Sunday, September 18, 2016

कोसला - भालचंद्र नेमाडे

हे पुस्तक वाचलंच पाहिजे असं वाचलं होतं. पण फार वास्तववादी वगैरे वाचायला झेपत नसल्यामुळे वाचायचं टाळलं होतं. पण आता वाचायच्या पुस्तकांच्या यादीत ह्याचं नाव होतं आणि लायब्ररीवाल्या काकांनी आवर्जून काढून ठेवलं होतं त्यामुळे घेऊन आले.

खरं सांगायचं तर पुस्तक वाचायला घेतलं आणि 'हा शेखर खोसला कोण आहे' हे नाटक पहायला गेले होते त्याची आठवण झाली. तेव्हा पहिली पाच-दहा मिनिटं आपण चुकीचं नाटक पाहतोय की काय ह्या शंकेने बेजार झाले होते. तसंच काहीसं इथेही झालं. आधी तो सश्याचा प्रसंग डोक्यातून जाईना. मग हे असलं पुस्तकभर असलं तर आपलं पुस्तक संपेतो काय होणार ह्याची काळजी लागली. आणि शेवटी 'पांडुरंग सांगवीकर' ह्या माणसाच्या विद्यार्थीदशेतले प्रसंग वाचताना 'आपण चुकीचं पुस्तक वाचतोय का' ही शंका छळायला लागली. :-) होस्टेलवर राहायची वेळ कधी आली नसल्याने त्यातले एकेक प्रसंग वाचून 'ऐसाभी होता है?' असं वाटलं खरं पण नंतरनंतर वैतागही यायला लागला. विद्यार्थीदशेत शाळा, कॉलेज, पुस्तकं, अभ्यास, परीक्षा ह्या परिघात फिरलेली असल्याने सांगवीकरचं बापाच्या जीवावर दिवस वाया घालवणं खटकायला लागलं. मनीच्या मृत्यूचा प्रसंग मात्र चटका लावून गेला. 'तिच्याबरोबर तिचं एव्हढंसं गर्भाशय गेलं' ह्या वाक्यावर आधी ठेच लागली आणि मग ते मी अक्षरश: ३-४ वेळा वाचलं. पोटात खड्डा पडतो असं वाचून. जगण्याला काहीही अर्थ नसलेली म्हातारी का जगतात आणि काहीही जग न पाहिलेली कच्चीबच्ची का मरतात हे मला एकदा जोरदार भांडण करून देवाला विचारायचंच आहे. खंडीभर पोरं झाली की आईबापांना त्यांचं महत्त्व वाटत नाही का? देवाने एक तर मुलांना जिथे त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं असतील तिथंच जन्माला घालावं नाहीतर घालू नये. पण त्यांची परवड करायचा त्याला काहीही हक्क नाही. आणि मी त्यासाठी त्याला कधीही माफ नाही करणार.

लेण्यांचा प्रसंग वाचून तर मला हा लेखक मनकवडा आहे की काय अशी शंका आली. किती खरी गोष्ट. आपण लेणी बघायला जातो, तिथली दुरावस्था बघून हळहळतो. खरं तर ती तिथे किती आधीपासून असतात. आपल्या खिजगणतीतही नसतात. थोड्या दिवसांनी आपण त्याबद्दल विसरून सुध्दा जातो. मग त्या हळहळण्याला काय अर्थ? आणि हे केवळ लेण्यांपुरतं मर्यादित नाही. तेच एखाद्या जागेला जीव लागण्याबाबत. आपली शाळा, कॉलेज ह्या किती जिव्हाळ्याच्या गोष्टी असतात. आपल्या आधी तिथून किती जण गेलेले असतात, आपल्यानंतर कितीजण जाणार असतात. तिथे काय असतं एव्हढा जीव लावण्यासारखं? छोटे छोटे प्रसंग. तुम्हाआम्हा सगळ्यांच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने येणारे. पण कोणी त्यावर लिहिलं की वाटतं अरे, ह्यांना कसं कळलं. :-)

आणि हो, ते वेताळ टेकडीचं गुढ तेव्हढ उकललं असतं तर बरं झालं असतं असं वाटून गेलं. Agatha Christie वाचल्याचा परिणाम, दुसरं काय? :-) बाकी, त्या शिक्षकांचं 'मराठीचा कसला आलाय अभ्यास? मुलीसुध्दा पास होतात' हे वाक्य वाचून राग नाही आला, कीव आली. पण असे शिक्षक अजूनही ह्या देशात असतीलच की कुठेकुठे. :-(

पुस्तकातली आवडलेली वाक्यं टिपून घेतली की आपण 'सखाराम गटणे' झालोय की काय असं वाटतं :-) पण तरी घेतलीच:

मिळवून मिळवावं तर असं काही, की जन्मभर त्याच्या नादात राहता येईल. शेवटपर्यत.
माणसाशिवाय दुसर्या कुठल्याही गोष्टीशी आपल्याला बोलता आलं पाहिजे.

दहा बघावे तर एखादा बरा असतो. आणि दोन भंपक शोधावे म्हटलं तर दहा सापडतात.

पण मी आपली एक स्वत:पुरती जगायची सवय करून घेतली आहे, सगळेजण आपण सोडून मेले तरी आपल्याला जगता आलं पाहिजे.

ज्याप्रमाणे घरात दिवा असला की खिडक्यांतून, दारांतून, झरोक्यांतून उजेड दिसतो आणि आपल्याला कळतं की घरात दिवा आहे, त्याप्रमाणे प्रत्येक थोर माणसाच्या वागण्यातून, बोलण्याचालण्यातून असा काही उजेड दिसलाच पाह्यजे.
नाहीतर त्या घरात दिवा नाही.
तो माणूस भंपक.

No comments: