Tuesday, August 23, 2016

रक्षाबंधनाच्या दिवशी शिवाजीपार्कला काही कामानिमित्त गेले होते. उद्यान गणेश मंदिराच्या बाहेर गाड्यांची, बाईक्सची पूजा करून घ्यायला लोकांची झुंबड उडाली होती. भटजी अगदी घाईत दिसत होते. नारळ फुटत होते आणि भटजी तिथे असलेल्या एका झाड्याच्या बुंध्याशी ते नेऊन ठेवत होते. दोन बुंध्याच्याखाली मिळून जवळपास १०-१२ नारळाच्या वाट्या पडल्या होत्या. तिथे जवळच काली मंदिराच्या बाहेर चाप्याची फुलं, गजरे विकणाऱ्या बायका आणि त्यांची लहान मुलं बसली होती. पण ते नारळ त्या मुलांच्या हातात ठेवावेत असं ना त्या पूजा करून घेणाऱ्या लोकांना वाटलं ना भटजींना. किमानपक्षी प्रसाद म्हणून मंदिरात ते खोबरं वाटावं एव्हढंही जमलं नाही. अन्नाची अशी नासाडी हे लोक कशी करू शकतात असं वाटून गेलं. आणि तेही देवाच्या दाराबाहेर. शिकल्या-सवरल्या लोकांची ही गत तर मग अडाणी लोकांबद्दल बोलायलाच नको. स्वत:पुरतं तेव्हढं पहायचं, बाकी दुनिया गेली तेल लावत ही आजकालची मानसिकता झालेय. घरचं विकून समाजसेवा करा असं नाही म्हणत मी. पण जिथे जमेल तिथे हातभार लावायला काय हरकत आहे?

आणखी एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे जिथेतिथे नगरसेवकांनी लावलेले बोर्ड. कोणी अनेक महिने बंद असलेला जलतरण तलाव चालू केला तर कोणी केअरटेकर नसल्याने नाना-नानी पार्क मध्ये बंद झालेली चहा आणि वर्तमानपत्राची सोय पुन्हा चालू केली. अरे, पण हे तुमचं कामच आहे, नाही का? ते तुम्ही केलं, त्यात काय महान आहे? त्यासाठी हा डंका का पिटताय?

मला तर दहीहंडीच्या दिवशी तिथे जायलाही नको वाटतं. अनेक वर्षांपूर्वी पार्काच्या कडेला टाकलेले प्लास्टिकच्या प्लेटीचे ढीग आणि लोकांच्या चालायच्या मार्गात बसून जेवणारे गोविंदा पाहून डोक्यात जाम तिडीक गेली होती. ह्या राजकारणी लोकांच्या कचाट्यातून हे सण सोडवायला परमेश्वराला पुन्हा अवतार घ्यावा लागेल. आम्हाला काही ते करणं जमणार नाही. 'गोविंदा आला रे आला' हे गाणं वाजवल्याशिवाय आणि हुल्लडबाजी केल्याशिवाय आम्ही हा सण साजरा करूच शकत नाही. :-(

No comments: