मागच्या आठवड्यात एक दिवस संध्याकाळी काहीतरी करायला म्हणून गॆलरीत गेले तेव्हा आभाळ गच्च भरून आलेलं दिसलं. कशासाठी आले होते ते विसरूनच गेले मग. कित्ती वेळ तरी बाहेरच पहात उभी होते. किती छान दिसतं असं आभाळ. पण ह्या वर्षीचा पाऊस आता जवळजवळ गेल्यातच जमा आहे. त्यामुळे कदाचित ह्यावर्षीचं ते आभाळाचं शेवटचं भरून येणं असेल. नुसत्या ह्या विचारानेच कसंतरी झालं. अंधार दाटून येऊ लागला तरी पाय मागे वळेनात. पाऊस पडत नव्हता तरी कुठेतरी वाचलेली एक कविता मनात घुमत राहिली.
झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले
चिंब मनी आज पुन्हा, आठवूनी मेघ जुना कोणी भिजलेले
वार्यातूनी, पाण्यातूनी, गाण्यातूनी भिजला
पाऊस हा माझा तुझा, आता ऋतू सजला
गंध असे, मंद जणू, होऊनिया थेंब जणू, आता टपटपले
पाऊस हा असा, झाला वेडापिसा, पानाफुलांत पुन्हा
खूप जुन्या आज पुन्हा, डोळयात थेंबखुणा
होऊनिया धुंद खरे, आज पुन्हा गार झरे येथे झरझरले
काही कळया, काही फूले, काही झूले हलले
काही मनी, काही तनी, काही नवे फुलले
वावरुनी आज कुणी, सावरुनी आज कुणी, येथे थरथरले
No comments:
Post a Comment