतो. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते पुन्हा त्याच्याकडे येतात. तोही महाराजांवर बोलायला तयार होतो. तो बोलायला लागतो आणि आपल्याला कळतं की इतिहासात सांगितलं त्यापेक्षा महाराज खूप खूप वेगळे होते. पण महाराजांचं वेगळेपण ना पुस्तकी ज्ञानाची पोपटपंची करणारया शाहिराला पटत ना महाराजांच्या नावावर मतांचा जोगवा मागणाऱ्यांना. असे कोणते आहेत महाराजांचे विचार? शाहीर साथीदाराला बोलू देतो का? यमाला महाराज सापडतात कां त्याचा शोध सुरूच रहातो?

हे प्रश्न पडायला हवे असतील तर हे नाटक पहायलाच हवं. निदान इतिहास महाराजांना समजून घ्यायला कुठे कमी पडला ते कळावं म्हणून तरी. नाटकाच्या जाहिरातीत नटसंच जालन्यातले शेतकरी आहेत असं म्हटलं होतं. पण त्यांची तयारी पाहता ते पेशाने नट नाहीत हे पचायला जड जातं एव्हढ्या ताकदीने त्यांनी हे नाटक उभं केलंय आणि पेललंय सुध्दा. खास लक्षात राहणारी पात्रं म्हणजे यम, शाहिराचा साथीदार, अक्का आणि शाहिराचा दुसरा साथीदार पाशा. संवाद खटकेबाज असले तरी काही ठिकाणी पल्लेदार वाक्यं घालण्याच्या प्रयत्नात छापील वाटतात - विशेषत: शाहिराच्या साथीदाराच्या बायकोच्या आणि त्याच्या सासर्याच्या तोंडचे संवाद. काही कलाकारांना ही वाक्यं म्हणताना प्रयास करावा लागतोय हे जाणवतं. काही ठिकाणी संगीत इतक्या जोरात वाजतं की शब्द ऐकू येत नाहीत. :-( एव्हढ्या त्रुटी सोडल्या तर हे नाटक उत्तम आहे ह्यात वादच नाही.

'शिवाजी महाराज' हे दोन शब्द उच्चारताच 'गोब्राह्मणप्रतिपालक क्षत्रियकुलावतंस...' आणि 'हर हर महादेव' एव्हढंच आठवणार्या आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं हे नाटक म्हणूनच पहायला हवं.

No comments: