Friday, September 17, 2010

बाप्पा येणार, येणार म्हणताना दीड आणि पाच दिवस राहून आपल्या घरी परतले सुध्दा. काल गौरीदेखील घरी गेल्या. तरी ११ दिवसांचे गणपती आहेत म्हणून बरं नाहीतर सगळं कसं एकदम भकास वाटायला लागलं असतं. :-( मला स्वतःला तर विसर्जन बघायला अजिबात आवडत नाही. कसल्या गोजिरवाण्या मूर्ती विसर्जनाला घेऊन जात असतात. बाप्पाना खरं तर त्यांच्या घरी जाऊ द्यायलाच नाही दिलं पाहिजे. :-)

एरव्ही गायब झालेला पाऊस पण विसर्जनाच्या दिवशी नेमका बाप्पाला भिजवायला येतो. आणि मग त्याच्याबरोबरच्या मंडळींची मूर्तीवर छत्री धरायला एकच लगबग उडते. ज्याने सगळ्या जगावर क्रृपाछत्र धरलंय त्याला पावसापासून वाचवायची धडपड पाहिली की हसू येतं पण आतून कुठूनतरी भरूनसुध्दा येतं.

बाप्पा, पुढच्या वर्षी अजून लवकर या. ह्या वर्षी जाताना सगळ्यांची दु:खं बरोबर घेऊन जा. आणि विसर्जनानंतर घरी घेऊन जायची मूठभर माती असते ना त्यातून सगळयांच्या वाट्याला भरभरून सुख पोचवा!

No comments: