Tuesday, September 17, 2013

ठिकठिकाणच्या गणेशमूर्तींचं दर्शन घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. माझी भक्ती पूर्णपणे सगुण आहे. बाप्पाचं रूप कुठलंही असो, कितीही वेळ मूर्तीकडे पाहिलं तरी मंडपातून पाय निघत नव्हता. प्रत्येक मूर्तीसमोर ठेवलेल्या छोट्या मूर्तीच्या पायांवर हळद-कुंकू वाहून स्पर्श करताना एक वेगळंच समाधान मिळत होतं. निर्गुण भक्ती करायची तरी कशी? खरं तर सुंदर आरास केलेल्या मंडपातल्या सुरेख नटवलेल्या मूर्ती पाहताना एकाच वेळी सगुण आणि निर्गुण भक्तीची शिकवण एकच धर्म कसा काय देऊ शकतो ह्याचंच मला आश्चर्य वाटतंय :-)

दरवर्षीप्रमाणे नेहमीच्या सार्वजनिक गणपतींचं दर्शन घेत होते. एका वाडीत जवळच्या मैदानात नेहमी गणपतीची स्थापना केलेली असते. ह्यावेळी पाहिलं तर नेहमीपेक्षा मोठी मूर्ती दिसली. दर्शन झाल्यावर तिथे असलेली एक बाई पुढे आली आणि हातांवर प्रसादाचे साखरफुटाणे ठेवले. मी आपलं नेहमीच्या सवयीने 'Thank You' म्हणाले तर हसली आणि म्हणाली 'काय हो, देवाचा प्रसाद दिला तर Thank You म्हणताय'. मीही हसले आणि म्हटलं "ह्या वर्षी नेहमीपेक्षा मोठी मूर्ती आणलीत' तर म्हणाली यंदा आमचं २५ वं वर्ष आहे. किती अभिमान आणि समाधान होतं तिच्या चेहेर्यावर. मग म्हणाली आज रात्री भंडारा आहे, जेवण पण आहे प्रसादाचं, या तुम्ही पण. आता तिने म्हटलं म्हणून मी काही लगेच जेवायला जाणार नव्हते. पण तिने अगत्याने सांगितलं ह्यातच सारं काही आलं. सार्वजनिक गणेशोत्सवाचं मांगल्य कुठेकुठे अजून शिल्लक आहे हे पाहून बरं वाटलं.

ह्याउलट आजच्या लोकसत्तातली लालबागच्या राजाबद्दलची बातमी वाचून कसंसच झालं. तिथल्या कार्यकर्त्यांची दमदाटी म्हणे फार वाढली आहे. बायका, मुलं, वृध्द काही काही ना बघता लोकांना दर्शन झाल्यावर ओढून बाहेर काढतात म्हणे. ही दरवर्षीची तक्रार आहे. पण ह्या वर्षी कोणीतरी ते दृश्य चित्रित केलं. आता ह्यासाठी लालबागच्या राजालाच कशाला जायला पाहिजे. सिध्दीविनायक मंदिरात हेच करतात की. तुम्हाला देव दिसतो न दिसतो तोच खेकसायला लागतात 'चला पुढे चला'. जसं काय आम्ही गाभार्यात राहायलाच आलोय.

कुठेतरी ह्या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत. देवाचा बाजार मांडलाय आपण. आपल्या घराजवळच्या मंदिरातला गणपती आणि सिध्दीविनायक ह्यांच्यात काय फरक आहे सांगा? आपल्या घरातल्या देव्हार्यातला गणपती हा गणपती नाही का? मग दर मंगळवारी सिध्दीविनायक मंदिरातच जाण्याचा हट्ट कशासाठी? अंगारकीला आदल्या रात्रीपासून रांगेत उभं राहण्याचा अट्टाहास का? जरा विचार करून बघा. कळतंय पण वळत नाही अशी स्थिती आहे आपल्या सगळ्यांची.

अश्या देवळात देव तरी राहील का?

No comments: